नैऋत्य मोसमी वारे केरळच्या वेशीवर
असून पुढच्या 24 तासात केरळमधील हवामानाची स्थिती
मॉन्सून ऑनसेटसाठी पोषक असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे
तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं
जाहीर करतात. केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतो आहे.
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5
मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे
मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो. केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी
पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारणपणे 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे.
अर्थात, जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीएवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे.
दरम्यान, उत्तर भारताला मात्र उन्हाचा तडाखा बसतो आहे.
पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. मात्र 30 तारखेनंतर इथे राहणा-या लोकांना थोडा दिलासा मिळेल.
महाराष्ट्राचा विचार केला, तर उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत या काळात आकाश अंशतः ढगाळ राहील. राज्यात बुधवारी ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे ४५.२°C कमाल तापमानाची नोंद झाली. तर जेऊर येथे २२.०°C हे राज्यात सर्वात कमी किमान तापमान होते