You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे : 'उद्धव ठाकरेंना आता उत्तर प्रदेशात जावं लागेल'
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्धव ठाकरे बोलले. त्यांनी केस टाकलीय. आता उद्धव ठाकरेंना जावं लागेल, असं नारायण राणे म्हणाले. तसंच, आता कळेल उद्धव ठाकरेंना कसं जावं लागेल ते, अशी इशारायुक्त टीकाही राणेंनी केलीय.
नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये पोहोचलीय. तिथं संभेत भाषण करताना राणे बोलत होते.
राणे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले, मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारी ही माणसं आहेत.
राणे पुढे म्हणाले, "पोलिसांनी माझं स्टेटमेंट तपासून पाहावं. अभ्यास करावा. वाटल्यास केस टाका. पहिली केस अवैध होती."
कुडाळमध्ये नारायण राणे पोहोचले असता, स्थानिक शिवसैनिकांनी राणेंविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे कुडाळमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
दरम्यान, नारायण राणे यांनी कालपासून (27 ऑगस्ट) उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा उल्लेख भाषणात टाळल्याचं दिसत होतं. मात्र, आज त्यांनी पुन्हा टीका केलीय.
काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा रत्नागिरी येथून सुरू झाला, तेव्हा भाषणादरम्यान उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांचा उल्लेख करणंही त्यांनी टाळलं.
रत्नागिरीत नारायण राणे यांनी शिवसेनाचा उल्लेखही न करता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासकामे आणि केंद्राच्या विविध योजना यांची माहिती दिली.
यावेळी आपल्या भाषणादरम्यान राणे म्हणाले, "मी रत्नागिरीत आल्यानंतर बरेच आंबा बागायतदार भेटू इच्छितात असं कळलं. त्यांनी निवेदन देऊन अनेक प्रश्न आणि समस्या कळवल्या. या निवेदनाचा पुरेपुर अभ्यास करून बागायतदारांना मोबदला मिळवून देण्यात येईल."
"माझ्या मंत्रिपदाचा उपयोग कोकणला मिळावा यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला कॅबिनेटपद देताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी दिली. यामध्ये फुड प्रोसेसिंगचाही विभाग आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कोकण दौऱ्यावर एकदा येणार आहे," असं राणे यांनी सांगितलं.
"गरीब माणूस उपाशीपोटी राहू नये यासाठी अन्नसुरक्षा योजना मोदींनी आणली. महिला आणि शालेय मुलांसाठी अनेक योजना मोदींनी आणल्या. सात वर्षांत आपल्या कामातून त्यांनी जगभरात प्रतिष्ठा मिळवली. तुम्ही आशीर्वाद द्यावेत, या शुद्ध हेतूने मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्हाला दिलेली सगळी आश्वासने मी पूर्ण करेन, असा मी तुम्हाला शब्द देतो," असं नारायण राणे म्हणाले.
जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर कोकण दौरा अर्धवट सोडून राणे मुंबईला परतले होते.
दोन दिवस नारायण राणे यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर आजपासून त्यांनी आपली यात्रा पुन्हा सुरू केली.
आजपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय कोकण दौऱ्यात राणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
रत्नागिरीत पोलिसांचा चोख बंदोबस्त
नारायण राणे आजपासून तीन दिवस कोकणात केळ ठोकून असणार आहेत.
कोर्टात जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी, "आता जपून बोलावं लागेल. टीका करणार पण वेगळ्या शब्दात" अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यामुळे राणे आज मुख्यमंत्र्यांवर कशा प्रकारे आगपाखड करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
राणेंना अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी रत्नागिरीत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात राजकीय कार्यक्रमांवर बंदी
नारायण राणेंना अटक झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवार आणि रविवारी राणे सिंधुदुर्गात यात्रा काढणार आहेत.
पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केलेत.
भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले, "प्रशासनाने जनआशीर्वाद यात्रा बंद पाडण्याचं काम करू नये. जमावबंदी घातल्यास लोकांचा उद्रेक होईल."
भाजपने आरोप केलाय की जिल्हा प्रशासनाने घातलेली बंदी जनआशीर्वाद यात्रा बंद पाडण्यासाठी असल्याचा आरोप केलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)