You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सरोगसीमुळे 'रेडिमेड मुलं' मिळालेल्या मातांना काय वाटतं?-तस्लिमा नसरीन #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. सरोगसीमुळे 'रेडिमेड मुलं' मिळालेल्या मातांना काय वाटतं?-तस्लिमा नसरीन यांचं विधान चर्चेत
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या सरोगसीद्वारे जन्मलेल्या बाळाची चर्चा सुरू असतानाच लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलेल्या विधानामुळं नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
तस्लिमा नसरीन यांनी एक ट्वीट करत सरोगसीद्वारे आई बनणाऱ्या महिलांच्या भावनांवरच प्रश्न उपस्थित करणारं वक्तव्य केलं आहे.
"सरोगसीद्वारे 'रेडिमेड मुलं' मिळतात तेव्हा या मातांना नेमकं कसं वाटतं? प्रत्यक्ष बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या जशा भावना असतात तशाच त्यांच्याही भावना असतात का?" असं तस्लिमा नसरीन यांनी म्हटलं आहे.
"गरीब महिलांमुळंच सरोगसी शक्य आहे. जर तुम्हाला खरंच एखादं मूल हवं असेल तर अनाथांना दत्तक घ्या. पण हे केवळ स्वार्थीपणा आणि अहंकाराचं लक्षण आहे, असं नसरीन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं.
2. गोवा निवडणुकीत शेलार-राऊत आमने सामने, राऊत म्हणाले-बचेंगे तो और भी लढेंगे
गोव्यातील निवडणुकीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आशिष शेलार यांनी दिलेल्या आव्हानाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं.
टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट वाचलं तर राऊत सांगतील त्याठिकाणी चहा आणि जेवण देईल, असं थेट आव्हान आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलं होतं. त्यावर राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
'शेलारांना मी नेहमीच चहा पाजतो. भाजप 1989 पासून गोव्यात काम करत आहे. सलग दोन वेळा त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. पण डिपॉझिट जप्त झालं म्हणजे लढूच नये,' असं नसल्याचं राऊत म्हणाले.
"बचेंगे तो और भी लढेंगे, असा मराठा साम्राज्याचा मंत्र आहे आणि तसंच लढणारे आम्ही लोक आहोत. तुमच्यासारखं भ्रष्ट, माफिया, व्याभिचारी यांना तिकिटं देऊन आम्हीही जिंकू शकलो असतो, असंही राऊत म्हणाले.
3. उत्तर प्रदेशात प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहांकडूनच कोरोना नियमांची पायमल्ली
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं कोरोनाच्या नियमांची आणि निर्बंधांची पायमल्ली केल्याचं पाहायला मिळालं. प्रत्यक्ष केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या प्रचारात नियम पायदळी तुडवले गेल्याचं पाहायला मिळालं.
एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अमित शाह यांनी शुक्रवारी (21 जानेवारी) पश्चिम युपीमधील कैराना मतदारसंघात प्रचार केला. अमित शाह यांनी याठिकाणी घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेत प्रचार केला. मात्र यावेळी कोरोनाच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं.
अमित शाह यांनी स्वतः मास्क लावलेला नव्हता. तसंच सोशल डिस्टन्सिंगबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांचीही ऐशी-तैशी झाल्याचं पाहायला मिळालं.
निवडणूक आयोगानं केवळ पाच जणांसह घरोघरी जाऊन प्रचाराची परवानगी दिली आहे. पण शाह यांच्याबरोबर प्रचंड गर्दी आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात असल्याचं पाहायला मिळालं.
4. 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यामधून वगळलं महात्मा गांधींचं आवडतं भजन
अमर जवान ज्योतीच्या वादानंतर केंद्र सरकारनं केलेल्या आणखी एका बदलाची सध्या चर्चा सुरू आहे. ते म्हणजे 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यातून महात्मा गांधींची आवडतं ख्रिस्ती भजन वगळल्याचा प्रकार.
लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
प्रजासत्ताक दिनानंतर 29 जानेवारील होणाऱ्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्यात वाजवल्या जाणाऱ्या धूनमध्ये महात्मा गांधींचं आवडतं 'अबाइड विद मी' हे गीतही असतं. पण यावर्षी हे गीत हटवण्यात आलं आहे.
हे गीत यापूर्वीही काढून टाकण्यात आलं होतं. 2020 मध्ये हे गीत सोहळ्यातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर झालेल्या वादानंतर 2021 मध्ये पुन्हा या गीताचा समावेश करण्यात आला होता.
केंद्र सरकारनं यावर्षीपासून प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्येही बदल केले आहेत. त्यात एक दिवस आधी 23 जानेवारीपासून म्हणजे सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीपासून सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
5. यंदा मुंबईत रंगणार आयपीएलचा थरार, तीन मैदानात सर्व सामने होण्याची शक्यता
आयपीएलच्या 2022 च्या हंगामाची स्पर्धा ही मुंबईमध्ये रंगणार असल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईमधल्या तीन स्टेडियममध्येच या हंगामाचे सर्व सामने होतील, असं सांगितलं जात आहे.
दिव्य मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बीसीसीआयच्या सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबईतील वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय आणि नवी मुंबईचं DY पाटील स्टेडियम याठिकाणी हे सामने होतील.
आणखी मैदानांवर सामने आयोजित करण्याची गरज भासल्यास पुण्यातही काही सामने आयोजित करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळं यंदाही प्रेक्षकांविनाच ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धा सुरू होण्याच्या तारखबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही. यापूर्वी 2 एप्रिलपासून सामने सुरू होणार असं सांगितलं जात होतं, तर आता 27 मार्चपासून स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 12 आणि 13 फेब्रुवारीला संघांसाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)