You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजीराजे छत्रपती : 'औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1.औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही - संभाजीराजे छत्रपती
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विरोध केला आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापत असतानाच अबू आझमी यांनी त्याविषयी विधान केलं आहे.
'औरंगजेब हा वाईट व्यक्ती नव्हता', असं विधान अबू आझमी यांनी केलं आहे. त्या विधानावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
"औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे,तर देशात राहण्याचा अधिकार नाही," असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे.
'अबू आझमी महाराष्ट्रात काय राहतायत? त्यांची असं बोलण्याची हिम्मत कशी होते?' असा सवाल त्यांनी केला आहे.
"अशा व्यक्तीला सर्वांत आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेलकं पाहिजे," अशी टीकाही त्यांनी केलीय.
2. केंद्रात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान- रोहित पवार
7 ऑगस्ट रोजी निती आयोगाची बैठक दिल्लीत पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांकडे 18 हजार कोटींच्या विकास कामाचे प्रस्ताव पाठवले आहेत. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री सर्वांत शेवटच्या रांगेत उभे असल्याचं फोटोत दिसत आहे.
त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.
"एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!" असं ट्वीट रोहित पवारांनी केलं आहे.
3. नख लावाल तर फाडून टाकणार - निलेश राणेंचा केसरकरांना इशारा
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत राणे कुटुंबासोबत आपला वैयक्तिक वाद नसून आपण त्यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचं म्हटलं आहे.
केसरकर यांच्याकडून मैत्रीचा हात पुढे केल्यानंतरही भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
त्यांनी एक व्हीडिओ जारी करत म्हटलं की, "दीपक केसरकर आमच्यासोबत काम करायला तयार आहेत, म्हणजे आम्ही त्यांना थांबवत होतो की काय? दीपक केसरकर स्वत: ला खूपच महत्त्व देत आहेत. दीपक केसरकर यांनी स्वत:ची लायकी आधी ओळखून घ्यावी."
पुढे ते म्हणाले, "दीपक केसरकर तुम्ही लायकीत राहायला शिका, तुमची लायकी काय आहे, हे मागच्यावेळी सांगितलं होतं. आता त्याबद्दल काही बोलणार नाही. पण नख लावला तर तुम्हाला फाडून टाकणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा."
4. स्वस्तात टॅटू काढूण घेणं पडलं महागात; एकच सुई वापरल्यामुळे 14 जणांना एचआयव्हीची लागण
उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये स्वस्तात टॅटू काढून घेणं 14 जणांच्या चांगलच अंगलट आलं आहे. टॅटू काढताना एकच सूई वापरल्यामुळे 14 जणांना एचआयव्हीची (HIV) लागण झाली आहे.
या घटनेनंतर स्वस्त पार्लरमधून टॅटू काढून घेण्याबाबत अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
पंडित दिन दयाल रुग्णालयातील डॉक्टर प्रिती अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "टॅटू काढल्यानंतर 14 जणांना अचानक ताप आला. सुरुवातीला त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काही आढळून आलं नाही.
"त्यानंतर त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर या सगळ्यांना एचआयव्हीची लागण झाली असल्याचे समोर आलं आहे. या 14 जणांनी कोणतेही लैंगिक संबंध ठेवले नव्हते किंवा कोणत्याही एचआयव्ही बाधित रुग्णाचे रक्त त्यांना चढवण्यात आलं नव्हतं."
या 14 जणांनी पैसे वाचवण्यासाठी ज्या स्वस्त पार्लरमधून टॅटू काढून घेतला होता. त्याने टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता.
5. बिहारमध्ये राजकीय भूकंप?
जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचं राजकारण चांगलंच तापलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.
येत्या 24 तासांत बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकतं. जेडीयू आणि भाजपमध्ये तणाव वाढल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
जेडीयू आणि काँग्रेसने आपापल्या विधीमंडळ पक्षांची बैठकही बोलावली आहे. जेडीयू आणि भाजपची युती तुटू शकते आणि त्यानंतर जेडीयू काँग्रेससोबत जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी जेडीयूच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली असून, भाजपसोबतची युती तोडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)