पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत.
'ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी, असा नरेंद्र मोदींच्या आरक्षण हटाव अभियानाचा मंत्र आहे. म्हणजे सरकारी नोकऱ्याही राहणार नाहीत आणि आरक्षणही मिळणार नाही,” असं राहुल गांधींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं.
''भाजप सरकार खासगीकरणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या संपवत आहे. त्यामुळं दलित, आदिवासी आणि मागासांचं आरक्षण हिरावलं जात आहे. 2013 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये 14 लाख कायमस्वरुपी पदं होती. 2023 पर्यंत हा आकडा फक्त 8.4 लाख एवढाच राहिला आहे.''
''बीएसएनएल, एसएआयएल, बीएचईएल अशा कंपन्यांचं नुकसान करून 6 लाख पदं संपवण्यात आली आहेत. या पदांवर आरक्षणाचा लाभ मिळत होता.”
''सरकारी कामांची कंत्राटं देऊन रेल्वेसारख्या संस्थांमध्ये मागच्या दारानं ज्या नोकऱ्या संपवल्या जात आहेत, त्याची तर गणनाच नाहीत. मोदी मॉडेल हे देशातील सोयीसुविधांची लुटालूट आहे. त्यामाध्यमातून वंचितांचं अरक्षणही हिरावून घेतलं जात आहे,”असंही राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
दरम्यान, बुधवारी एका सभेत बोलताना मोदी म्हणाले की, “हिम्मत असेल तर काँग्रेस पक्षानं धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही, अशी घोषणा करावी. पण ते ही घोषणा करणार नाहीत. कारण काहीतरी गौडबंगाल आहे.”
''जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत एससी, एसटी, ओबीसी आणि सामान्य वर्गाला दिलेल्या आरक्षणाचं संरक्षण केलं जाईल,'' असंही मोदी म्हणाले.