You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज ठाकरे यांचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घ्या राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी

लाईव्ह कव्हरेज

  1. गुढीपाडवा : शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?

  2. राजीव गांधीः राजकीय कारकीर्द आणि पंतप्रधानपद, असा होता त्यांचा जीवनप्रवास

  3. राज ठाकरेंना पक्षाच्या स्थापनेच्या 19 वर्षांनंतरही सत्तेचा सूर का गवसत नाहीय?

  4. लोकसभा महाराष्ट्र उमेदवार 2024 : महाविकास आघाडी, महायुती आणि वंचितच्या उमेदवारांची यादी

  5. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

    आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये -

    • येत्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला.
    • अरविंद केजरीवाल यांची अटकेच्या विरोधातली याचिका फेटाळली.
    • महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, राष्ट्रवादी काँग्रेस (SP)10, शिवसेना (UBT) 21 आणि काँग्रेस 17 जागा लाढवणार
    • सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेचे चंद्रहास पाटीलच लढवणार

    आज आपण ताज्या घडामोडींच्या अपडेट्स इथेच थांबवत आहोत. उद्या पुन्हा भेटुयात. शुभरात्री

  6. राज ठाकरे : 'नरेंद्र मोदींसाठी मनसेचा बिनशर्त पाठिंबा'; अमित शाह यांच्या भेटीबद्दल म्हणाले...

    मंगळवारी (9 एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण केलं.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

    राज ठाकरे भाषणात म्हणाले, "मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की आम्हाला राज्यसभा किंवा विधानपरिषदही नको. मला काहीही अपेक्षा नाहीयेत. पण नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिनशर्त पाठींबा देत आहे, असं मी जाहीर करतो."

    याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.

    मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही. पण यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करा असं राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

    राज ठाकरे यांच्या भूमिकेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.

    "विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

    दरम्यान, शिवाजी पार्कमधील भाषणात राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्या भेटीवेळी माध्यमांच्या कव्हरेजवर सडकून टीका केली.

    दिल्लीत पोहोचल्यानंतर अमित शाह यांची भेट दुसऱ्या दिवशी ठरली होती. तरीही राज ठाकरेंनी अमित शाह यांच्या भेटीसाठी अनेक तास वाट पाहावी लागली, अशा बातम्या चालवल्या, यावर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.

    मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. तर केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करेन, असं राज यांनी म्हटलं.

    काही दिवसांपूर्वी 'एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात',अशा बातम्या आल्या होत्या. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

    राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

    • मला जर शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असतं तर आधीच झालो असतो. मी केवळ बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. मी मनसेचाच प्रमुख राहणार.
    • मुख्यमंत्री गेले वर्ष दीड वर्ष म्हणत होते, आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र म्हणजे काय? मला कळत नव्हतं म्हणून मी अमित शाह यांना फोन केला मग त्यांना भेटलो. मग आम्ही तिघंही (अमित शाह, राज ठाकरे, एकनाथ शिंदे) एकत्र भेटलो.
    • कॉंग्रेस नेत्यांसोबत भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपबरोबर.
    • या देशातला मी पहिला व्यक्ती होतो, ज्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहीजेत, असं म्हटलं होतं. तेव्हा त्यांच्या पक्षामध्येही याविषयी कुणी बोलत नव्हतं.
    • उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करायचे. कारण त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या, तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात? तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात.
    • एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही. तर रोखठोक भूमिका घेतो आणि घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.
    • माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा.
    • आज जागावाटपाची हाणामारी सुरु आहे. ती पाहता विधानसभेला नेतेमंडळी एकमेकांचा कोथळाच काढतील. अशा कुठे निवडणुका असतात का?
    • माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे की, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या महत्त्वाकांक्षा समजून घ्या. तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या.
  7. राज ठाकरेंचं शिवाजी पार्कवर लवकरच भाषण, काय भूमिका मांडणार?

    गुडीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची मुंबईत आज (9 एप्रिल) जाहीर सभा होत आहे.

    लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरेंची राजकीय भूमिका काय असेल, या प्रश्नांची उत्तरं या सभेत मिळण्याची शक्यता आहे.

    गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसे आणि भाजप यांच्या युती होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

    येत्या निवडणुकीत मनसेचा पाठिंबा मिळावा यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. तसंच राज यांच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

  8. अरविंद केजरीवाल यांची ED अटकेच्या विरोधातली याचिका फेटाळली

    ईडीच्या अटकेला आव्हान देणारी अरविंद केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

    ईडीने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

    मंगळवारी (9 एप्रिल) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा म्हणाले, "ईडीने न्यायालयासमोर दिलेल्या कागदपत्रांमध्ये कायद्याचे पालन करण्यात आल्याचं दिसत आहे. ईडीने PMLA कायदा आणि व्यक्तीला अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आहे."

    ईडीने सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये, 'हवाला डीलर्सची विधाने आहेत आणि 2022 मध्ये गोव्यात 'आप'कडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे विधानही आहेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

    न्यायमूर्ती शर्मा पुढं म्हणाले, " मद्यविक्री धोरण प्रकरणात साक्षीदार झालेल्या दोन आरोपींनीही केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. त्यांच्याच उमेदवाराने सांगितले की, रोख स्वरूपात दिलेली रक्कम गोवा निवडणुकीत वापरली गेली. न्यायालयाने त्या विधानांचा विचार केला. त्यांचीही दखल घेतली आहे. की एक संपूर्ण साखळी आहे, ज्यामध्ये गोवा निवडणुकीसाठी रोख रक्कम पाठवण्यात आल्याचे सांगितले जाते."

    केजरीवाल यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार, आरोपी साक्षीदाराच्या विधानावर विश्वास ठेवता येत नाही आणि ईडीने सुरुवातीच्या विधानांचा समावेश केलेला नाही ज्यामध्ये त्याच्यावर कोणतेही आरोप नाहीत.

    केजरीवाल यांच्या या युक्तिवादावर न्यायमूर्ती म्हणाले, "सध्या हे न्यायालय साक्षीदाराने दिलेला जबाब स्वेच्छेने दिला आहे की नाही, यावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मात्र, पुढील सुनावणीदरम्यान, आरोपींची उलटतपासणी करता येईल."

    आपल्याला अटक करण्याऐवजी ईडी वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी करू शकते, असा युक्तिवादही केजरीवाल यांनी केला होता. त्यावर न्यायालयाने सांगितले की, ईडीला आरोपीच्या सोयीनुसार तपास करण्याचे निर्देश देता येणार नाहीत.

  9. कंगनाने बीफ खाल्लयाचा आरोप फेटाळला; म्हणाली, 'माझ्याबाबत अफवा पसरवल्या'

    हिमाचल प्रदेशमधील भाजपची उमेदवार कंगना राणावतने आपण बीफ खात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विरोधकांनी तिच्यावर बीफ खात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कंगनाने हे स्पष्टीकरण दिलं आहे.

    विरोधकांनी कंगनाचे जुने फोटो पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करून कंगना बीफ खात असल्याचा आरोप केला होता.

    भाजपसाठी बीफ हा खूपच संवेदनशील मुद्दा आहे. बहुतेक भाजपशासित राज्यांत गो-हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नुकतंच राजकारणात उतरलेल्या कंगनाला विरोधकांनी या मुद्द्यावरून घेरल्याचं दिसत आहे.

    "मी बीफ किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लाल मांस खात नाही, माझ्याबद्दल पूर्णपणे निराधार अफवा पसरवल्या जातायत. मी योग आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा पुरस्कार आणि प्रचार करतेय. अनेक दशकांपासून माझी प्रतिमा डागाळण्यासाठी असे डावपेच केले जातायत. पण त्याचा ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत," असं कंगनाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  10. महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं, पाहा कोण कोणत्या जागा लढवणार?

    येत्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना 21 जागा, काँग्रेस 17 जागा आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागा लढवणार आहे. कोण कोणत्या जागा लढवणार आहे याची घोषणा आज पत्रकार परिषदेत झाली. पाहा संपूर्ण व्हीडिओ.

  11. महाविकास आघाडीची संपूर्ण पत्रकार परिषद :

  12. सांगलीची जागा शिवसेनेचे चंद्रहार पाटीलच लढणार

    सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. शिवसेनेनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम नाराज झाले होते. त्यांनी त्यांची नाराजी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींकडेही व्यक्त केली होती.

    मात्र, महाविकास आघाडीच्या अंतिम जागावाटपात सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्यालाच आली आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील हेच सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.

    सांगलीच्या जागेबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रातील सर्व 48 जागांचा निर्णय एकमताने झालेला आहे. सांगली असेल किंवा इतर जागा."

