You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात कोरोनाचे 1,089 नवीन रुग्ण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19,063
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
ऑनलाईन शाळा किती उपयोगी?
आज दिवसभरात महत्त्वाचं काय घडलं?
नमस्कार मंडळी,
आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्यांची माहिती बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली.
आता आजच्या दिवसापुरतं हे लाईव्ह कव्हरेज थांबवण्याची वेळ आली आहे. उद्या सकाळी आपली भेट होईल. पण, त्यापूर्वी आजच्या अपडेट्सवर एक नजर टाकूया....
1.महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या 1,089 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे शुक्रवारी 37 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19,063 एवढी झाली आहे.
2.भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,390 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 56,342 वर पोहोचली आहे.
3.जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 40 लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर आतापर्यंत 2 लाख 70 हजार जणांचा मृत्यू झालाआहे.
4."मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही मुंबईत अफवा पसरवली जातआहे. पण, सगळी सरकारी यंत्रणा तणावाखाली काम करत आहे. केंद्र सरकारला विनंती करतो की,पोलिसांना विश्रांती देण्यासाठी अधिकचं मनुष्यबळ हवं आहे. त्यासाठी केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी करणार आहोत." – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
5.एप्रिल महिन्यात अमेरिकेतल्या 2.05 कोटी नागरिकांना नोकरी गमवावी लागली आहे.
6.CBSEच्या 10 वी आणि12 वीच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार आहे.
7."अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता फक्त थर्ड इअरची अंतिम परीक्षा होणारआहे. इतरांच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्यात येईल." - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री
शुभ रात्री.
मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही अफवा- उद्धव ठाकरे
11 ते 17 मे दरम्यान मुंबई APMC बंद राहणार
सोमवार म्हणजेच 11 मे पासून एपीएमसी मार्केट 17 मे पर्यंत राहणार बंद. पणन विभागाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम या दिवसात होईल.
तसंच APMC कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, व्यापारी कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची तपासणी देखील होणार आहे
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री काय म्हणाले?
महाराष्ट्रात कोरोनाचे 1,089 नवीन रुग्ण
राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या 1,089 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे शुक्रवारी 37 जणांचा मृत्यू झाला. बऱ्या झालेल्या 169 रुग्णांना घरी सोडण्यात आलं.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19,063 एवढी झाली आहे. आतापर्यंत 3,470 रुग्ण कोरोनाच्या संसर्गातून बरे होऊन घरी परतले आहेत.
#CoronaPodcast : आज काय घडलं?
#CoronaPodcast : महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याचे उद्धव ठाकरेंनी संकेत दिलेत का? मुंबई लष्कराच्या ताब्यात नाही पण पोलिसांवरील ताण कमी करायला केंद्रीय यंत्रणांची मदत घेणार. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवाण परदेशींची बदली, इक्बाल चहल नवे आयुक्त, अंतिम परीक्षा वगळता महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा रद्द. औरंगाबादजवळ 15 मजुरांचा मालगाडीखाली येऊन मृत्यू.
पाहा बीबीसी मराठीचा कोरोना पॉडकास्ट –
जालना ते उत्तर प्रदेश मार्गावर 2 रेल्वे धावणार – रावसाहेब दानवे
जालना-औरंगाबाद रेल्वे मार्गावर सटाणा शिवारात (करमाड परिसर) रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
या परिस्थितीत पूर्ण मदत निश्चित करण्या व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयानं जालना ते उत्तर प्रदेश या मार्गावर 2 गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना या रेल्वे गाइयातून उत्तर प्रदेशला नेण्यात येणार आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली आहे.
प्रवीण परदेशींची बदली, सरकारनं बळीचा बकरा बनवल्याची भाजप नेत्यांची टीका
जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 40 लाखांपर्यंत
जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 40 लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर आतापर्यंत 2 लाख 70 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक 12 लाख इतकी आहे, तर 75 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यात अजून सरकारला यश आलेलं नाही - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
कोरोनाची साखळी तोडण्यात अजून आपल्याला यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता कडक बंधन पाळावी लागणार आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं आहे.
त्यांनी मांडलेले इतर मुद्दे -
1.सर्वपक्षीय नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यांनी अनेक सूचना केल्या. कोरोनाच्या लढ्यात सगळे पक्ष एकत्र आलेत. सरकारच्या पाठीशी आहोत, असं सगळ्यांनी सांगितलं.
2. औरंगाबादजवळ मजुरांचा जो अपघात झाला, त्यामुळे मला दु:ख झालं. मजुरांना मी सांगतो की,तुम्ही अस्वस्थ होऊ नका. तुमची जेवण्याची, खाण्याची सोय सरकार करत आहे.
3. मुंबई, पुण्यातून ट्रेनच्या माध्यमातून मजुरांना गावी पाठवलं जात आहे. फक्त गर्दी करू नका. संयम कायम ठेवा. सरकार तुमच्यासोबत आहे.
4. खरं तर औरंगाबादमधून रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे मग भुसावळला जायला या मजुरांना कुणी सांगितलं, याची काही कल्पना नाही.
5. मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही मुंबईत अफवा पसरवली जात आहे. पण, लष्कर कशाला पाहिजे? या लढाईतले जवान आपण सगळे आहोत. हे युद्ध आपल्याला लढायचं आहे. लष्कर मुंबईत येणार नाही.
6. सगळी सरकारी यंत्रणा तणावाखाली काम करत आहे. केंद्र सरकारला विनंती करतो की पोलिसांना विश्रांती देण्यासाठी अधिकचं मनुष्यबळ हवं आहे. त्यासाठी केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी करणार आहोत.
7. रेड झोनमधून इतरत्र ये जा करता येणार नाही. लॉकडाऊन म्हणजे गतिरोधक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यात अजून आपल्याला यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता कडक बंधन पाळावी लागणार आहेत.
8. डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये गलथानपणा करायचा नाही. कारवाई करायची वेळ आणू नका.
9. लॉकाडऊनचं काय करायचं हे तुम्ही ठरवायचंय. तुम्ही जेवढी कडक बंधनं पाळाल, तेवढं लवकर हे संपेल. अजूनही काही ठिकाणी शिस्त बिघडलेली दिसतेय. जेवढी बंधनं तोडाल, तेवढी दिरंगाई होईल.
अमेरिकेत एप्रिल महिन्यात 2 कोटी नागरिकांच्या नोकरीवर गदा
एप्रिल महिन्यात अमेरिकेतल्या 2.05 कोटी नागरिकांना नोकरी गमवावी लागली आहे.
सध्या अमेरिकेतील बेरोजगारीचा दर 14.7% इतका असून तो दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वाधिक दर आहे.
दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील बेरोजगारीचा दर 3.5 % होता.
अमेरिकेच्या श्रम मंत्रालयाच्या अहवालात ही माहितीसमोर आली आहे.
असं असलं तरी, 2 कोटी नागरिकांची नोकरी जाऊ शकते, हे अपेक्षितच होतं, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी Fox Newsला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ गटाचा अहवाल सादर
कोरोनामुळे संकटात असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ गटानं त्यांचा अहवाल सादर केला आहे.
या तज्ज्ञ गटात अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अर्थ सचिव राजीव मित्तल, कृषी सचिव एकनाथ डवले आदींचा समावेश होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज हा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला.
हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल व मंत्रिमंडळाच्या बैठकीतच त्यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारचा AIIB सोबत 50 कोटी डॉलरचा प्रोजेक्ट
भारत सरकारनं कोरोना व्हायरसचा सामना करण्याकरता एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक(AIIB) सोबत 50 कोटी डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
AIIBनं पहिल्यांदाच भारत सरकारसोबत आरोग्य क्षेत्रात सहकार्य करण्य़ासाठी करार केला आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
वंदे भारत मोहीम काय आहे?
परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे वंदे भारत मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार विविध देशातील नागरिकांना एअर इंडियाच्या विमानांमधून भारतात आणले जाईल.
वंदे भारत मोहीम काय आहे या मोहीमेद्वारे अनिवासी भारतीयांना भारतात कसे आणले जाईल पाहा या व्हीडिओत...
लॉकडाऊनमध्ये आयुष्य 'नॉर्मल' करण्यासाठी वेगवेगळे देश काय करत आहेत?
मालदीवहून शेकडो भारतीयांना नौदल आणतंय परत
विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारनं ‘वंदे भारत’ नावाची मोहीम सुरू केली. भारतीय नौदलही यात हातभार लावत आहे.
नौदलानं मालदीवमध्ये अडकलेल्या 700 हून अधिक भारतीयांना देशात परत आणण्याचं कार्य हाती घेतलं आहे.
यापूर्वी दुबई आणि अबू-धाबीमधून दोन विमान 300 हून अधिक भारतीयांना घेऊन देशात परतले आहेत.
सिंगापूरहून एक विमान 234 जणांना घेऊन दिल्लीला पोहोचलं आहे.
पुढच्या आठवड्यात भारतातून 12 देशांमध्ये 64 फ्लाईट जातील, त्याद्वारे जवळपास 15 हजार भारतीयांना देशात परत आणलं जाईल.
‘वंदे भारत’ मोहिमेच्या माध्यमातून 2 लाख भारतीयांना मायदेशी आणलं जाईल, असं म्हटलं जात आहे.
CBSEच्या 10 वी, 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान
CBSEच्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखेविषयी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
आता या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे.
मजूरांनी आपला नंबर येईपर्यंत जीव धोक्यात घालू नये – अजित पवार
औरंगाबादजवळील रेल्वे अपघाताच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, “परप्रांतीय मजूर बांधवांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. आपला नंबर येईपर्यंत जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करू नये.
“महाराष्ट्रानं गेले दीड महिने राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या साडे सहा लाख मजूर बांधवांच्या अन्नपाणी,निवारा,वैद्यकीय उपचारांची सोय केली. ती व्यवस्था आजही सुरू आहे,यापुढेही सुरू राहील.”