You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमृता फडणवीस यांचं भाई जगताप यांना प्रत्युत्तर : 'ए भाई, तू जो कोण असशील...' #5मोठ्याबातम्या
देशभरातील वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमांमध्ये आलेल्या महत्त्वाच्या पाच बातम्या थोडक्यात पाहूया,
1. 'ए भाई, तू जो कोण असशील...' अमृता फडणवीस यांचं भाई जगताप यांना प्रत्युत्तर
"सत्तेत असताना पोलिसांची खाती आपल्या पत्नीच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली?" असा प्रश्न काँग्रेस नेते भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत असल्याने याबाबत प्रतिक्रिया देताना भाई जगताप यांनी तत्कालीन फडणवीस सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भाई जगताप यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलंय. यांदर्भात त्यांनी ट्वीट केलं असून भाई जगताप यांना इशारा दिलाय.
त्या म्हणाल्या, "ए भाई, तू जो कोण असशील- माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही 'UTI/Axis बँकेला' दिली होती. लक्षात ठेव सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचे न्हाय!"
अमृता फडणवीस यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवरून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यांनी वापरलेल्या भाषेवरूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे.
2. जे चुकीचं काम करतात त्यांनाच टार्गेट दिली जातात - कृष्ण प्रकाश
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट' दिल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात पोलीस दलातून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
"राज्याचे गृहमंत्री सहय्यक पोलीस निरीक्षकाला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील? वसुलीसाठी टार्गेट द्यायचेच असेल तर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला दिले असते. त्यामुळे यात तथ्य वाटत नाही," अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
जे अधिकारी चुकीचं काम करतात त्यांनाच असे टार्गेट देण्यात येतात असंही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी म्हटलंय.
पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे हेच आमचे टार्गेट असून 'चुकीला माफी नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.
3. मी पुन्हा येईन असं स्वप्न अजूनही जिवंत आहे- रोहित पवार
"मी पुन्हा येईन असं स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, "अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी आणि सरकारवरील आरोपांची मालिका पाहता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला आलाच असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेला प्रेस बाईट व्हीडिओ ट्वीट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न सुरू आहे यावरून मी पुन्हा येईनचं स्वप्न अजून जिवंत असल्याचं प्रतीत होतं."
अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी हॉस्पिटलमध्ये होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर भाजपने 15 तारखेला देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले.
4. परमबीर सिंह दिल्लीत कोणाला भेटले हे आम्हाला माहिती आहे- नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्यानतंर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी परमबीर सिंह यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.
"परमबीर सिंह दिल्लीत जाऊन कोणाला भेटले याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही योग्य वेळी माहिती जाहीर करू," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
परमबीर सिंह यांनी केलेले आरोप हे सुनियोजित कटकारस्थान आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
5. सत्ता गेल्याने फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले - काँग्रेस
"सत्ता गेल्यावर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस," अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
"भाजपच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी हॉस्पिटलमध्ये असल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत होते असे ट्वीट फडणवीस यांनी केले. त्यामुळे 15 तारखेला अनिल देशमुख हॉस्पिटल किंवा क्वारंटाईनमध्ये होते याबाबत भाजपने शंका उपस्थित केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)