You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

सीमेपलिकडचा दहशतवाद सहन करण्याचा काळ आता संपलाय - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे. निवडणुकीसोबत महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

लाईव्ह कव्हरेज

  1. सीमेपलिकडचा दहशतवाद सहन करण्याचा काळ आता संपलाय - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

    अनेक वर्षं भारताने सीमेपलीकडील दहशतवाद सहन केला. पण आता तो काळ संपला आहे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.

    राजस्थानमधील बिकानेर येथे बोलताना जयशंकर म्हणाले, "यापूर्वी नागरिकांच्या मनात सुरक्षेचा प्रश्न सतत राहायचा. भारताने अनेक वर्षं सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन केला. पण आता तो काळ निघून गेला आहे.

    26/11 ला मुंबईत जे घडलं ते मोदींनंतर या देशात पुन्हा होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

    एस जयशंकर पुढे म्हणाले,आजच्या भारतात कोणतीही दहशतवादी घटना घडली तर सरकारचे उत्तर हे उरी, बालाकोट सारख्या स्टाईकने होतं.

    याशिवाय उत्तरेकडील सीमेवरही काही घडले तर त्याला तोंड देण्यासाठी आपले सैन्य उभे असते.

  2. केजरीवाल सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा आणि आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

    कुमार हे केजरीवाल सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री होते.

    मंत्रिपद आणि पक्ष सोडताना त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

    "आम आदमी पक्षाचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला. पण आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. या सरकारमध्ये काम करणे मला अस्वस्थ झाले आहे. मी या पक्षाचा आणि सरकारमधील माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय," असं कुमार यांनी म्हटलं.

    गेल्या वर्षी (2023) नोव्हेंबरमध्ये राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. दिल्लीचं मद्यविक्री धोरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा छापा टाकण्यात आला होता.

    सध्या याच प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत.

    21 एप्रिल रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.

    केजरीवाल सध्या तुरुंगातून दिल्ली सरकार चालवत आहेत. याशिवाय याच प्रकरणात मनीष सिसोदियाही गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहेत.

  3. 'तुमच्या सुरक्षेचे महाराष्ट्राला 1 कोटी 64 लाख रुपये द्या', गौतम नवलखांना सुप्रीम कोर्टाचे आदेश

    नजरकैदेत असताना सुरक्षेवर महाराष्ट्र सरकारने जो खर्च केला त्याची भरपाई गौतम नवलखा यांना द्यावी लागणार, असं सुप्रीम कोर्टाने बुधवारी (10 एप्रिल) म्हटलं आहे.

    नवलखा यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवावं अशी स्वत: मागणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करावे लागले. त्यावर 1 कोटी 64 लाख खर्च झाल्याचा दावा सरकारने केला आहे.

    त्यामुळे नवलखा यांनी ही रक्कम सरकारला द्यावी, असं आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

    भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर 2023 मध्ये जामीन मंजूर केला होता. पण NIAच्या मागणीवरून सुप्रीम कोर्टाने त्या जामीनाला स्थिगिती दिली होती.

    त्यानंतर नवलखा यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन सुनावणी होईपर्यंत नजरकैदेची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.

    या कालावधीत त्यांना 24 तास सुरक्षा देण्यात आली होती. पण या सुरक्षेचा खर्च नवलखा यांना सरकारला द्यावा लागणार आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

    नवलखा यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने केलेला खर्च ते टाळू शकत नाही, कारण त्यांनी स्वतः नजरकैदेची मागणी केली होती, असे कोर्टाने म्हटलं.

    न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

    "जर तुम्ही घरात नजरकैद करावी अशी मागणी केली असेल, तर तुम्हाला सुरक्षेसाठीचा खर्च भरावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या दायित्वातून सुटू शकत नाही," असे खंडपीठाने नवलखा यांच्या वकिलाला सांगितलं.

    नवलखा यांच्या वकिलाने नजरकैदेसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. पण सरकारने दिलेल्या आकडेवारीवर मतभेद असल्याचं सांगितलं.

    एनआयएकडून बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एस.व्ही. राजू यांनी कोर्टाकडे नवलखा यांची तक्रार केली.

    नवलखा यांच्याकडून इतर कारणे देऊन पैसे भरले जात नाहीत, असं राजू यांनी कोर्टात सांगितलं.

  4. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा माफीनामा सुप्रीम कोर्टाने पुन्हा फेटाळला

    दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्ण यांनी मागितलेली माफी सुप्रीम कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळली आहे.

    पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर बुधवारी (10 एप्रिल) सुप्रीम कोर्टानत सुनावणी झाली.

