You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमृता फडणवीस म्हणतात, 'नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले...' #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. अमृता फडवणीसांचा ट्विटद्वारे महाविकास आघाडी मधील नेत्यांवर हल्लाबोल
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्र सरकारनं किराणा मालाच्या दुकानांमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह इतर काही मुद्द्यांवर अमृता यांनी ट्वीट केलं आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.
अमृता फडणवीसांनी ट्वीटमध्ये "थोडक्यात उत्तर द्यावे - 50 मार्क्स" असं लिहून त्यापुढं तीन पर्याय दिले आहेत. त्यात "Naughty नामर्द, बिगडे नवाब आणि नन्हें पटोले" असे तीन पर्याय आहेत.
"या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर त्यांनी याद्वारे अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा आहे.
तसंच, "रिकाम्या जागा भरा - 50 मार्क्स, असा प्रश्नही त्यांनी मांडला आहे. त्यात _____शराब नही होती !, हरामखोर का मतलब _____है आणि सुनने में आया है _____नामर्द है!" असे प्रश्नही अमृता फडणवीसांनी विचारले आहेत.
#WakeUp, #Confused अशा हॅशटॅगसह त्यांनी हे ट्वीट केले आहेत.
आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
2.गोडसेंची फक्त भूमिका केली, विचारसरणी स्वीकारली नाही - अमोल कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे याची भूमिका साकारल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी आत्मक्लेश करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
आळंदीमध्ये महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन करून आणि काही वेळ त्यासमोर बसून डॉ. अमोल कोल्हे यांनी हा आत्मक्लेश केला आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
डॉ. कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची भूमिका केल्यानं अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. मात्र, महात्मा गांधींचे विचार शाश्वत आहेत. यावर ठाम विश्वास असल्याचं कोल्हे म्हणाले.
"मी नथुरामची भूमिका केली, पण ती विचारसरणी स्वीकारली असा त्याचा अर्थ नाही. महात्मा गांधी यांच्या खुनाचे कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो," असं कोल्हे म्हणाले.
दरम्यान, नथुराम गोडसेच्या भूमिकेत असलेल्या अमोल कोल्हेंचा हा चित्रपट रविवारी प्रदर्शित होत आहे.
3.कोरोना संपेपर्यंत मास्क मुक्ती नाही, अजित पवार यांचे स्पष्टीकरण
कोरोनाचा संसंर्ग पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं बंधनकारक असेल, असं राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झालेली नाही. याबाबतच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचंही अजित पवार म्हणाले. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
काही देशांनी मास्कचा वापर करण्याचा नियम शिथिल केला असून मास्कपासून मुक्ती केलेली असली, तरी महाराष्ट्रात सद्यस्थितीत मास्क परिधान करणं गरजेचं असल्याचं पवारांनी सांगितलं.
करोना संपेपर्यंत महाराष्ट्रात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करावाच लागेल, असंही पवारांनी यावेळी अगदी स्पष्ट केलं आहे.
4. उत्तर प्रदेशात निवडणूक पूर्व एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाची बंदी
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल सादर करण्यास ही बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं.
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमानं या काळात एक्झिट पोल प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही. नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई आणि दोन वर्षांपर्यंत शिक्षेचीही तरतूद असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश पटेल यांनी निवडणूक आयोगाकडं याबाबत मागणी केली होती. एक्झिट पोलमुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असं म्हणत त्यांनी यावर आक्षेप घेतला होता.
5. आणखी एक धर्मसंसद, धर्मांतर घडवणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
धर्मसंसदेतील वक्तव्यांवरून तापलेलं वातावरण थंड होण्याआधीच आता प्रयागराज येथील धर्मसंसदेतून पुन्हा एकदा काही वादग्रस्त वक्तव्यं समोल आल्याचं पाहायला मिळालं आहे. आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या धर्मसंसदेत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावं, धर्मांतर घडवणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि यति नरसिंहानंद तसंच जितेंद्र त्यागी उर्फ वसीम रिझवी यांची सुटका करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले.
यावेळी महामंडलेश्वर प्रभुदानंद महाराज यांनी मुस्लीमांविषयी काही वक्तव्यं केली. त्यांचा उल्लेख 'जिहादी बिल्ली' तर हिंदू हे कबूतर असल्याचं ते म्हणाले. हिंदुंचा सन्मान करता येत नसेल त्यांनी बांगलादेश किंवा पाकिस्तानात निघून जावं असंही ते म्हणाले.
यावेळी शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती यांनी देवांकडून शस्त्र धारण करा असंही म्हटलं. तसंच त्यांनी यावेळी 'रोको, टोको और ना मानने पर ठोक दो' अशा प्रकारचंही वक्तव्य केलं. हिंदुंनी पाच मुलं जन्माला घालावी असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)