एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाईसजेटने विमाने वळवली
काही भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी भारत प्रशासित काश्मीरला जाणारी विमानं रद्द केली आहेत. तसेच राजस्थान आणि पंजाबसारख्या सीमेवर असणाऱ्या राज्यांमध्ये जाणारी विमानं देखील वळवण्यात किंवा रद्द करण्यात आली आहे.
एअर इंडियाने म्हटलं आहे की, त्यांनी जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगढ आणि राजकोटला जाणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. आज दुपारी 12 पर्यंतची विमानं रद्द केल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय विमानं दिल्लीला वळवण्यात आली आहेत.
स्पाइसजेटने म्हटले आहे की, धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागांमधील विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे या ठिकाणांहून येणाऱ्या त्यांच्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला.
इंडिगो एअरलाइन्सने एक्सवर पोस्ट केली आहे की, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे या शहरांना जाणाऱ्या आणि येणाऱ्या त्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images




