मध्य प्रदेश: पाऊस पडावा म्हणून अल्पवयीन मुलींना विवस्त्र फिरवलं

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मध्य प्रदेशच्या दामोह जिल्ह्यात पाऊस पडावा यासाठी सहा अल्पवयीन मुलींना विवस्त्र करून फिरवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. राज्यातील बुंदेलखंड या भागात सध्या दुष्काळ पडलेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये या अल्पवयीन मुलींना विवस्त्र फिरवत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या खांद्यावर लाकडाचा एक दांडा असून त्यावर एक बेडूक बांधलेला होता.

ज्या गावात ही घटना घडली त्या दामोह गावातील स्थानिक लोकांच्या मते, असं केल्यामुळं वरुण देव (पावसाचे देवता) प्रसन्न होतील आणि या भागात पाऊस पडेल.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हा प्रसासनानं या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेबाबत अधिकृत तक्रार मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. पण तरीही पोलिसांची तपास सुरू केला असल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

"मुलींना बळजबरी नग्न करून फिरवण्यात आल्याचं समजलं तर, तर कठोर कारवाई केली जाईल," असं दामोहमधील पोलीस अधीक्षक डीआर तेनिवार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

सर्व मुली एकत्र मिरणुकीत निघाल्याप्रमाणं या व्हीडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या मागे महिला गाणी गात जात असल्याचं दिसत आहे. या अल्पवयीन मुलींमध्ये काहींचं वय अवघं पाच वर्षे आहे.

ही मिरवणूक गावातील प्रत्येक घरासमोर थांबते आणि ही मुलं त्यांच्याकडून धान्य गोळा करतात. हे धान्य नंतर स्थानिक मंदिरात भंडारा करण्यासाठी दिलं जातं.

"असं केल्यानं पाऊस पडेल अशी आमची भावना आहे," असं या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या एका महिलेनं पीटीआयशी बोलताना सांगितलं.

मुलींच्या पालकांनी या प्रथेमध्ये मुलींच्या सहभागासाठी परवानगी दिली होती आणि स्वतःदेखील यात सहभागी झाले होते, असं दामोहचे जिल्हाधिकारी एस कृष्ण चैतन्य म्हणाले.

"अशा प्रकरणांत प्रशासन केवळ गावकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करू शकतं. अशा प्रकारच्या रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा या निरर्थक असल्याचं लोकांना समजावलं जाऊ शकतं," असं त्यांनी सांगितलं.

भारताच्या बहुतांश भागामध्ये शेती ही प्रामुख्यानं पावसावर अवलंबून आहे. त्यामुळं पावसाच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी स्थानिक लोक, रुढी-परंपरांची मदत घेतात.

काही समुदायांमध्ये यज्ञासारख्या परंपराही पाळल्या जातात. तर काही ठिकाणी बेडकांचं लग्न लावलं जातं. तसंच काही ठिकाणी वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी गाणी गात मिरवणुका काढल्या जातात.

तज्ज्ञांच्या मते अशा रुढी परंपरांमुळं लोकांचं त्यांच्या अडचणींकडे काही वेळासाठी तरी दुर्लक्ष होतं. पण काही सांस्कृतिक तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना त्यांच्या मदतीला आता कोणीही येऊ शकणार नाही असं वाटत असतं, त्यांची निराशा अशा रुढी परंपरांवरून दिसून येते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)