You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 हजारांहून अधिक

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. मृतदेहापासूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

  3. उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

  4. गुरुवारी (30 एप्रिल) महाराष्ट्र, भारत आणि जगभरात काय घडलं?

    नमस्कार,

    कोरोना व्हायरसविषयीचे लाईव्ह अपडेट्स बीबीसी मराठी दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आज म्हणजेच गुरुवारी (30 एप्रिल) दिवसभरात काय घडलं, हेही आम्ही तुम्हाला सांगितलं.

    आता आजच्यापुरतं हे लाईव्ह कव्हरेज थांबवण्याची वेळ आहे. उद्या परत एकदा आपली भेट होईलच.

    पण त्यापूर्वी आजच्या महत्त्वाच्या अपडेट्सवर एकदा नजर टाकूया आणि मग टाटा, बाय-बाय करूया...

    1.महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 583 नवीन रुग्ण आढळले असून 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 हजार 498 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील 459 जणांचा मृत्यू झाला आहे.

    2.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 33 हजार 610 वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 75 जणांचा मृत्यू झाला आहे.

    3.जगभरात कोरोनाचे 32 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि 2 लाख 28 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

    4.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकर निवडणूक घ्या, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. कोरोना व्हायरसमुळे ही निवडणूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.

    5.कोरोनामुळे मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत अमेरिकेतल्या 3 कोटी नागरिकांच्या नोकरीवर गदा आली आहे.

    6.कोरोना संकटातून सावरण्यासाठी गरिबांना 65 हजार कोटी रुपयांच्या मदतीची गरज असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

    7.रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं, "मला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी चीन सगळं काही करेल. जेणेकरून माझे विरोधी बाईडेन जिंकतील आणि चीन एकदम सहजपणे व्यापार करू शकेल."

    चीननं यावर प्रत्युत्तर देताना म्हटलं की, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्हाला काहीही रस नाही.

    गुड नाईट, शुभ रात्री.

  5. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रस नाही – चीन

    अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीही रस नसल्याचं चीननं म्हटलं आहे.

    यापूर्वी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं, "मला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी चीन सगळं काही करेल. जेणेकरून माझे विरोधक बायडन जिंकतील आणि चीन एकदम सहजपणे व्यापार करू शकेल."

    चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रंप यांच्या वक्तव्याला फेटाळून लावत म्हटलं आहे की,अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनला रस नाही.

    "डोनाल्ड ट्रंप निवडणुकीत अधिक मतं मिळवण्यासाठी चीनवर आरोप करून त्यांचे विरोधक बायडन यांची प्रतिमा 'चीन-समर्थक' अशी तयार करू पाहत आहे," असं ग्लोबल टाईम्समध्ये तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    चीननं कोरोना व्हायरसवर मिळवलेलं नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय समुदायावर चीनचा वाढता प्रभाव यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.

  6. लॉकडाऊनमुळे कोळिणींचा रोजगार ठप्प, गाठीशी असलेले पैसे मोडणंही झालं अवघड

  7. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारच्याही पुढे

    गुरुवारी राज्यात कोरोनाचे नवीन 583 रुग्ण आढळले असून राज्यातील 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 19 पुरुष, तर 8 महिला आहेत.

    राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 10 हजार 498 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 1773 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

    कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील 459 जणांचा मृत्यू झाला आहे.

    राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं ही माहिती जाहीर केली आहे.

  8. #CoronaPodcast : जगात, देशात आणि राज्यात आज काय घडलं?

    #CoronaPodcast : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण पेटलं. राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याची मागणी. रेमदेसीवीर औषध कोरोनाला थांबवू शकतं का?

    पाहा हा लाईव्ह कार्यक्रम.

  9. 'महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकर निवडणूक घ्या'

    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी, अशा विनंतीचं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.

    राज्यातील सध्याचं अस्थितरतेचं वातावरण दूर करण्यासाठी विधानपरिषदेच्या ज्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त आहेत, त्यांच्यासाठी लवकर निवडणूक जाहीर करावी, अशी विनंती राज्यपालांनी केली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अनेक ठिकाणी सूट जाहीर केली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठीची निवडणूक मार्गदर्शक तत्वांनुसार घेतली जाऊ शकते, असं या पत्रात राज्यपालांनी म्हटलंय.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे 27 मेपूर्वी त्यांना एका सभागृहाचं सदस्य म्हणून निवडून यावं लागेल.