    'सांगली' काँग्रेसच्या हातून गेली, शिवसेनाच लढणार

    आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या, मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवाराने आपला मतदारसंघ राखला होता. हा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ.

    देशात कोणाचीही सत्ता येऊ दे, पण सांगलीमधून नेहमीच काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा.

    सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जत, तासगाव - कवठेमहांकाळ, खानापूर - आटपाडी, पलूस - कडेगाव, मिरज आणि सांगलीचा समावेश आहे. सध्या पलूस-कडेगाव आणि जत काँग्रेसकडे, तासगाव राष्ट्रवादीकडे, खानापूर-आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे, सांगली व मिरज भाजपकडे आहे.

  13. महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर

    महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर करण्यात आलंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात अशा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यात मतदारसंघांच्या नावासह महाविकास आघाडीनं जागावाटप घोषित केलं.

    काँग्रेस (17 जागा) : नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई

    राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट (10 जागा) : बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड

    शिवसेना (21 जागा) : जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, यवतमाळ-वाशीम, मुंबई दक्षिण-मध्य (साऊथ सेंट्रल), मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण आणि ईशान्य मुंबई

    उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले की, "नवीन वर्ष हुकूमशाही नष्ट होण्याचं जावो अशा शुभेच्छा देतो. युती किंवा आघाडी म्हणल्यानंतर शक्य होईल तितकी चर्चा आम्ही करत असतो. सर्वांच्या मनातल्या शंकांना आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तरं मिळाली असतील. अनेकांची इच्छा असते, महत्त्वकांक्षा असतात पण जिंकण्याचा उद्दिष्ट गाठायचं असेल तर सगळ्या महत्त्वकांक्षाना आवर घालून लढावं लागतं."

  14. यूट्यूबरला जामीन, सुप्रीम कोर्ट म्हणालं, 'प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकता येणार नाही'

    यूट्यूब बनवणाऱ्या एका व्यक्तीला दिलेला जामीन कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 'सोशल मीडियावर आरोप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकता येणार नाही', असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सोमवारी (8 एप्रिलला) हा आदेश दिला आहे.

    या यूट्यूबरवर 2021 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता.

    यूट्यूबर सट्टाई दुराईमुरुगन यांचा जामीन रद्द करण्याचा आदेश फेटाळताना, न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने तामिळनाडू सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना सांगितलं की, "निवडणुकीच्या आधी यूट्यूबवर व्हीडिओ बनवून आरोप करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही तुरुंगात पाठवायला लागलो तर किती लोकांना तुरुंगात टाकावं लागेल याची कल्पना करा."

    सुप्रीम कोर्ट म्हणाल की, आरोपीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केलेला नाही.

    मुरुगन यांना 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला होता पण 7 जून 2022 रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांचा जामीन रद्द केला.

    त्यांना जमीन देत असताना न्यायालयाने टाकलेल्या एका अटीचा संदर्भ देण्यात आला होता. या अटीनुसार मुरुगन यांना अवमानकारक टिप्पणी करण्यास मनाई करण्यात आली होती. या अटीच पालन न केल्यामुळे हा जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला होता.

    यावर कोर्ट म्हणालं की, “आम्हाला वाटत नाही की निषेध करून आणि त्यांचे मत मांडून, त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर झाला असे म्हणता येईल. जामीन रद्द करण्याचा हा आधार असू शकत नाही, असं आमचं मत आहे."

  15. महाविकास आघाडीची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, सांगलीचा तिढा सुटणार?

    लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटत नाहीये. मुळे जागावाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे एक बैठक आज (9 एप्रिल) घेण्यात येणार आहे.

    महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये सांगली, धाराशिव सारख्या जागांवरून मतभेद असल्याचं दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आम्ही मविआचा भाग नसल्याचं याआधीच जाहीर केलं आहे.

    गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर बऱ्याच उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नुकताच सांगलीचा दौरा केला आणि या दौऱ्यात सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला एकप्रकारे आव्हान देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीचे उमेदवार म्हणून ज्या चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर केलं तेही राऊत यांच्या दौऱ्यात सोबत होते.

    दुसरीकडे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसकडे असणार असं म्हटलं आहे. थोडक्यात काय तर काही जागांवरून अजूनही महाविकास आघाडीत एकमत न झाल्याचं स्पष्ट आहे. सांगलीच्या बदल्यात जालन्याची जागा ठाकरे गटाला देण्याच्या प्रस्तावाचीही सध्या चर्चा होते आहे.