हाजी मलंग-श्रीमलंगगड हा वाद काय आहे?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग किंवा मलंगगडाचा वाद सुरू आहे. ही जागा कोणत्या धर्मियांची आहे याबाबत अद्याप योग्य संशोधन किंवा खुलासा झालेला नाही.

या जागेचा उल्लेख हाजी मलंग, मलंगगड, श्रीमलंग, मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करण्यात येतो. गेली अनेक वर्षे या प्रार्थनास्थळाबाबतीत चर्चा, आंदोलन आणि वाद सुरू आहेत. त्यामुळे हे स्थान नक्की दर्गा आहे की मंदिर हा एक वादाचा मुद्दा होऊन बसला आहे.

28 मार्च 2021 रोजी काय झाले होते?

28 मार्च 2021 रोजी मलंगगडावरील प्रार्थनास्थळामधील आरतीच्यावेळेस मुसलमान लोकांनी घुसखोरी केली आणि घोषणाबाजी झाली असं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे.

त्याचप्रमाणे त्याचा एक व्हीडिओही सर्वत्र व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर विशेषतः ट्वीटरवर हा व्हीडिओ हजारो लोकांनी रिट्विट केला आहे. बहुतांश ठिकाणी मुसलमान लोक मंदिरात घुसले असा उल्लेख करण्यात आला आहे.

सामना या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीत मलंगगडावरील प्रार्थनास्थळाला 'मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ' व 'मंदिर' असं संबोधलं आहे. 'मच्छिंद्रनाथाच्या समाधीस्थळी आरती सुरू असतानाच 50 ते 60 धर्मांध मंदिरात घुसले आणि त्यांनी आरती बंद पाडली. अल्ला हो अकबरचे नारे देत त्यांनी हिंदू भाविकांनी धक्काबुक्कीही केली', असं सामनाने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे. मात्र मुसलमान असा शब्द संपूर्ण बातमीत वापरलेला नाही. आरतीमध्ये घुसणाऱ्या लोकांचा उल्लेख धर्मांध असा केलेला आहे.

याच बातमीत चार दिवसांमध्ये धिंगाणेखोरांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रमेश पाटील, पराग तेली, समीर भंडारी यांनी दिल्याचंही नमूद केलं आहे. सामनाप्रमाणेच सोशल मीडियावर अनेक राजकीय पक्षांनी या घटनेवर पोस्ट केल्या आहेत.

मलंगगड कोठे आहे?

मलंगगड हा गड रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. मलंगगडाची उंची समुद्रसपाटीपासून 789 मीटर इतकी आहे. नळ राजाचा या गडाशी 700 वर्षांपूर्वी संबंध असल्याचं गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी (खंड 14) मध्ये नमूद केलं आहे. त्याच्या कार्यकाळात हाजी अब्द उल रहमान हे अरबी धर्मप्रसारक गडाच्या खालच्या टप्प्यात त्यांच्या अनुयायांसह आले असं त्यात लिहिलं आहे.

या हाजी अब्द उल रहमानांची सत्वपरिक्षा घेण्यासाठी नळराजाने आपल्या मुलीला त्यांच्याकडे पाठवलं त्यात हाजी यशस्वी झाले. म्हणून खुश झालेल्या नळ राजाने आपल्या मुलीशी त्यांचा विवाह करून दिला.

हाजी आणि त्यांच्या पत्नीची कबर आजही तेथे आहे. हे सर्व वर्णन गॅझेटियरमध्ये दिसून येतं.

पेशवे हाजी मलंगाला का मानू लागले?

1780 ते 1782 या काळामध्ये इंग्रज कल्याणला होते. त्यांना तेथून बाहेर काढण्यात पेशव्यांना यश आलं. हे यश मिळण्यामागे हाजी अब्द उल रहमानांची मदत झाली असं मानून पेशव्यांनी त्यांच्या कबरीसाठी चादर पाठवली. ही चादर घेऊन पेशव्यांतर्फे कल्याणचे ब्राह्मण काशीनाथपंत केतकर आले. याच केतकरांनी येथील कबरींचा जीर्णोद्धार केला.

केतकर कुटुंबाकडे व्यवस्था

मुसलमान व्यक्तीची कबर असली तरी त्याकाळापासून या दर्ग्याची सर्व व्यवस्था काशीनाथपंत केतकर यांच्या कुटुंबाकडे आली. ती आजतागायत सुरू आहे. येथे दर माघ पौर्णिमेला मोठा उत्सव सुरू केला, त्याला हिंदू, मुसलमान लोक ठाणे, पनवेल, कल्याणवरुन येतात असं गॅझेटियरमध्ये लिहिलं आहे. काही लोक येथे मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचं मानतात. तर महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागाच्या संकेतस्थळावर हे स्थळ एक दर्गा असल्याचं नमूद केलेलं आहे.

