मान्सूनविषयी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाले आहेत. 30 मे रोजी मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांत दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
मान्सूननं केरळचा जवळपास संपूर्ण भाग आणि ईशान्येकडील सर्व राज्यांत म्हणजे मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ही राज्ये व्यापली आहेत. तसंच मेघालय, आसाम लक्षद्वीपमध्येही मान्सूननं पदार्पण केलं आहे.
फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं, तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळमध्ये गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
पुढच्या 2-3 दिवसांत मान्सून दक्षिण तामिळनाडू, मन्नारच्या आखाताचा काही भाग, बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होईल आणि आसाम तसंच अरुणाचलचा उर्वरीत भागही व्यापेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झाला आहे. साधारणपणे 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे.
सध्या केरळ आणि माहे मध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिक्कीम, अरुणाचलमध्येही ऑरेंज अलर्ट, तर आसाम मेघालयमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे देशात उष्णतेची लाटही कायम आहे, बिहारमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट तर वायव्येकडील राज्ये, मध्य भारत आणि पूर्व भारतातील ओडिसामध्येही उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पण 31 मे आणि 1 जूनपासून पुढच्या काही दिवसांत या उष्णतेपासून उत्तर भारताला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
तर दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.