You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दत्तात्रय होसबळे: नरेंद्र मोदींचे 'निकटवर्तीय', ज्यांनी दिली होती वाजपेयींना आणीबाणीची माहिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे अखील भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आसाममध्ये स्थान मिळवून देण्यासाठी ओळखले जातात. आसाममध्ये आपली पकड मजबूत करूनच भाजप इशान्येकडील राज्यांमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
66 वर्षीय दत्तात्रय होसबळे यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी गृहात भैय्याजी जोशी यांची जागा घेतली. जोशी यांनी तरुणांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवीन लोकांनी पुढे येऊन आरएसएसमधील जबाबदारी घ्यावी यासाठी त्यांनी राजीनामा दिला.
दत्तात्रय होसबळे बराच काळ एबीव्हीपीशी जोडले गेले होते. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला 'आसाम चलो' विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन त्यांचे सर्वात मोठे यश समजले जाते.
होसबळे यांचे जुने मित्र एम एच श्रीधर यांनी बीबीसीला सांगितलं, "ते पूर्णत: आपल्या कार्याला समर्पित आहेत. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना लिफाफ्यावर पत्ते लिहिण्यापासून ते प्रसारमाध्यमांमध्ये कणखर भूमिका मांडण्यापर्यंतचं प्रशिक्षण दिलंय. एक चांगला प्रचारक कसं बनायचं हेही त्यांनी शिकवले आहे. त्यांनी नेहमीच सोशल इंजिनिअरिंगवर लक्ष दिले."
"एबीव्हीपी आणि संघाच्या पदांवर कार्यरत राहूनही ते कायम नवीन विचार घेऊन आले. आरएसएसमध्ये नवीन नियमांसाठी ते कटिबद्ध आहेत. यात शंका नाही," असं श्रीधर सांगतात.
दुसरी विचारधारा असणाऱ्या लोकांशीही चांगले संबंध
कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील होसबळे हे त्यांचे मूळ गाव. पण दत्तात्रय होसबळे हे देशातील अनेक मुख्य जिल्ह्यांत राहिले आहेत.
श्रीधर यांच्यानुसार, "यामुळेच तळागाळातील प्रचारकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत."
'भावूक व्यक्ती' म्हणून होसबळे यांची ओळख आहे. त्यांचा कोणीही शत्रू नाही. ते समाजवादी आणि सेंटर लेफ्टशी सुद्धा जोडले गेले आहेत. त्यांच्याशी ते वैचारिक वाद-विवाद करण्यासाठी कायम तयार असतात.
नाव न छापण्याच्या अटीवरून एका काँग्रेस नेत्याने सांगितलं, "आणीबाणीच्या वेळेस त्यांच्या याच व्यक्तिमत्वाचा प्रभाव आमच्यावर पडला. आम्ही सर्व इंदिरा गांधी सरकारविरोधात होतो आणि एवढ्या खुलेपणाने त्यांच्या बोलण्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो.
समाजवादी पक्षाचे तुमुरी श्रीधर सांगतात, "आम्ही त्यांना अनेक दशकांपासून ओळखतो. आमची विचारधारा वेगळी आहे पण ते एक सामान्य व्यक्ती आहेत. त्यांनी आमच्या पक्षाचे नेते एस वेंकटरमण यांचे कायम कौतुक केले. त्यांनी मला सांगितलं की वेंकटरमण काहीही करून आपल्याला हवे ते साध्य करण्याचा विचार करणाऱ्यांपैकी नाहीत. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की आजही त्यांचा या धोरणांवर विश्वास आहे."
वाजपेयी, अडवाणी यांना आणीबाणीची माहिती दिली
दत्तात्रय होसबळे लहानपणीच संघाचे कार्यकर्ते बनले. 1970 मध्ये ते शिवमोगा येथून बंगळुरु येथे आले. नॅशनल महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर आणीबाणीविरोधात ते पुढे आले.
अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांना आणीबाणी जाहीर झाल्याची माहिती होसबळे यांनीच दिली असं सांगितलं जातं. त्यावेळी दोन्ही नेते संसदीय समितीच्या एका बैठकीसाठी बंगळुरू येथे होते.
अटक होण्यापूर्वीच ते भूमिगत झाले होते. त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. आणीबाणी हटवल्यानंतर ते पूर्णत: संघाशी जोडले गेले. 1992-2003 या कालावधीत त्यांनी एबीव्हीपीचे भारताचे आयोजक सचिव म्हणून काम केले. यानंतर त्यांना पुन्हा संघात बोलवण्यात आलं. त्यांना अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख पद देण्यात आलं.
2009 मध्ये ते संघाचे सहसचिव म्हणून निवडून आले. मुंबई, पटण्यासह अनेक शहरांमध्ये ते राहिले आहेत. आता ते उत्तर प्रदेशात आहेत.
पंतप्रधान मोदींशी जवळीक
श्रीधर सांगतात, "त्यांची विशेष बाब म्हणजे ते पंतप्रधानांशी जसा संवाद साधतील तसाच तुमच्याशीही त्यांचा संवाद असेल."
पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आलं की आरएसएसची भूमिका सरकारपेक्षा वेगळी असू शकते का? उदा. भारतीय मजदूर संघाने कामगार कायद्याला विरोध केला आहे.
तेव्हा ते म्हणाले, "मला वाटत नाही आरएसएस विरोध करेल की नाही. हा मुद्याचा विषय आहे. कायदा देशहिताच्या बाजूने नसेल तर आम्ही विरोध करू. आमची भूमिका मांडू."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुमची जवळीक असल्याने तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आला असं जेव्हा पत्रकाराने सांगितलं तेव्हा ते म्हणाले, "असं प्रसारमाध्यमांना वाटतं. पण पंतप्रधान तर 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाशीच बोलतात."
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संघ हिंदू समाजातील कोणत्याही जातीय भेदभावाच्या विरोधात असल्याचंही स्पष्ट केलं. पेजावर मुट्ट स्वामी यांच्या ब्राह्मणांनी इतर कोणत्याही जातीत लग्न करू नये या वक्तव्यांसदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की, "लग्नातील कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्याला विरोध करू आणि अनेक राज्यांनी लागू केलेल्या अशा कायद्यांचे समर्थन करतो जे चुकीच्या पद्धतीने लग्न करणाऱ्या 'लव्ह-जिहाद'सारख्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आणले गेले आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)