You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

बिहार निवडणूकः पंतप्रधान मोदींने मानले बिहारच्या जनतेचे आभार

बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. जेडीयू कार्यकर्त्यांचा जल्लोष

  2. आठ जागांचे निकाल जाहीर; कोणाला किती जागा मिळाल्या?

    बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आठ जागांचे निकाल समोर आले आहेत. या आठपैकी भाजप, जेडीयू आणि आरजेडीनं प्रत्येकी 2-2 जागा जिंकल्या आहेत.

    काँग्रेस आणि व्हीआयपी पक्षानं प्रत्येकी 1-1 जागा जिंकली आहे.

    निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कलांनुसार एनडीए 120 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर आहे.

    एमआयएमआयएम चार जागांवर तर बहुजन समाज पार्टी दोन जागांवर आघाडीवर आहे.

  3. जेडीयूचा पहिला विजय

    बिहार विधानसभा निवडणुकीतला दुसरा निकाल समोर आला आहे. जेडीयूनं कुशेश्वर स्थान इथून विजय मिळवला आहे.

    निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जेडीयूचे उमेदवार शशी भूषण हजारी यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अशोक कुमार यांना 7222 मतांनी हरवलं आहे.

    शशी भूषण हजारी 2015 साली याच मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी 19,850 मतांच्या फरकानं विजय मिळवला होता.

  4. 15 वर्षं मुख्यमंत्री राहिल्यानंतर नितीश कुमार पुढच्या इनिंगसाठी तयार आहेत का?

  5. बिहारमध्ये सत्तेचा 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवला जाईल?

    बिहार निकालाची गणितं सातत्याने बदलताना दिसत आहेत. राजद आणि जदयूपेक्षाही भाजप हा पक्ष मोठा होताना दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेचा जो पॅटर्न महाविकास आघाडीने एकत्र येऊन राबवला तसाच प्रयोग बिहारमध्ये होईल का?

    या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

  6. ...तर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत- संजय राऊत

    बिहार निवडणुकांचे कल हाती आले असून भाजप-जेडीयूप्रणित एनडीएनं आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर राऊत यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

    "संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी 17 ते 18 सभा घेतल्या. तरीही 30 वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

    “बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सुरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल,” असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

  7. ब्रेकिंग, पहिला निकाल जाहीर- दरभंगा ग्रामीणमधून आरजेडीचे ललित कुमार यादव विजयी

    दरभंगा ग्रामीण मधून राष्ट्रीय जनता दलाचे ललित कुमार यादव विजयी झाले आहेत. त्यांनी जनता दल (युनायटेड) च्या फराज फातमी यांचा 2131 मतांनी पराभव केला आहे.

    ललित कुमार यादव यांना 64929 मतं मिळाली आहेत, तर फराज फातमी यांना 62788 मतं मिळाली आहेत.

    2015 साली ललित कुमार यादव हे 34491 मतांनी विजयी झाले होते.

  8. बिहारमध्ये भाजप-जेडीयुची आघाडी, मुख्यमंत्रिपद कोणाकडे?

    बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे.

    मात्र आता भाजप-जेडीयू आघाडी घेताना दिसत आहे. या आकड्यांचं विश्लेषण करणारा बीबीसी मराठीचा हा कार्यक्रम

  9. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगानं सर्व म्हणजे 243 जागांसाठीचे कल जाहीर केले आहेत. या कलांनुसार भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सध्या भाजप 73 जागांवर आघाडीवर आहे.

    राष्ट्रीय जनता दलानं (आरजेडी) 68 जागांवर आघाडी घेतली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयु 47 जागांवर आघाडीवर आहे.

  10. बिहारच्या भाजप मुख्यालयासमोर जल्लोषास सुरुवात

    पाटणा येथील बिहार भाजप मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मतमोजणीत सध्या NDA ला 125 ठिकाणी आघाडी आहे, याचा जल्लोष करत कार्यकर्ते एकमेकांना अभिनंदन करत आहेत.

  11. निवडणुकीत राजदच जिंकणार - मनोज झा

    सध्या मतमोजणीत राष्ट्रीय जनता दल मागे आहे. पण काही तासांत ही परिस्थिती बदले. या निवडणुकीत आम्हीच जिंकू, असा विश्वास राजदचे खासदार मनोज झा यांनी व्यक्त केला.

    सध्या NDA 125 च्या आसपास जागांवर आघाडीवर आहे. तर राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनचे उमेदवार जवळपास 103 ठिकाणी आघाडीवर आहेत. पण मतमोजणीला अजून बराच अवधी बाकी असल्याने ही स्थिती बदलेल, असं मनोज झा म्हणाले.

  12. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास विलंब होणार - निवडणूक आयोग

    बिहार विधानसभा निवडणूक ही कोरोना साथीच्या काळात विविध प्रकारच्या निर्बंधासह घेण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्र 63 टक्क्यांनी वाढलेली आहेत. त्यामुळे निवडणूक निकाल येण्यास विलंब लागू शकतो, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

    दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली.

    बिहारमध्ये 4 कोटी लोकांनी मतदान केलं होतं. आतापर्यंत त्यापैकी फक्त एक कोटी मतांचीच मोजणी झाली आहे, असं निवडणूक आयोगाने सांगितलं.

