भारताची 3 राफेल विमानं पाडल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा दावा

भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केल्याची माहिती भारत सरकारने निवेदन प्रसिद्ध करून सांगितलं.

थोडक्यात

  • भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, पाकिस्तानवर केला क्षेपणास्त्र हल्ला
  • सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात 15 ठार : भारतीय लष्करी अधिकारी
  • भारताच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची पाकिस्तानची माहिती
  • 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची भारताची माहिती, तर पाकिस्तानने 6 जागांवरच हल्ला झाल्याचे केले स्पष्ट
  • पाकिस्तानने भारताची 5 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला, मात्र भारताकडून पुष्टी नाही तसेच पाकिस्तानच्या या दाव्याची बीबीसीला स्वतंत्ररित्या शहानिशा करत नाही.
  • पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, 'आम्हाला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार'
  • पाकिस्तानच्या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची भारतीय सैन्याची माहिती
  • एअर इंडियासह अनेक विमानांचे मार्ग बदलले, अनेक उड्डाणं रद्द
  • पाकिस्तान आणि भारताने अनेक भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर, आशय येडगे, अमृता कदम

  1. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाईसजेटने विमाने वळवली

    काही भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी भारत प्रशासित काश्मीरला जाणारी विमानं रद्द केली आहेत. तसेच राजस्थान आणि पंजाबसारख्या सीमेवर असणाऱ्या राज्यांमध्ये जाणारी विमानं देखील वळवण्यात किंवा रद्द करण्यात आली आहे.

    एअर इंडियाने म्हटलं आहे की, त्यांनी जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगढ आणि राजकोटला जाणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. आज दुपारी 12 पर्यंतची विमानं रद्द केल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय विमानं दिल्लीला वळवण्यात आली आहेत.

    स्पाइसजेटने म्हटले आहे की, धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागांमधील विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे या ठिकाणांहून येणाऱ्या त्यांच्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला.

    इंडिगो एअरलाइन्सने एक्सवर पोस्ट केली आहे की, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे या शहरांना जाणाऱ्या आणि येणाऱ्या त्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

    एअर इंडिया

    फोटो स्रोत, Getty Images

  2. संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांचं आवाहन - 'सैन्यानं संयम बाळगावा'

    संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस

    फोटो स्रोत, epa

    फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस

    भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.

    संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईमुळे आम्हला तीव्र चिंता वाटते आहे."

    ते पुढे म्हणाले, "महासचिव दोन्ही देशांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. जगाला पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाचा धोका पत्करता येणार नाही."

  3. आतापर्यंत काय माहिती समोर आली?

    • भारत सरकारने पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती दिली आहे.
    • पाकिस्तानच्या लष्कराने तीन ठिकाणांवर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे.
    • पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याला 'भ्याड हल्ला' असं म्हटलं आहे.
    • पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं की, भारताच्या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, पाकिस्तानी लष्कराने भारताची दोन विमानं आणि एक ड्रोन पाडला आहे. भारताने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नसून बीबीसी देखील याची पुष्टी करू शकलेली नाही.
    • पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधल्या मुजफ्फराबादच्या रहिवाश्यांनी बीबीसीच्या इस्लामाबादमधील प्रतिनिधींना सांगितलं की, ते स्फोटाच्या मोठ्या आवाजांमुळे हादरून जागे झाले.
    • दरम्यान भारत प्रशासित काश्मीरच्या रहिवाश्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांनी नियंत्रण रेषेजवळ स्फोटांचे आवाज ऐकले आहेत.
    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आपत्कालीन सेवा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

    फोटो स्रोत, EPA

    फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आपत्कालीन सेवा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
  4. भारताची दोन विमानं आणि एक ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावा

    पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ यांनी बीबीसीला सांगितलं, "पाकिस्तानच्या लष्कराने भारताची दोन विमानं आणि एक ड्रोन पाडला आहे."

    अहमद शरीफ पुढे म्हणाले की, "पाकिस्तानचं लष्कर जमिनीवर उतरलं आहे पण ते नेमकं कुठे आहे हे सांगता येणार नाही."

    पाकिस्तानला स्वतःच संरक्षण करण्याचा अधिकार असून सध्या ती प्रक्रिया सुरु असल्याचं अहमद शरीफ म्हणाले.

  5. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले?

    भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    भारताच्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे,

    शाहबाज शरीफ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून म्हटलं आहे की, "शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला 'अ‍ॅक्ट ऑफ वॉर'(युद्धाची कृती) असं म्हटलं जाईल."

    शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, "भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत."

    ते म्हणाले की, संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे.

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

    पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, "पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्याला शत्रूशी कसा मुकाबला करायचा हे ठाऊक आहे. आम्ही शत्रूचा वाईट हेतू कधीही यशस्वी होऊ देणार नाही."

  6. भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला

    भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. याबाबत भारत सरकारने काही काळापूर्वी एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे.

    भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली,"

    भारत पाकिस्तान संघर्ष

    फोटो स्रोत, X/ADGPI

    ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे, अशीही माहिती निवेदनात दिली आहे.

    दुसरीकडे, पाकिस्तानच्या सरकारी टीव्हीने पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याचा हवाला देत म्हटलं की, भारतीय सैन्याने पाकिस्तानवर तीन ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.