You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन मांझी होणार ओडिशाचे नवे मुख्यमंत्री
आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच राज्यातील सर्व अपडेट्सही इथे वाचता येतील.
थोडक्यात
- ओडिशामध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाने मोहन मांझी यांना नेतेपदी निवडलं आहे. ते आता ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होतील.
- सुप्रीम कोर्टांनं नीट-युजी परीक्षा 2024 चे निकाल रद्द करुन परत परीक्षा घेण्याच्या मागणीच्या याचिकेवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएकडून उत्तर मागितलं आहे.
- बांगलादेशात रोहिंग्या आश्रितांच्या छावणीत झालेल्या हिंसाचारात 3 रोहिंग्याचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 लोक जखमी झाले आहेत.
- पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
- पूर्व आफ्रिकेतील देश मालावी देशाच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या विमानाचा ढिगारा सापडला आहे. यामध्ये कोणीही जिवंत असल्याचं दिसलेलं नाही. या विमानात उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह काही इतर प्रवासी होते.
- मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन अंबडच्या तहसिलदारांनी भेट घेतली आहे. आज जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जरांगे यांना दिला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
लाईव्ह कव्हरेज
ओंकार करंबेळकर
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत बदल होणार का? पुढचा हप्ता कधी मिळणार?
पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
याविषयी माहिती देताना मोदींनी X वर लिहिलं की, “आमचं सरकार देशभरातील शेतकरी बंधू-भगिनींचे जीवन सुसह्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी पहिलं काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
“या अंतर्गत, पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल.”सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मनोज जरांगे यांची तहसिलदारांनी घेतली भेट, उपचार घेण्यास नकार
मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन अंबडच्या तहसिलदारांनी भेट घेतली आहे. आज जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जरांगे यांना दिला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
अंबडचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी या भेटीनंतर सांगितले, “आम्ही पुन्हा जरांगे यांना उपचार घेण्यासाठी सांगणार आहोत असं अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणालेत. त्यांची शरीर प्रकृती जर व्यवस्थित असेल तर त्यांना उपोषण सुरू ठेवता येईल. मनोज जरांगे यांच्या मागण्या, त्यांची उपोषणानंतर प्रकृती आम्ही शासनाला कळवलेली आहे.”
जरांगे यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक प्रतिसाद देत असून जरांगे यांनी उपचार घ्यावेत असं तहसीलदार शेळके म्हणालेत.
दरम्यान आता पर्यंत सरकारचे शिष्टमंडळ येणार की नाही याबाबत कळविण्यात आलं नसल्याची प्रतिक्रिया शेळके यांनी दिलीय.
एकनाथ खडसे गिरीश महाजन विधानसभेतही एकत्र राहतील? मंत्री रक्षा खडसे म्हणतात...
चंद्राबाबू नायडूंची विधिमंडळ नेतेपदी निवड, चौथ्यांदा घेणार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आंध्र प्रदेशमध्ये एनडीए आघाडीने चंद्राबाबू नायडू यांची नेतेपदी निवड केली.
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशात विधानसभेची निवडणूकही झाली होती. या निवडणुकीत टीडीपीच्या नेतृत्वाखालील आघाडीला यश मिळालं.
मंगळवारी (11 जून) एनडीएच्या आमदारांच्या बैठकीत जन सेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं की, “भाजप, जन सेना आणि टीडीपीच्या सर्व आमदारांनी आंध्र प्रदेशचा नवीन मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावावर सहमती व्यक्त केली आहे.”
चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
आंध्र प्रदेशमधील विधानसभेच्या 175 जागांपैकी टीडीपीनं 135जागांवर विजय मिळवला. जन सेना पक्षानं 21 आणि भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे.
जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला केवळ 11 जागा जिंकता आल्या.
NEET परीक्षेच्या निकालाचा नेमका वाद काय आहे?
सुप्रीम कोर्टाने यावर्षी झालेली NEET परीक्षा रद्द करण्यात यावी आणि पुनर्परीक्षा घेण्यात यावी, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे.
या प्रकरणाची सुनावणी 8 जुलैला करण्यात येईल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
दरम्यान, अॅडव्होकेट मॅथ्यूज जे यांनी प्रवेशासंबंधीची प्रक्रिया थांबवावी, असे निर्देश देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावली.
