भारतीय जनता पक्षाने (भाजप) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने या जाहीरनाम्याला 'मोदींची गॅरंटी संकल्प पत्र' असं नाव दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह म्हणाले की, "आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचे आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण झालं. आम्ही महिलांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं तेही आम्ही पूर्ण केलं.
भाजपचा जाहीरनामा 24 भागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये सुशासन, देशाची सुरक्षा, स्वच्छ भारत, खेळांचा विकास, पर्यावरण या विषयांचा समावेश आहे.
24 कॅरेट सोन्यासारखीच मोदींची गॅरंटीही अस्सल असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.
भाजपच्या जाहिरनाम्यातील 'ही' आहेत 17 मोठी आश्वासनं :
1) पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत रेशन, पाणी, गॅस जोडणी आणि पंतप्रधान सौर घर योजनेतून नागरिकांचं वीज बिल शून्यावर आणलं जाईल.
2) आयुष्मान भारत योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत, ते भविष्यातही दिले जातील.
3) मध्यमवर्गीय कुटुंबांना पक्की घरं बांधून देणार
4) पेपरफुटीवर मोठा कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी करू
5) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल
6) 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भारताकडे असणार आहे
7) पायाभूत सुविधा, उत्पादन, स्टार्टअप, क्रीडा, गुंतवणूक, उच्च मूल्याच्या सेवा आणि पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील.
8) एक कोटी बहिणी लखपती दीदी झाल्या, आणखी तीन कोटीं महिलांना लखपती दीदी बनवणार, तसंच, नारी वंदन अधिनियम लागू करणार
9) बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार. नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीद्वारे जमिनीचे रक्षण करणार.
10) बोटींचा विमा, मत्स्य प्रक्रिया युनिट, उपग्रहाद्वारे वेळेवर माहिती मिळणे अशा मच्छिमारांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक पैलूला बळकटी दिली जाईल.
11) मत्स्यपालन करणाऱ्यांना समुद्री तण आणि मोत्यांची लागवड करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
12) रिक्षाचालक, टॅक्सी चालक, ऑटो चालक, घरगुती कामगार, स्थलांतरित कामगार, ट्रक चालक, कुली या सर्वांना ई-श्रमशी जोडले जाईल आणि त्यांना कल्याणकारी योजना पुरवल्या जातील.
13) तिरुवल्लुवर कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारताची संस्कृती जगासमोर नेणार.
14) उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील अभिजात भाषांच्या अभ्यासाची व्यवस्था केली जाईल.
15) 2025 हा आदिवासी अभिमान वर्ष म्हणून साजरा केला जाईल.
16) एकलव्य शाळा, पीएम जनमन वन उत्पादनांचा दर्जा वाढवला जाईल आणि इको टुरिझमला प्रोत्साहन दिले जाईल.
17) ओबीसी, एससी, एसटी समाजाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सन्मान दिला जाईल.