You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदींची बोहरा समुदायाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, 2 वंदे भारत एक्स्प्रेसचंही उद्घाटन
देशाला नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन अर्पित करताना मला आनंद होत आहे, अशी मराठीतून सुरूवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (10 फेब्रुवारी) महाराष्ट्रातल्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन झालं.
त्यानंतर मुंबईतल्या मरोळमध्ये अल्जामिया-तुस-सैफीया(द सैफी अकादमी) च्या नवीन परिसराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. अल्जामिया-तुस-सैफिया ही दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे.
सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था समाजाच्या शैक्षणिक परंपरा आणि साहित्यविषयक संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे.
"तुमच्या सर्वांना भेटणं म्हणजे माझ्यासाठी कुटुंबाला भेटण्यासारखं आहे. मी गेल्या चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडला गेला आहे. मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे," असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
यावेळी दाऊदी बोहरा समुदायाकडून केल्या जाणाऱ्या समाजिक कामांची पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली.
"बोहरा कुटुंबातील लोक जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी मी तिथं गेल्यावर ते मला भेटायला येतात. एवढं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे," असं त्यांनी म्हटलं.
'तुळजापूरच्या भवानीचं, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन सोपं होणार'
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन मार्गांवर या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत.
'वंदे भारत' एक्सप्रेसच्या वेगामुळे हा प्रवास नेहमीपेक्षा एक ते दोन तासांनी कमी होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विणी वैष्णव यांचे आभार मानले.
मोदी सरकारनं यंदा पहिल्यांदा रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 13,500 कोटी रुपये दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
उद्घाटनाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, या दोन्ही गाड्या देशाच्या आर्थिक राजधानीला आस्थेच्या शहरांशी जोडेल. यामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वांनाच फायदा होणार आहे.
या गाड्यांमुळे शिर्डीच्या साईबाबांचं, तुळजापूरच्या भवानीचं आणि पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन करणं सोपं होणार आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
त्यांनी पुढे म्हटलं, "देश मोठ्या वेगाने 'वंदे भारत' ट्रेन सुरू करत आहे. आता देशभरातले खासदार त्यांच्या भागात वंदे भारत सुरू करण्याची मागणी करत आहे. देशातल्या 17 राज्यांमधल्या 108 जिल्ह्यांमधून 'वंदे भारत' जाते.
पाचपट अधिक जास्त पैसे यंदा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. डबल इंजिन सरकरामुळे महाराष्ट्राता विकास कामांना वेग येईल."
पायाभूत सोयी-सुविधांबद्दल बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, यामुळे गरिबांना रोजगार मिळतो, श्रमिकांना, मध्यमवर्गांना सर्वांना रोजगार मिळेल. पायाभूत सुविधांमुळे व्यापारउदीम वाढेल.
'वंदे भारत'ची वैशिष्ट्यं
या दोन्ही रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रात धावणाऱ्या 'वंदे भारत' रेल्वेंची संख्या चारवर पोहोचणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे मुंबई-अहमदाबाद आणि बिलासपूर-नागपूर वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर वंदे भारत रेल्वेविषयीच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)