वैद्यकीय शिक्षणासाठीच्या NEET परीक्षेचा निकाल 4 जूनला लागला. विविध कारणांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती.
या परीक्षेच्या निकालाचा नेमका वाद काय आहे? वाचा सविस्तर-
गिरीश महाजन- एकनाथ खडसे विधानसभेतही एकत्र काम करतील? रक्षा खडसे म्हणाल्या...
इलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीत अॅपलच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची धमकी का दिली?
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी अॅपल आणि ओपन एआय दरम्यान झालेल्या भागिदारीवर नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, ते आपल्या कंपनीच्या परिसरामध्ये अॅपलच्या उत्पादनांवर प्रतिबंध लावतील.
अॅपल आणि ओपन एआयमध्ये झालेली भागिदारी हे सुरक्षा नियमांचं उल्लंघन आहे आणि ते सहन करता येणार नाही, असं मस्क यांचं म्हणणं आहे.
मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं आहे की, “जर अॅपल ओपन एआय आपल्या सिस्टीममध्ये आणणार असेल तर माझ्या कंपनीत अॅपलच्या उत्पादनांचा वापर होणार नाही. हे सुरक्षा नियमांचं उल्लंघन आहे.”
अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी सोमवारी (10 जून) ओपन आय सोबत आपल्या भागीदारीची घोषणा केली.
त्यांनी एक्सवर पोस्ट केलं की, " अॅपल इंटेलिजन्स लॉन्च करण्यात येत आहे. एआयच्या जगातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे पूर्णतः खाजगी वापरासाठी आहे आणि तुम्ही दैनंदिन वापरासाठी जे अॅप वापरता त्यांना अधिक सोयीस्कर बनवू शकेल.”
अॅपल इंटेलिजन्सला आयएसओ 18आणि आयपॅड ओएस 18सोबत लाँच केलं जाईल.
NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने मागितली शिख समुदाय आणि हरभजन सिंहची माफी
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याने शिख समुदायाबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
कामरान अकमल याने आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने कामरान अकमलच्या विधानावर म्हटलं की, त्यांना लाज वाटायला हवी.
कामरान अकमलने एक्सवर पोस्ट लिहित म्हटलं, “माझ्या वक्तव्याचा मला खेद वाटतोय आणि मी हरभजन सिंह तसंच शिख समुदायाची माफी मागतो.”
“माझे शब्द अनुचित आणि अपमानजनक होते. मी जगभरातील शिखांचा सन्मान करतो. माझा उद्देश कोणालाही दुखावण्याचा नव्हता. मी माफी मागतो.”
कामरान अकमलच्या विधानावर हरभजन सिंहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं आहे, “तुझा खूप खूप धिक्कार...बोलण्याआधी तू शिखांचा इतिहास तर जाणून घ्यायला हवा होता.”
“जेव्हा आक्रमणकर्त्यांनी माता-भगिनींचं अपहरण केलं होतं, तेव्हा आम्ही शिखांनी त्यांना वाचवलं होतं. वेळ नेहमी 12 वाजण्याचीच असायची. तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्हाला आमचे आभार मानायला हवेत.”
कामरान अकमलने भारत आणि पाकिस्तानदरम्यान रविवारी (9 जून) झालेल्या मॅच दरम्यान पाकिस्तानी न्यूज चॅनेलवरील एका शोमध्ये म्हटलं, “शेवटचा ओव्हर अर्शदीप सिंह टाकणार आहे. पण त्याला लय सापडलीये असं वाटत नाही. 12 वाजले आहेत.”
अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6धावांनी विजय मिळवला.
शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 18धावांची गरज होती. पण अर्शदीपच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला 11 धावाच करता आला आणि पाकिस्तानचा पराभव झाला.
बीबीसी मराठीचं व्हॉट्स अप चॅनेल फॉलो करा आणि महत्त्वाचे अपडेट्स वाचा
नमस्कार! बीबीसी मराठीच्या व्हॉट्सॲप चॅनलवर तुम्हाला दररोज ब्रेकिंग न्यूज आणि बीबीसी मराठीवर प्रकाशित होणाऱ्या सर्व ताज्या बातम्या मिळतील.
या बातम्या तुम्ही शेअरही करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त बीबीसी मराठीच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करायचं आहे.
त्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा आणि चॅनेलला फॉलो करा.
