कोरोना : नवाब मलिक म्हणतात, 'महाराष्ट्राला औषधं न देण्याचं केंद्राचे कंपन्यांना आदेश'

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्राला औषधं देऊ नका, असं कंपन्यांना केंद्र सरकारनं आदेश दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी सोशल मीडियाद्वारे हे आरोप केले आहेत.

नवाब मलिक म्हणाले, "निर्यात करणाऱ्या 16 कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं रेमडेसिवीरबाबत विचारलं असता, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. महाराष्ट्राला औषधं देऊ नयेत, असं केंद्र सरकारनं या कंपन्यांना आदेश दिलेत. या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं दिली, तर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा त्यांना देण्यात आलाय."

"आजच्या स्थितीत या कंपन्यांकडून रेमडेसिवीरचा साठा जप्त करून गरजूंपर्यंत पोहोचवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे पर्याय उरणार नाही," असंही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांच्या या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्र भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "नवाब मलिक यांनी असे निराधार आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावेत, अन्यथा माफी मागावी. महाविकास आघाडीनं आरोप करण्याचा खेळ थांबवून, साथ कशी रोखता येईल याकडे लक्ष देण्याची ही वेळ आहे."

"नवाब मलिक यांनी केलेले आरोप म्हणजे महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे का? तसं असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन सत्य परिस्थिती स्पष्ट केली पाहिजे. किंवा या मंत्र्यांना बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यापासून रोखलं पाहिजे."

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास, महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)