तसेच गोपाळ कृष्ण केतकर विरुद्ध मोहम्मद जफर मोहम्मद हुसैन या खटल्याच्या 1954 साली दिलेल्या निकालामध्ये या स्थळाचा उल्लेख दर्गा असा करण्यात आलेला आहे.

श्री मलंगगड मुक्ती आंदोलन

मलंगगडाला हाजी मलंग नाही तर श्री मलंगगड म्हटलं जावं आणि तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे अशा मागण्या पुढे ठेवून दोन-अडीच वर्षांपूर्वी श्री मलंगगड मुक्ती आंदोलन झाले. यामध्ये शिवसेनेचे तत्कालीन नेते आनंद दिघे यांनी पुढाकार घेतला होता. आनंद दिघे यांच्या संकेतस्थळावर या आंदोलनाची माहिती दिली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून दिघे यांनी हिंदूंना एकत्र आणण्याचं काम केलं म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं जाऊ असं यात म्हटलं आहे.

त्यात म्हटलं आहे, "दिघेसाहेबांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी या विषयावर सविस्तर चर्चा करून यासाठी त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेतले. बाळासाहेबांनी स्वतः या कामी पुढाकार घेऊन तमाम हिंदूना या मलंग गडावर आपली वहिवाट सुरु करण्याचा आदेश दिला. ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या धर्मकार्यासाठी स्वतःला झोकून दिले. वेळ पडल्यास प्राणाला मुकण्याची गर्जना केली. शिवसेना प्रमुखांचे आवाहन 'चलो श्री मलंग गड'! अशी गर्जना करून तमाम हिंदुत्व निष्ठांना माघी पौर्णिमेस श्री मलंग गडावर कूच करावयास लावले स्वतः जातीने या आंदोलनाची तयारी व सिद्धता केली. ठाणे जिल्ह्यास महाराष्ट्रातून 'जय मंगल श्री मंगल' चा गजर करीत हिंदुत्व निष्ठांची मांदियाळी मलंग गडावर येऊ लागली. संपूर्ण मलंगगड परिसर दरवर्षी भगवामय होऊ लागला. सर्वत्र मलंग मच्छिंद्र नाथांचा जयघोष होऊन हिंदूनी आपली वहिवाट सुरु केली."

1996 साली फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेच्या उत्सावात आनंद दिघे यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना इथं आमंत्रित केलं होतं. यावेळेस तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते.

दोन्ही बाजूंचं मत काय आहे?

सध्या सर्वत्र येत असलेल्या बातम्यांबद्दल आम्ही हाजी मलंग बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष नासीर खान यांना विचारले. त्यावर ते म्हणाले, "त्यादिवशी आरती जास्त चालली. त्यानंतर आलेल्या मुस्लीम भाविकांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांकडे प्रार्थना करण्यासाठी परवानगी मागितली. या सर्व प्रकारात शाब्दिक वादावादी झाली आणि दोन्ही बाजूंनी घोषणा देण्यात आल्या. काही लोकांनी त्या दिवशी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत तसा प्रकार घडलेला नाही. यामध्ये दोन धर्मांत तेढ वाढवण्याचा कोणाचातरी हेतू असू शकेल. "

मलंगगडाबाबत बोलताना नासीर खान म्हणाले, "आमच्या येथे 800 वर्षं जुना दर्गा आहे. इथं हिंदू मुस्लीम दोन्हीही येतात. बाबांचे सर्व धर्मात भक्त आहेत. आमच्या दर्ग्यात हिंदू ब्राह्मण विश्वस्त आहेत. तसेच ट्रस्टची हनुमान आणि शंकराची मंदिरं आहेत. तेथे हिंदू भाविक प्रार्थना करू शकतात. "

बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेचे पनवेल येथिल पालक निलेश पाटील यांनी बीबीसी मराठीकडे आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "दर पौर्णिमेला आमचे कार्यकर्ते तेथे जातात. या पौर्णिमेला कोरोनाचं कारण सांगून फक्त 4-5 कार्यकर्त्यांना परवानगी दिली होती. मात्र त्यावेळेस तेथे 40-50 मुस्लीम लोक आले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची मागणी आहे. त्यानुसार काही लोकांवर गुन्हे दाखल झाल्याचेही समजते. इथं हिंदू-मुसलमान दोन्हीही लोक प्रार्थनेला येतात. इतकी वर्षं असं कधीच झालं नव्हतं."

निलेश पाटील यांच्या मते, हे स्थळ नाथांची समाधी आहे आणि आमची त्यावर श्रद्धा आहेच असं त्यांनी सांगितलं. तर हे स्थळ मच्छिंद्रनाथ समाधी की हाजी अब्द उल रहमान यांची कबर याबाबत कोर्टात खटला सुरू आहे. ती प्रक्रिया सुरू आहे असं नासीर खान यांनी सांगितलं. मात्र दोघांनीही हिंदू-मुस्लीम इथं एकत्र येतात याचा उल्लेख केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)