'शरद पवार मुख्यमंत्री होणं काळाची गरज'- यशोमती ठाकूर #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

1. 'शरद पवार मुख्यमंत्री होणं काळाची गरज' - यशोमती ठाकूर

"शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज चित्र वेगळच असतं," असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

महिला व बाल विकासमंत्री योशमती ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं, "शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर चित्र काही वेगळच असतं. शरद पवार काळाची गरज आहेत. कोणी कितीही तीर मारले तरी सरकार अस्थिर होणार नाही."

महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज पेक्षागृहाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. तसंच त्यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार आणि खासदार नवनीत राणाही उपस्थित होत्या.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत असताना यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

भाजप आणि मनसे एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तीव्र शब्दांत टीका करत असताना दुसऱ्याबाजूला सरकारमधील मंत्र्यांनीच 'शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि ते काळाची गरज आहेत' असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "यशोमतीताई, मला वाटतं शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे. त्याचा उपयोग संपूर्ण भारतात होईल. देता प्रस्ताव?" असा प्रश्नही त्यांनी यशोमती ठाकूर यांना विचारला.

काँग्रेसच्या काही आमदारांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यासाठी ही भेट हवी होती, असं काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.

महाविकास आघाडीत काँग्रेस अस्वस्थ आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

2. सत्ता नाही म्हणून राज्यात एक गट अस्वस्थ आहे - शरद पवार

"राज्य आपल्या हातात आलं आहे, पण त्यांच्या हातात राहिलं नाही म्हणून एक गट अस्वस्थ आहे," असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला लगावला आहे.

केंद्रातील सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. काही ना काही करून त्रास दिला जातोय असंही ते म्हणाले. टीव्ही 9 नं हे वृत्त दिलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, "गेल्या 40 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहे. घरावर केलेल्या हल्ल्याचा दोष कर्मचाऱ्यांना देत नाही. नेतृत्त्व चुकीचं असलं की असं होतं. सामान्य कर्मचाऱ्यांना भडकवण्यात आलं," असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी मुंबईत झालेल्या दंगलीचे दाखले दिले.

"नरसिंहराव यांच्या काळात दंगली त्यावेळी मी महाराष्ट्रात दंगली झालेल्या भागात जायचो. तिथे हिंदू-मुस्लीम दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात होता. शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई शहर सुरळीत केलं होतं. अशा संकटातून सावरावं लागतं," असंही पवार म्हणाले.

3. JNU मध्ये मांसाहारावरून दोन विद्यार्थी गटात पुन्हा संघर्ष

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्ष झाला. जेएनयू कॅम्पसमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना यांनी एकमेकांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

मेसमध्ये मांसाहार जेवणावरून हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. अभाविपने विद्यापीठाच्या कावेरी हॉस्टेलमध्ये मांसाहर जेवणाचा विरोधा केला असा डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे. बीबीसी हिंदीने हे वृत्त दिलं आहे.

विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुंडंट्स असोसिएशनने (आईसा) एक ट्वीट करत दावा केला आहे की, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला ज्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

काही रिपोर्ट्सनुसार पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. पोलिसांकडे तक्रार केल्याचं काही विद्यार्थी संघटनांनी सांगितलं. पोलिसांकडून मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांना मांसाहार जेवण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असा दावा त्यांनी केला. तसंच अभाविपने मेसच्या सचिवांवरही हल्ला केल्याचा आरोप आहे.

"अभाविपचे गुंड आम्हाला सांगणारे कोण आहेत की आम्ही काय खायचे आणि काय नाही?" असा प्रश्नही आयशी घोष यांनी उपस्थित केला आहे.

रविवारी (11 एप्रिल) राम नवमी निमित्त अभाविपने कावेरी आणि पेरियार हॉस्टेल दरम्यान पूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्याचाही आरोप आहे.

जेएनयूमध्ये बीबीसीचे सहयोगी पत्रकार चंदन शर्मा यांनी सांगितलं, रात्री दहा वाजेपर्यंत विद्यापीठाचे वातावरण तणावाचे होते. आता कॅम्पसमध्ये पोलिसांचाही बंदोबस्त आहे. हिंदुत्ववादी विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे की रामनवमी पूजेदरम्यान डाव्या संघटनांनी घोषणाबाजी केली आणि जेएनयूचे हिंदूकरण होत असल्याचा दावा केला. रमजानच्या महिन्यात जेएनयूमध्ये इफ्तार होऊ शकते तर मग रामनवमीची पूजा का नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला."

दुसऱ्या बाजूला डाव्या विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे की अभाविप जेएनयू कॅम्पसमध्ये हिंदू विचारधारा थोपण्याचा प्रयत्न करत आहेत.

4. 'संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही,' मनसेला आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त भूमिका घेतल्यानंतर राजकारण तापलं आहे. रविवारी रामनवमी (10 एप्रिल) निमित्त शिवसेना भवनासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी भोंगा लावून हनुमान चालीसा पठण केलं.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, "संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही. स्टंटबाजीलाही मी भाव देत नाही."

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पक्ष वाचवण्यासाठी आम्ही कोणाच्या दाढीला बांधलेले नाही असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "मशिदींवर भोंगे 'आदी' चालतात,पण हनुमान चालिसा 'आदी' चालत नाही? प्रतिक्रिया'आदी' गोष्टी विचाराअंती द्या. पक्ष 'संपला' आदी म्हणताय? आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही." असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लागावला आहे.

राज ठाकरे यांची आता 12 एप्रिल रोजी ठाण्यात सभा होणार आहे. शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याला पार पडलेल्या सभेनंतर ठाण्याची सभा ही उत्तरसभा असेल, असं मनसेकडून सांगण्यात येत आहे.

5. राज्यात एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे उष्णतेची लाट

महाराष्ट्रात आणखी दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम असण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याने पुढचे दोन दिवस तरी महाराष्ट्रात तापमानवाढ कायम राहिल असे दिसते.

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मात्र पावसाळी वातावरण आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत रविवारी (10 एप्रिल) अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसंच सोमवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात कमाल तापमान 41 अंशावर आहे तर रविवारी अकोल्यात राज्यातील उच्चांक असे 43. 9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातही तापमान 40 अंशाच्या पुढे आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)