You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका 'या' 8 गोष्टी करणार
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढतोय. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर असलेल्या मुंबईत महापालिकेकडून कोरोनाला रोखण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी याबाबत माहिती देताना, कुठल्या गोष्टीवर महापालिकेकडून भर दिला जाईल, हे सांगितलं.
रुग्णांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त म्हणाले.
मुंबईत आजच्या घडीला 325 अतिरिक्त बेड्स उपलब्ध असून, आता एकूण 2466 आयसीयू बेड्स आहेत, अशी माहितीही चहल यांनी दिली.
कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका 'या' 8 गोष्टी करणार :
1) 24 वॅार्डमध्ये नोडल अधिकारी नेमणार, विशेषत: रात्री 11 ते सकाळी 7 पर्यंत विशेष लक्ष दिलं जाईल
2) रात्री प्रामुख्याने सर्व बेड्स जम्बो रुग्णालयात दिले जातील
3) रात्री फोन करणाऱ्या रुग्णाकडे कोव्हिड रिपोर्ट नसेल किंवा टेस्ट झाली नसेल, त्यांनाही संशयित म्हणून बेड दिला जाईल
4) ऑक्सिजनची गरज असेल तर स्थिर करण्याचा प्रयत्न करावा
5) लॅबना 24 तासात रिपोर्ट देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत
6) लक्षण असलेल्यांच्या रिपोर्टना प्राधान्य द्यावं
6) फोर आणि फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये कोव्हिड केअर सेंटर बनवण्याची सूचना
7) येत्या 7 दिवसात 1100 बेड्स आणि 125 ICU बेड्स उपलब्ध केले जातील
8) येत्या 5-6 आठवड्यात 3 जंबो सेंटर उभारणार असून, यात 2000 बेड्स, 200 आयसीयू आणि 70 टक्के ऑक्सिजन बेड्स असतील.
उद्धव ठाकरेंकडून बैठकांवर बैठका, निर्णय काय आणि कधी घेणार?
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन लावण्याचे स्पष्ट संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाऊनची घोषणा कधी होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 एप्रिलला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, त्यानंतर 11 एप्रिलला कोरोनानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्ससोबत बैठक घेतली.
आज (12 एप्रिल) मुख्यमंत्री राज्याच्या अर्थमंत्रालयाशी संवाद साधून आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या 50 हजारांच्या पटीत वाढत असल्यानं आणखी कडक निर्बंध लावण्यासाठी किंवा लॉकडाऊनचा पर्याय तपासण्यासाठी मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, या कडक निर्बंधांचा ते निर्णय कधी घेणार, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले, "रुग्णसंख्या इतक्या वेगानं वाढतेय की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही, तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल. कोरोनाचं अनर्थचक्र थांबवायचं असेल, तर काही काळासाठी का होईना, पण कडक निर्बंध लावावेच लागतील."
टास्क फोर्ससोबत महत्त्वपूर्ण बैठक
टास्क फोर्सच्या बैठकीत ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.
या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते.
'एसओपी तयार करणे सुरु'
टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, "गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे."
"मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवत आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
"आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल, आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील," असेही मुख्यमंत्री म्हणाले.
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी काय म्हटलं?
राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, "राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली."राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, "या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)