You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी मुलाखतीदरम्यान हिंसेच्या प्रश्नावर बराच वेळ शांत राहिले आणि....
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या एका मुलाखतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी एका प्रश्नाचं उत्तर देताना बराच वेळ शांत बसून राहिल्याचं दिसून येतं.
केंब्रिज विद्यापीठात मंगळवारी 'इंडिया अॅट 75' नामक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी दाखल झाले होते.
याठिकाणी कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये इतिहास विषयाच्या सहायक प्राध्यापक आणि भारतीय वंशाच्या डॉ. श्रृती कपिला यांनी त्यांची मुलाखत घेतली.
सुमारे एक तास चाललेल्या या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी अनेक विषयांवर चर्चा केली.
पण हिंसा आणि अहिंसा यांच्याशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी बराच वेळ शांत राहिले. त्यांच्या या शांत राहण्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.
तर काहींनी राहुल यांची पाठराखण करत नरेंद्र मोदींनी चुकीचे ऐतिहासिक संदर्भ कसे दिले होते, याची आठवण सर्वांना करून दिली आहे.
मुलाखतीत राहुल गांधींना कोणता प्रश्न विचारला?
मुलाखतीदरम्यान जवळपास अर्ध्या तासाच्या संभाषणानंतर श्रृती यांनी राहुल गांधींना हिंसा आणि अहिंसेच्या संदर्भातील एक प्रश्न विचारला.
श्रृती म्हणाल्या, "आपल्या पिढीत हिंसेची एक मोठी भूमिका राहिली आहे. तुमच्या बाबतीत तर ही वैयक्तिकसुद्धा आहे. नुकतेच तुमच्या वडिलांचा (राजीव गांधी) जन्मदिवस झाला. माझा प्रश्न थोडा गांधीवादी स्वरुपाचा आहे, तसंच हिंसा आणि त्याच्यासोबत जगण्यासंदर्भातील आहे. तुमच्या बाबत तो वैयक्तिक होऊ शकतो. तुम्ही यामुळे पुढे येणाऱ्या दबावांशी निपटण्यासाठी वैयक्तिकपणे काही बोलू शकता का? भारतीय समाज हिंसा आणि अहिंसा या द्विधा मनस्थितीत कसा अडकला आहे, याबाबत काय सांगाल?
या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी काही वेळ शांत झाले. त्यानंतर काही वेळाने ते म्हणाले, "मला वाटतं, जो शब्द माझ्या डोक्यात येतो, ते क्षमा करणं आहे. पण हे अगदी योग्य शब्द नाही."
राहुल गांधी त्यानंतर पुन्हा शांत झाले. यानंतर लोक टाळी वाजवू लागले. पुढे राहुल गांधी लोकांना म्हणाले, "मी अजून विचार करत आहे."
यानंतर श्रृती कपिला म्हणाल्या, "मला तुम्हाला अडचणीत आणायचं नव्हतं."
त्यावर राहुल गांधी उत्तरले, "तुम्ही मला कोणत्याच प्रकारे अडचणीत आणलेलं नाही. हा प्रश्न मला याआधीही विचारण्यात आला आहे."
राहुल गांधी पुढे काय म्हणाले?
"मला वाटतं, आयुष्यात तुमच्या समोर...प्रामुख्याने तुम्ही जर अशा ठिकाणाहून येता...जिथं मोठ्या शक्तींमध्ये परिवर्तन होतच असतं. तिथं तुम्हाला हानी पोहोचणं ठरलेलं असतं. जे मी करतो, ते तुम्हीही करत असाल, तर तुमचीही हानी होईल. ही शक्यता नसून एक निश्चितताच आहे. कारण हे म्हणजे भर समुद्रात मोठ्या लाटांदरम्यान पोहण्यासारखं आहे. तुम्ही कधी ना कधी लाटांमध्ये अडकू शकता. जेव्हा तुम्ही लाटांमध्ये अडकता, तेव्हा त्याला कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली पाहिजे, हे तुम्ही शिकत जाता."