    न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाल्या, पतंजली यांनी मागितलेल्या माफीने 'आम्ही समाधानी नाही आहोत.' गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा फेटाळला होता.

    तसंच प्रतिज्ञापत्र दाखल करून कोर्टाच्या अवमान प्रकरणी त्यांना उत्तर देण्यास सांगितले होतं.

    सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, बाबा रामदेव यांच्यावर अवमानाची कारवाई का सुरू करू नये?

    पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई न केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने उत्तराखंड सरकारलाही फटकारलं.

    गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने रामदेव आणि बालकृष्ण यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

    आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 16 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

    “पतंजली कंपनीकडून कोव्हिडवर ॲलोपॅथीमध्ये उपचार नाही, असं सांगण्यात येत होतं. तेव्हा केंद्राने डोळे मिटून का ठेवले?” असंही कोर्टाने म्हटलं.

  5. ‘गॉड पार्टिकल’ शोधणारे शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचं निधन

    नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते.

    पीटर हिग्स यांनी 1960 च्या दशकात ‘हिग्स बोसॉन’ नामक अणुकणांची संकल्पना मांडली होते. हा कण ‘गॉड पार्टिकल’ म्हणून ओळखला जातो.

    महास्फोटानंतर विश्व नेमकं कशानं बनलं असावं, अणूंना वस्तुमान कसं मिळत असावं, याचं उत्तर या कणांत दडलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर हिग्स बोसॉन हा कण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

    2012 साली युरोपातल्या स्वित्झर्लंडमध्ये सर्न या संस्थेचा लार्ज हॅड्रॉन कोलायडर वापरून संशोधकांनी या कणांचं अस्तित्व सिद्‌ध केलं.

    वर्षभरानंतर म्हणजे 2013 साली हिग्स बोसॉन सिद्धांतासाठी पीटर हिग्स आणि फ्रान्सवा एंग्लर्ट यांना संयुक्तरित्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

    8 एप्रिल रोजी एडिंबरामध्ये त्यांचं निधन झाल्याची माहिती एडिंबरा विद्यापीठानं जाहीर केली आहे.

  6. विदर्भाला पावसाचा तडाखा, पिकांचं नुकसान

    विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. अमरावती जिल्ह्यात गारपिटीनं गहू, संत्रा, हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे. याशिवाय, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्येही वादळी पावसानं हजेरी लावली आहे.

    अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं गहू पिकाचं नुकसान केलं आहे.

    अमरावतीत आधी सोसाट्याचा वारा आला आणि मग पावसाला सुरुवात झाल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

    पावसामुळे शेतातील हरभरा पिकाचं नुकसान झाल्याची माहिती अमरावतीचे शेतकरी रामचंद्र पवार यांनी दिली आहे.

    पावसामुळे घराची पत्रे उडाले, घरात पाणी धसल्यामुळे नुकसान झालं आहे. शासनानं लवकर पंचनामे करुन मदत द्या, अशी विनंती मंदा रामचंद्र पवार यांनी केली आहे.

  7. साताऱ्यातून शशिकांत शिंदे लढणार, शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली असून, साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    महाविकास आघाडीचं कालच जागावाटप झालं, त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत. तर शिवसेना 21 आणि काँग्रेस 17 जागा लढणार आहे.

  8. छत्तीसगडमध्ये मजुरांनी भरलेली बस खाणीत पडली, 14 जणांचा मृत्यू

    छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मजुरांनी भरलेली बस खाणीत पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 15 जण जखमीही झाले आहेत.

    स्थानिक पत्रकार आलोक पुतुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गच्या कुम्हारीजवळ हा अपघात झाला असून बसमध्ये एका खासगी कंपनीचे कर्मचारी प्रवास करत होते.

    ही घटना मंगळवारी (9 एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. बस खापरी गावाजवळ पोहोचली आणि नियंत्रण सुटून 40 फूट खोल खाणीत पडली.

    पंतप्रधान मोदी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

    पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं की, "छत्तीसगडच्या दुर्गमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी यात आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. यासोबतच अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थानिक प्रशासन पीडितांना शक्य ती सर्व मदत करत आहे."

    मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी ट्विटरवर लिहिलं की, "दुर्गच्या कुम्हारीजवळ एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची दुःखद माहिती मिळाली. या अपघातात 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळत आहे. मी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. शोकाकुल कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळो. अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो."

  9. नमस्कार...

    बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर तुमचं स्वागत आहे.

    9 एप्रिलचे अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    (बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)