कोरोना लस: ज्येष्ठ नागरिकांवर 94 टक्के परिणामकारक असल्याचा फायजरचा दावा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसवर 90 टक्के लस परिणामकारक असल्याचा दावा फायजर कंपनीने केला होता. आता कंपनीने सांगितले की त्यांची लस ज्येष्ठ नागरिकांवर 94 टक्के परिणामकारक आहे.

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने म्हटले आहे की त्यांची लस सर्वसामान्य रुग्णांवर 95 टक्के परिणामकारक आहे. त्यानंतर फायजर कंपनीने ही बातमी दिली आहे. नव्या चाचण्यांमुळे याआधी घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या परिणामकारकतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे संशोधकांनी सांगितले.

'ही कामगिरी उल्लेखनीय आणि सर्वांचे मनोबल वाढवणारी आहे,' असं ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक ट्रुडी लॅंग यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर संस्थेने आकडेवारीवारीसह अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार, सर्व वयोगटातील लोकांसाठी ही लस तितक्याच प्रभावीपणे काम करेल, असे कंपनीने म्हटले आहे.

विविध वयोगटातील, वांशिक समुदायातील पुरुष-महिलांवर ही लस परिणामकारक ठरेल असा संशोधकांना विश्वास आहे.

आपतकालीन परिस्थितीत लसीचा वापर व्हावा यासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला जाईल अशी माहिती संस्थेने दिली आहे.

41 हजारहून अधिक लोकांना या लशीचे दोन डोस दिले गेले आणि या आधारावरच हे संशोधन समोर आणले गेले.

दरम्यान, चीनने निर्माण केलेली कोरोनाच्या लसीने मधल्या टप्प्यातल्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.

चीनमध्ये विविध कंपन्या आणि संस्था लसनिर्मितीवर काम करत आहेत. त्यापैकी सिनोव्हॅक बायोटेक कंपनीच्या लसीने हा टप्पा पूर्ण केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या लसीची चाचणी 700 लोकांवर घेण्यात आली होती. त्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये 'Pfizer', 'BioNTech' आणि 'Moderna' या कंपन्यांनी कोरोना व्हायरस विरोधातील 'लशी' च्या क्लिनिकल चाचण्यांचे परिणाम अत्यंत चांगले आल्याचा दावा केला आहे.

कोव्हिड-19 विरोधातील इतर 'लसी' अजून विकासाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यावर आहेत. तर, बेल्जियमची कंपनी 'Janssen' कडून बनवण्यात आलेल्या कोरोना विरोधातील 'लशी' ची इंग्लंडमध्ये चाचणी होत आहे.

आपल्याला लशींची गरज का आहे?

कोव्हिड-19 मुळे थांबलेलं जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी आपल्याला लशींची गरज आहे.

सद्य स्थितीतही जगभरात मोठ्या संख्येने लोक कोव्हिड-19 च्या संसर्गाला बळी पडण्याची शक्यता आहे. कोव्हिड-19 विरोधातील लढ्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. या बंधनांमुळेच आपण कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंवर प्रतिबंध घालू शकलो आहोत. लस आल्यावर सर्व गोष्टी सुरळीतपणे चालतील अशी वैज्ञानिकांना आशा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)