    मतमोजणी आणि आकडे अपडेट करण्याचं काम अगदीच सुरळीत सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 1 कोटी मत मोजली गेलेली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर 65 हजार ते 1 लाख मतदान असं नियोजन करण्यात आलं होतं.

    2015 च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये 65 हजार मतदान केंद्रं होती. यंदाच्या निवडणुकीत 1 लाख 6 हजार मतदान केंद्रातून मतदान घेण्यात आलं.

    मतमोजणी केंद्रावर पूर्वी दीड हजार लोक असायचे पण आता फक्त एक हजार लोकांसह काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्यामुळे मतमोजणी केंद्रांमध्ये 63 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

  13. राजदला काँग्रेसची मदत नाही?

    बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत आघाडी करून महागठबंधनमार्फत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राजदची कामगिरी चांगली होत असली तरी कांग्रेस त्यांच्या डोक्यावरील बोजा ठरल्याचं दिसून येत आहे.

    काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत 70 जागा लढवल्या होत्या. पण ते फक्त 21 ठिकाणी आघाडीवर आहेत.

    दुसरीकडे CPI(ML)ने 19 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 14 जागांवर ते आघाडीवर आहेत.

    महागठबंधनमध्ये राजदने काँग्रेसला गरजेपेक्षा जास्त जागा सोडल्याचं राजकीय विश्लेषक सांगत होते. पण या जागा निवडून येण्यासारख्या नसल्याने त्यांना सोडण्यात आल्या, असं स्पष्टीकरण राजदने दिलं होतं.

  14. काँग्रेस नेते उदीत राज यांना EVM बाबत संशय

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसची पीछेहाट झाल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आलं होतं. तुलनेत मागील निवडणुकीपेक्षाही यंदाच्या वर्षी काँग्रेसची कामगिरी निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून देण्यात येत आहे.

    दरम्यान, काँग्रेस नेते उदीत राज यांनी या अपयशाचं खापर स्वयंचलित मतदान यंत्र (EVM) वर फोडलं आहे. त्यांनी ट्वीट करून EVM बद्दल संशय व्यक्त केला आहे.

    मंगळ ग्रह, चंद्राकडे जाणाऱ्या उपग्रह किंवा यानाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येऊ शकते, तर EVM हॅक का करता येऊ शकत नाही, असा सवाल उदीत राज यांनी उपस्थित केला आहे.

  15. भोपाळमध्ये भाजप नेत्यांचा जल्लोष

    मध्य प्रदेश पोट-निवडणुकीत भाजप 28 पैकी 19 जागांवर आघाडीवर असल्याचा जल्लोष नेत्यांनी केला.

    मध्य प्रदेशच्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलं.

    पोटनिवडणुकीत काँग्रेस 8 ठिकाणी आघाडीवर असून बसपा एका ठिकाणी पुढे आहे.

    मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा असून भाजपकडे 107 तर काँग्रेसकडे 87 जागा आहेत.

  16. NDA 127 तर महागठबंधन 100 ठिकाणी आघाडीवर

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत 243 जागांचे प्राथमिक कल हाती आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर महागठबंधन सुरुवातीला काही वेळ पुढे होता. पण नंतर अत्यंत अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. सकाळी दहानंतर NDA ने महागठबंधनला मागे टाकलं आहे.

    सध्याच्या स्थितीत NDA 127 तर महागठबंधन 100 ठिकाणी आघाडीवर आहे.

    पक्षःनिहाय आघाडी खालीलप्रमाणे -

    NDA

    भाजप - 73

    जद(यु) - 47

    विकासशील इन्सान पार्टी - 7

    महागठबंधन

    राजद - 61

    काँग्रेस – 20

    डावे पक्ष - 19

    याव्यतिरिक्त स्वबळावर निवडणूक लढवत असलेले लोजपा 5, MIM 2, अपक्ष 1तर अपक्ष 7 ठिकाणी आघाडीवर आहेत.

  17. गुजरात पोटनिवडणुकीत आठही जागांवर भाजपला आघाडी

    गुजरात विधानसभेच्या पोट-निवडणुकीत सर्वच्या सर्व आठ जागांवर भाजपलाच आघाडी मिळाली आहे. याठिकाणची पोट निवडणूक बिहार विधानसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्यात आली होती. या आठ जागांवर विजय मिळवल्यास भाजपलं गुजरातमधील आपलं काठावरचं बहुमत आणखी मजबूत करता येणार आहे

  18. मध्य प्रदेशात भाजप 15 ठिकाणी आघाडीवर

    मध्य प्रदेश विधानसभेच्या पोट-निवडणुकीत भाजप 15 ठिकाणी आघाडीवर आहे. राज्यात एकूण 28 ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

    पोट निवडणूक होत असलेल्या जागांपैकी 25 जागा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या होत्या. तसंच इतर कारणामुळे रिक्त झालेल्या इतर 3 जागा आहेत.

  19. पाटण्याच्या जद(यु) कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी

    विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आघाडी मिळत असल्याचं दिसल्यानंतर होताच जनता दल (संयुक्त) च्या कार्यकर्त्यांनी पाटण्यात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सध्यातरी कार्यकर्ते कोणताही जल्लोष घोषणाबाजी करत नसून फक्त टीव्हीवर मतमोजणी पाहण्यास त्यांनी पसंती दिली आहे.

  20. LIVE: बिहार निकालांचे ताजे आकडे - कोण कुठे जिंकतंय?