मला माझ्या आयुष्यात सर्वाधिक शिकवण देणारं कुणी असेल तर तो म्हणजे माझ्या वडिलांच्या निधनाचा अनुभव. यापेक्षा मोठा अनुभव कोणताच असू शकत नाही. आता मी त्याकडे पाहू शकतो. ज्या व्यक्ती किंवा शक्तीने माझ्या वडिलांना मारलं, त्यांनी मला प्रचंड मोठं दुःख दिलं. मी माझ्या वडिलांना गमावलं. आपल्यापैकी काही जणांसोबत असं घडलं असेल. हे खूपच वेदनादायक आहे. पण मी हे नाकारू शकत नाही की याच घटनेने मला इतर अनेक गोष्टी शिकवल्या. या गोष्टी मी इतर कोणत्याही परिस्थितीतून शिकलो नसतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा शिकण्यासाठी तयार असता, त्यावेळी लोक किती दुष्ट आणि वाईट आहेत, याचा तुम्हाला फरक पडत नाही."
"तुम्ही शिकण्यासाठी तयार असाल..मी मागे वळून पाहतो आणि म्हणतो की मिस्टर मोदींनी माझ्यावर हल्ला केला, देवा ते किती वाईट आहेत, ते कशाप्रकारे माझ्यावर हल्ला करत आहेत..त्याकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन असू शकतो. पण दुसरी पद्धत ही आहे की वाह...मी त्यातून काहीतरी शिकलो."
"पण तुम्हाला जेव्हा याची जाणीव होते, किंवा कोणत्याही हल्ल्याचा तुम्ही सामना करत असाल, तर पण या गोष्टीचा अनुभव त्याप्रकारे घेता येत नाही. हे त्या कवितेप्रमाणे आहे. ही तुरुंगात डांबलेल्या पॅलेस्टाईनमधील एका व्यक्तीने लिहिली होती. ही कविता मी तुम्हाला पाठवतो. या कवितेत तो जेलरला म्हणतो की मी माझ्या तुरुंगखोलीच्या लहानशा खिडकीतून तुमची मोठी तुरुंगखोली पाहू शकतो. एक प्रकारे पाहिलं तर सगळेजणच कैदेत आहेत. ते तुम्हाला पाहता आलं पाहिजे. तुम्ही तसं करू शकता तर त्याला तोंड देण्याच्या पद्धतीही तुम्ही शोधू शकता."
सोशल मीडियावर चर्चा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या मुलाखतीनंतर त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
अंकुर सिंह नामक व्यक्तीने ट्विटरवर लिहिलं, "माझ्यावर विश्वास ठेवा. हा राहुल गांधींच्या उत्तराचा अनएडिटेड व्हीडिओ आहे. 2024 चे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार."
राहुल गांधीं यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर देण्यापूर्वी काही लोकांनी टाळी वाजवली होती. यावरही काही नेटकऱ्यांनी टीका केली.
टीव्ही पत्रकार सुशांत सिन्हा यांनी ट्विट करून म्हटलं की चमचेगिरीचं हे उत्तम उदाहरण आहे, काही लोक टाळ्या वाजवत आहेत."
लंडनमध्ये दुसऱ्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले होते, "भारत राष्ट्र नव्हे तर राज्यांचा एक संघ आहे."
या वक्त्वावर टीका करताना शहजाद पूनावाला यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीचं ट्विट केलं. ते म्हणाले, "राहुल गांधी हे माणूस नाहीत. तर ते अवयवांचा एक संघ आहेत. ज्याचा प्रमुख अवयव स्पष्टपणे गायब आहे."
अभिजित मुजूमदार म्हणाले, "राहुल गांधींचं मौन इतकं भावनिक होतं की त्यांनी व्यासपीठावर चौपट विश्रांती घेतली. हे दृश्य पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)