    कोरोना व्हायरसमुळे निवडणूक आयोगानं ही निवडणूक तात्पुरती स्थगित केली होती.

  10. महाराष्ट्र सरकारच्या बसेस विद्यार्थ्यांना घेऊन कोटा येथून रवाना

    राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोटा येथून निघाल्या आहेत. या सर्व बसेसचे निघण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

    तसंच प्रवासादरम्यान सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे लवकरच हे विद्यार्थी आपापल्या जिल्ह्यात सुखरूप पोहचतील.

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

  11. धारावीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण

    मुंबईतल्या धारावीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 369 इतकी झाली आहे. धारावीत आतापर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली आहे.

  12. भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 33 हजार 610

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 33 हजार 610 वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 75 जणांचा मृत्यू झाला आहे.

    देशात आतापर्यंत 8 हजार 372 जणांवरील उपचार यशस्वी झाले आहेत.

  13. अमरावतीमधील 72 विद्यार्थी कोटा इथून परत येणार – यशोमती ठाकूर

    "राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना सुखरूप परत आणण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. परिवहन विभागाकडून वाहनांची व्यवस्था करण्यात येत असून,अमरावती जिल्ह्यातील एकूण 72 विद्यार्थी लवकरच कोटा येथून स्वगृही परतणार आहेत," अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

  14. कोरोनामुळे विद्यापीठ, UPSC, MPSC परीक्षांचं काय होणार?

  15. गरिबांना 65 हजार कोटी रुपयांच्या मदतीची गरज – रघुराम राजन

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली.

    कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम, या विषयावर ही चर्चा होती.

    "लॉकडाऊनच्या काळात गरिबांना मदत करायची असल्यास त्यासाठी 65 हजार कोटी रुपयांची गरज आहे. भारताचा जीडीपी 200 लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे 65 हजार कोटी रुपये मोठी रक्कम नाहीये," असं राजन यांनी यावेळी म्हटलं.

    याशिवाय लॉकडाऊन कधी आणि कसं संपेल, कोरोनाचा कृषी व्यवसायावरील परिणाम आदी विषयांवरही या दोघांनी चर्चा केली.

    यासंबंधी सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही ही बातमी वाचू शकता.

  16. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, '5,500 जणांचा मृत्यू झाला तर मी काय करू?'

    ब्राझीलमध्ये बुधवारी कोरोनाचे 6,276 नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 80 हजारापर्यंत पोहोचली आहे.

    कोरोनामुळे आतापर्यंत देशातील 5 हजार 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

    असं असलं तरी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी सुरुवातीपासूनच कोरोनाच्या संकटाला गांभीर्यानं घेतलेलं नाहीये.

    नुकतंच पत्रकारांनी त्यांना देशातील वाढत्या मृत्यूंबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "लोक मरत आहेत, तर मी काय करू? तुम्हाला काय वाटतं, मी काय करावं?"

  17. आम्ही तुमच्यासाठी पहारा देतो पण आमच्यासाठी कोण.....?

  18. पुण्यात 4 महिन्यांचं बाळ कोरोनामुक्त – अजित पवार

    "ससून हॉस्पिटलमध्ये 7 अत्यवस्थ रुग्ण आणि एक अवघं 4 महिन्यांचं बाळ कोरोनामुक्त झाल्याची बातमी अतिशय दिलासा आणि नवी उमेद देणारी आहे. ससून हॉस्पिटलच्या आरोग्य व्यवस्थापनानं प्रामाणिकपणे बजावलेल्या कर्तव्याचं हे फळ आहे," असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

  19. मालेगावात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा

    मालेगावमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 253 वर पोहोचली असून नाशिक जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 276 झाली आहे.यात 13 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.

  20. वरळी कोरोनामुक्त, धारावीचं काय?

    मुंबई शहरातील वरळी आणि धारावीमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेनं काय नियोजन केलं आहे? वरळी आणि धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध पावलं उचलली जात आहेत? सांगत आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर.