नितेश राणे - 'बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाइटलाइफवाल्यांनी संपवली' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. 'बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाइटलाइफवाल्यांनी संपवली,' नितेश राणेंचा टोला

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना महापालिका निवडणूक लढवणार असेल तर त्यांना शुभेच्छा. कारण त्यांच्यामुळे भाजपसाठी निवडणूक सोपी जाईल, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

'प्रचारात मग दिनो मोरिया, दिशा पटानी दिसतील आणि जुने शिवसैनिक मागेच राहतील,' असंही नितेश यांनी म्हटलं.

"बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती या नाइटलाइफवाल्यांनी संपवली आहे. शिवसेनेत आता सगळे जुने शिवसैनिक मागे पडले आहेत. गेल्या दोन वर्षांत जुने शिवसैनिक कुठेच दिसत नाहीत. जुन्या शिवसैनिकांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. ही बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना राहिली नाही," असं विधान नितेश यांनी केलं.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नारायण राणेंवर देण्यात येणार का, या प्रश्नाचं उत्तर देताना नितेश यांनी म्हटलं की,"नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची धुरा दिल्याची अद्याप अधिकृत माहिती नाही, पण नारायण राणे आशिष शेलार, लोढा यांच्यासोबत उभे राहिले तर मुंबई महापालिकेतील बेजबाबदार कारभाराला पर्याय देता येईल."

2. खुर्चीच्या मोहापायी उद्धव ठाकरे पक्षाचे नुकसान करत आहेत- चंद्रकांत पाटील

खुर्चीच्या मोहापायी तुम्ही तुमच्या पक्षाचे नुकसान करत आहात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.

"भाजप आणि शिवसेनेत 2019मध्ये योजनापूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यानही तेच करण्यात आले. हे खुर्चीचा मोह असलेल्या उद्धव ठाकरे यांना कळत नाही," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"मंदिरांचा विषयही असाच आहे. मंदिरं उघडलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चालणार नाहीत. त्यांना ते चालणार नाही म्हटल्यावर खुर्ची टिकवायची आहे म्हणून मंदिरं उघडणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली. नाहीतर मंदिरं न उघडण्याचे दुसरं काही कारणच नाही," असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

खुर्चीवर प्रेम असणारे उद्धव ठाकरे हे स्वपक्षाचेच नुकसान करत आहेत, असंही पाटील यांनी पुढे म्हटलं.

3. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत निवडणुका नको- नवाब मलिक

ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका नको, अशी भूमिका विरोध पक्ष असलेल्या भाजपने लावून धरली आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनंही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग निघत नाही तोवर कोणत्याही निवडणुका नको अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी (31 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत पालकमंत्र्यांकडून त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

टीव्ही9 मराठीने हे वृत्त दिलं आहे.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्याची स्थिती पाहून कशा लढायच्या हे ठरवलं जाईल. ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका नको ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं. तसंच येत्या 15 दिवसांत महामंडळाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल," असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

4. मी शहिदाचा मुलगा आहे, शहिदांचा अपमान सहन करणार नाही- राहुल गांधी

जालियनवाला बागेच्या नूतनीकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, "जालियनवाला बागच्या शहिदांचा असा अपमान फक्त तेच करू शकतात ज्यांना शहीदतेचा अर्थ माहीत नाही. मी शहिदाचा मुलगा आहे. मी कोणत्याही परिस्थितीत शहिदांचा अपमान सहन करणार नाही. आम्ही या अभद्र क्रूरतेच्या विरोधात आहोत."

दुसऱ्या एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटलं, "ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही ते स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना समजू शकत नाहीत."

या स्मारकाच्या जागेच्या भव्यतेबद्दल लोकांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे जालियनवाला बागेच्या नूतनीकरण केलेल्या संकुलाचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर मोदी यांनी शनिवारी (२८ ऑगस्ट) जालियनवाला बाग स्मारक स्थळावर विकसित केलेल्या काही संग्रहालयांचं देखील उद्घाटन केलं. बर्‍याच काळापासून वापरात नसलेल्या इमारतींचा योग्य पद्धतीने पुनर्वापर व्हावा या कारणासाठी इथे ही चार संग्रहालयं तयार केली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र, मोदी सरकारच्या या कामामुळे आता सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. काही इतिहासकार, डावे पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

5. मुंबईत निर्बंध उठवल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध उठवल्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहेत. 16 ऑगस्ट रोजी मुंबईत एका दिवसात 190 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. यात आता दुपटीने वाढ होत ही संख्या 400 च्या जवळ पोहोचली आहे.

मागील 24 तासात मुंबई 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 272 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत गेल्या 24 तासात केवळ एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कमी होणारा कालावधी चिंतेची बाब आहे.

मुंबईत आतापर्यंत 7,22,621 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 3106 सक्रिय रुग्ण आहेत. खबरदारी म्हणून मुंबईतील 29 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)