क्रांती रेडकर : 'समीर वानखेडे यांची संपत्ती त्यांच्या आईची' नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना आता क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या महागड्या जीवनशैलीवरून मलिकांनी टीका केली होती. प्रामाणिक अधिकाऱ्यांना कोट्यवधींचे कपडे कसे परवडतात, असा सवाल त्यांनी केला होता.

त्यावर समीर वानखेडे यांची ही संपत्ती त्यांच्या आईची आहे, असा दावा क्रांती रेडकर यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

क्रांती रेडकर म्हणाल्या, "समीर यांची सर्व संपत्ती त्यांच्या आईने बनवलेली आहे जेव्हा त्या हयात होत्या. ही रक्कम नक्कीच 50 कोटी किंवा 100 कोटी एवढी नाही. समीर 15 वर्षांचे असल्यापासून ही संपत्ती आहे. यासंबंधी सर्व कागदपत्र सरकारी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या नियमानुसार वेळोवेळी सरकारला दिलेली आहेत. त्यामुळे ही बेनामी संपत्ती नाही. सावन के अंधे को हरियाली दिखती है," असा टोलाही त्यांनी नवाब मलिकांना लगावला.

'50 हजारांचा शर्ट, लाखोंच्या घड्याळं'

वसुलींचे आरोप करताना मलिक यांनी वानखेडेंच्या महागड्या जीवनशैलीवरही आरोप केलेत. 2020 मध्ये समीर वानखेडे आल्यानंतर एनसीबीनं एक खटला दाखल केला. त्यात सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोन यांना बोलावण्यात आलं.

आजपर्यंत ती केस बंद झालेली नाही किंवा आरोपपत्रही दाखल झालेलं नाही. याच केसअंतर्गत हजारो कोटींची वसुली झाली, असा आरोप मलिकांनी केला.

मालदीवमध्ये वसुली झाली असा आरोप मलिक यांनी केला आहे. मालदीवचा एवढ्या लोकांचा दौरा सोपा नसतो. त्याचा खर्च लाखोंमध्ये असतो. तो खर्च कोणत्या अकाऊंटवरून झाला याचा एनसीबीनं चौकशी करावी, असंही मलिक म्हणाले.

50 हजारांचा शर्ट घालणारे वानखेडे रोज नवे कपडे घालून समोर येतात. मोदींपेक्षाही ते पुढं निघून गेले. एक लाखांचा पट्टा, अडीच लाखांचे बूट, 25-30 लाखांची घड्याळं, ते परिधान करतात असं मलिक म्हणाले.

या काळात त्यांनी परिधान केलेल्या कपड्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

'वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी'

वानखेडे आले तेव्हापासून त्यांनी वसुलीसाठी त्यांची प्रायव्हेट आर्मी तयार केली. त्यात किरण गोसावी, मनीष भानुशाली, फ्रेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसुजा, इलू पठाण या सर्वांचा समावेश होता, असा आरोप मलिक यांनी केला.

ही प्रायव्हेट आर्मी शहरात ड्रग्जचा व्यवसाय करते. छोटी-छोटी प्रकरणं समोर येतात आणि मोठी प्रकरणं सुरू राहतात. असा आरोपही त्यांनी केलाय.

आर्यन खान प्रकरणात साईल यानं 18 कोटींच्या डीलचा आरोप केला होता. त्यात सॅम डिसुजा समोर आला आहे, तो डील असल्याचं सांगत आहे. एवढे दिवस तो गायब होता, आता एनसीबीचा यात सहभाग नसल्याचं सांगत आहे. पण त्याला शिकवून समोर आणलं आहे, असा आरोप त्यांनी केला.

एनसीबीचा यात समावेश नव्हता किरण गोसावी कार्यालयात काय करत होता. ही संपूर्ण कारवाई बनावट होती. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केलं, असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)