You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशा वर्कर्स कोण असतात? त्या नेमकं काय काम करतात?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोव्हीड-19च्या काळात केलेल्या कामाची दखल घेत WHO ने यंदाच्या ग्लोबल हेल्थ लीडर अवॉर्ड 2022 साठी भारतातल्या आशा वर्कर्सची निवड केली आहे. 10 लाखांपेक्षा महिला भारतातल्या ग्रामीण भागतल्या आरोग्यसाठी दररोज काम करत आहेत. त्या सर्वांचा या माधम्यातून सन्मान करण्यात आला आहे. जगभरातून 6 संस्थांची या पुरस्कारासाठी यंदा निवड करण्यात आली आहे.
"घरची सगळी कामं उरकून सकाळी साडेआठ वाजता कामाच्या ठिकाणी पोहचावं लागतं. कधी लसीकरणाची ड्युटी असते, तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची. घर आणि कामाचं ठिकाण 3-4 किलोमीटरचं अंतर आहे. शेअर रिक्षाने मी कामावर पोहोचते. कागदोपत्री आमच्या कामाचे 4 तास ठरलेले आहेत. पण आता कोरोना काळात रोज 10-12 तास काम होतंच. रिक्षाचे पैसेही परवडत नाहीत."
असं आशा स्वयंसेविका सुवर्णा कांबळे सांगत होत्या.
त्या पुढे सांगतात, "इतकं काम करून कोरोना काळात आमची आरोग्य सुरक्षा कुठेच नाही. पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, पीपीई किट मिळत नाहीत. जीव धोक्यात घालून काम आम्ही करतोच आहे. पण आम्हाला दिवसाला फक्त 35 रूपये मिळतात. यात रिक्षाचाही खर्च निघत नाही. रोज इतके तास काम केल्यानंतर घरचेही विचारतात तू काम करतेस मग पैसे का नाही मिळत? दिवसाचे 35 रूपये म्हणजे 1000 सरकार देतं. ते ही अनेकदा वेळेत देत नाहीत."
सुवर्णा कांबळे यांच्यासारख्या महाराष्ट्रभरात 70 हजार आशा स्वयंसेवक काम करतायेत. सगळ्यांची परिस्थिती साधारण अशीच आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून अनेकदा 'आशा वर्कर्सचं' कौतुक केलं आहे. पण फक्त कौतुकाने पोट भरत नाही. आशा वर्कर्सना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतय.
दीड वर्षात साधारण तीन हजारांहून अधिक आशांना आणि कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली. पण मूलभूत सुविधाही सरकारकडून मिळत नसल्याचं आशा स्वयंसेविकांचं म्हणणं आहे. आज राज्यातल्या 70 हजार आशा स्वयंसेवकांनी त्यांच्या विविध बेमुदत संप पुकारला आहे. यानिमित्ताने 'आशा वर्कर्स'बाबतचा हा आढावा...
आशा वर्कर्स कोण आहेत?
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते.
आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्या संदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने 'आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात.
आशा स्वयंसेवक ही गावातील स्थानिक असते. आशा स्वयंसेवकाकडून गावातील आरोग्य विषयक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी नेतृत्व करणे हे योगदान अपेक्षित असते.
राज्यात किती आशा स्वयंसेवक आहेत?
राज्यभरात साधारण 70 हजार आशा स्वयंसेवक कार्यरत आहेत.
आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1 हजार लोकसंख्येमागे 1 आशा स्वयंसेवक नियुक्त आहे तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 1500 लोकसंख्येमागे 1 आशा स्वयंसेवक नियुक्त आहे.
आदिवासी क्षेत्रात 9523 आशा स्वयंसेवक आरोग्य सेवा देत आहेत. तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक आशा स्वयंसेवक काम करत आहेत.
आशा स्वयंसेवकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काय आहेत?
साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्या आशा स्वयंसेवकांवर आहेत.
कोरोना साथीत घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का? वयोवृद्ध लोकं कोणत्या घरात राहतात, त्यांना कोणते आजार आहेत का? याचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं, होम क्वारंटाईन असलेला कोरोना रूग्णाला कोणती लक्षणं दिसतायेत याबाबत दररोज माहिती घेणं, आरोग्य केंद्रावर लोकांना तपासणीसाठी आणणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरण केंद्रांवर मदतीचे काम करणे ही कामं आशा स्वयंसेवकांनी कोरोना काळात केली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशांवर सोपवण्यात आली आहे.
आशा स्वयंसेवकाचं शिक्षण आणि प्रशिक्षण काय असतं?
आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशा आमचं शिक्षण हे आठवी पूर्ण झालेलं असावं. त्याचबरोबर बिगर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशांचे शिक्षण हे दहावी पूर्ण झालेलं असावं अशी शासनाची अट आहे.
आशा स्वयंसेविका ही विवाहित स्त्री असावी. त्याचबरोबर ती 20 ते 45 वयोगटातील असावी. या वर्गातील ज्या उमेदवारांकडून अर्ज केले जातात त्यातून तीन उमेदवारांची नावं ही ग्रामसभेला सुचित केली जातात आणि ग्रामसभेकडून या तीन उमेदवारांपैकी एका आशा स्वयंसेवकांची निवड केली जाते.
ग्रामसभेद्वारे आशा स्वयंसेवकांची निवड झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारीकडून आशा स्वयंसेविका ला नियुक्ती पत्र देण्यात येते. त्यानंतर आशा स्वयंसेविकांना 23 दिवस प्रशिक्षण दिलं जातं.
आशा स्वयंसेवकांच्या मागण्या काय आहेत?
महाराष्ट्र राज्य आशा कृती समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील सांगतात, "आशा स्वयंसेवकांना आरोग्य यंत्रणेशी निगडीत 72 कामे कामे करावी लागतात. यावर त्यांना आधारित 2000 ते 3000 मोबदला मिळतो. पण कोरोनामुळे इतर 72 कामं करता येणं शक्य नाही. त्यामुळे अधिकचा मोबदला मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना
केंद्र सरकारने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता महिन्याचे 1000 रुपयांवर काम करावे लागते आहे. आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी ही आमची मागणी आहे. कोरोना काळात जोखमीचं काम करणाऱ्या अशा स्वयंसेवकांना
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. त्याचबरोबर त्यांना दरमहा 18 हजार रुपये इतके मानधन देण्यात यावं ही आमची मागणी आहे.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीबाबात ए. ए. पाटील सांगतात, "उपमुख्यमंत्री अजित यांनी 'हवंतर संप करा आम्ही तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचार्यांकडून काम करून घेऊ' असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात 'आशांचे ऋण विसरता येणार नाही'. आशांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सन्मान करावा इतकीच आमची इच्छा आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)