इस्रायल-गाझामधील संघर्ष थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं समर्थन
गाझा-इस्रायल संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने समर्थन दिलं आहे.
या प्रस्तावामध्ये संघर्ष पूर्णपणे थांबविणं, हमासने ओलीस ठेवलेल्या सर्वांची सुटका तसंच इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका यांसारख्या मुख्य अटींचा समावेश आहे.
सुरक्षा परिषदेतील 15पैकी 14सदस्यांनी अमेरिकेच्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केलं. रशियाने या प्रस्तावाशी संबंधित मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही.
प्रस्तावात म्हटलं आहे की, इस्रायलची याला सहमती आहे आणि हमासला हा प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
इस्रायलने शनिवारी (8 जून) चार ओलीसांची सुटका केली.
7 ऑक्टोबरनंतर आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात 37 हज़ारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांनी प्राण गमावले आहेत. यामध्ये लहान मुवं आणि महिलांची संख्या अधिक आहे.
हमासच्या हल्लेखोरांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलच्या दक्षिण भागात हल्ला केला होता. यामध्ये 1200जणांचा मृत्यू झाला होता. हमासने 251 नागरिकांना ओलीसही ठेवलं होतं.
इस्रायल हा देश अस्तित्त्वात कसा आला? वाचा सविस्तर-मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल
इस्रायलला आव्हान देणारी हमास संघटना काय आहे? वाचा सविस्तर-
पूर्व आफ्रिकेतील मलावीच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणारं विमान बेपत्ता
पूर्व आफ्रिकेतील देश मलावीच्या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, उपराष्ट्रपती साउलोस चिलिमा यांना घेऊन जात असलेल्या विमानाचा संपर्क तुटला आहे आणि आता हे विमान कुठे आहे, याची माहिती मिळत नाहीये.
राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मलावीच्या संरक्षण दलाचं विमान उड्डाण केल्यानंतर रडारच्या क्षेत्राबाहेर निघून गेलं.
विमानाने सोमवारी (10 जून) सकाळी मलावीची राजधानी लिलोग्वे इथून उड्डाण केलं होतं. या विमानात मलावीच्या उपराष्ट्रपतींसह इतर नऊ जणही होते.
प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार विमान म्जुजु इथे लँडिंग करू शकलं नाही. म्जुजु मलावीच्या उत्तर भागातील ठिकाण आहे.
मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांततेच्या प्रतीक्षेत- सरसंघचालक मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांततेच्या प्रतीक्षेत आहे.
त्यांनी म्हटलं, “दहा वर्षं तिथे शांतता होती. असं वाटत होतं की इथली ‘बंदूक संस्कृती’ संपुष्टात आली आहे. पण अचानक तिथे हिंसा उफाळली किंवा उफाळून आणली गेली...त्याच्या झळा अजूनही बसत आहेत...लोकांना पीडा देत आहेत. त्याकडे कोण लक्ष देणार? प्राधान्यक्रमाने त्याचा विचार होणं गरजेचं आहे.”
मोहन भागवत नागपूरमधील आरएसएसच्या एका कार्यक्रमात भाषण देत होते.
मणिपूरमधील हिंसाचारावर गेल्या वर्षभरापासून विरोधक आक्रमक झाले आहेत. या हिंसाचाराला वर्ष झालं तरी पंतप्रधान अजूनही मणिपूरला न गेल्याचा मुद्दा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून सातत्याने मांडला जात आहे.
मणिपूरसोबतच मोहन भागवत यांनी निवडणुकीतील प्रचाराच्या पातळीवरही आपली भूमिका व्यक्त करताना म्हटलं की, प्रचारादरम्यान एका मर्यादेचं पालन व्हायलाच हवं.
त्यांनी म्हटलं, “खोट्याचा आधार घेता कामा नये. निवडून आलेले लोक देशाच्या संसदेत जाऊन परस्परांच्या सहकार्याने देश चालवतील. आपली ही परंपरा आहे.”
प्रचारादरम्यान ज्या प्रकारची भाषणं झाली, आपल्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ वाढेल, पररस्परांविषयी साशंकता निर्माण होईल याचाही विचार या भाषणांत केला गेला नाही, असंही भागवत यांनी म्हटलं.
नमस्कार,
आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच राज्यातील सर्व अपडेट्सही इथे वाचता येतील.
10 जूनच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.