You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, रायगडमधील नद्यांची पातळी किती वाढली?
राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह विविध ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
मुंबईत मंगळवारी (4 जुलै) दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, दादर, घाटकोपर, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला. सायनमध्ये अनेक भागांत पाणी साठल्याचं पाहायला मिळालं.
हवामान विभागाने पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर राहिल असा इशारा दिला आहे.
कोकणातील चिपळूण जवळील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातली वाहतूक बंद करण्यात आली आहे.
राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची काय स्थिती आहे ते जाणून घेऊया-
रायगडमध्ये पूरपरिस्थितीचा धोका
रायगडमधील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अर्थात, ही पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.
मंगळवारी (5 जुलै) या नद्यांच्या पाण्याची पातळीची आकडेवारी काय होती?
महाड शहरात यावर्षी पुन्हा पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली असून महाड प्रशासन यावर लक्ष ठेऊन असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमधील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
महाडमध्ये 9, पोलादपूरमध्ये 13, माणगावमध्ये 1 अशी 23 गावांमधील सुमारे 1535 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने सावित्री नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आणि ओहोटीमुळे एक मीटरने पाण्याची पातळी कमी होईल, अशी माहिती असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
25 जवानांसह एनडीआरएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सुदैवाने पाऊस थोडा कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही खाजगी बचाव पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कुठल्याही आपातकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, मंडणगड, खेड याभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.
चिपळूणमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर
कोल्हापुरात सोमवारी (4 जुलै) दिवसभर पावसाची संततधार कायम राहिली. दिवसभर पावसाचा जोर होता.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाउस होत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)