Rain update : मुंबईत 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

काही काळ विश्रांती घेतल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीय. मुंबईत संततधार पाऊस सुरू असून दादर, सायन, माटुंगा, माहिम या भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. सलग काही तासांपासून पाऊस सुरू असल्याने मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी आहे.

औरंगाबादमध्येही सोमवारपासून (30 ऑगस्ट) मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे कन्नड घाटात दरड कोसळली आहे. सध्या औरंगाबाद-धुळे महामार्ग बंद आहे.

परभणीतही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला असून आसपासच्या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तसंच तांदुळवाडी तलाव ओसंडून वाहत आहे.

ठाणे, पालघर, रायगड या जिल्हांतही आज दिवसभर पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय तर काही ठिकाणी संततधार पाऊस आहे.

कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र असल्याने याचा प्रभाव म्हणून आगामी 3 ते 4 दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणाचा समावेश आहे."

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मध्यम पाऊस पडलाय. तर औरंगाबाद जिलह्यात काही ठिकाणी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालीय. अजूनही काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जवळपास 12 तासापासून पाऊस सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस पडला असून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. हिंगोली, नांदेड, बुलढाणा या जिल्ह्यातील काही भागांत पाऊस सुरू आहे.

कोकणात आज (31 ऑगस्ट) आणि उद्या (1 सप्टेंबर) मुसळधार पाऊस पडेल असा इशारा कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. तर मराठवाड्यात सध्या येलो अलर्ट जारी करण्यात आला असून लातूर, उस्मानाबादमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिकमध्ये उद्यासाठी (1 सप्टेंबर) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज असून आजसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमरावती, अकोला,यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस असेल तर नागपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांत मध्यम पाऊस असेल, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.

ऑगस्टच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला होता. याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)