मनसुख हिरेनप्रकरणी ATS कडून हत्येचा गुन्हा दाखल

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. यामध्ये गाडीच्या चोरीची तक्रार दाखल करणारे गाडीमालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

त्यानंतर हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS कडे देण्यात आला. तपास हाती आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ATS ने हिरेन यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

अज्ञात व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा

महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी हत्येच्या गुन्हा नोंद केला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

एटीएसच्या अधिकार्यांनी बीबीसीशी बोलताना मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातील परिस्थितीजन्य गोष्टींवरून ही हत्या असल्याची शक्यता वाटतेय. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केल्याचं समजतं आहे. रविवारी (7 मार्च) या प्रकरणातील सर्व कागदपत्र एटीएसच्या अधिकार्यांना मिळाली.

काय आहे प्रकरण?

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर 25 फेब्रुवारी 2021 जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी (5 मार्च 2021) ठाण्याच्या मुंब्रा येथील रेती बंदर परिसरात सापडला.

ठाण्यातील रेती बंदरच्या काठावर मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे पोलिसांना सापडला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण अत्यंत गूढ बनलं आहे.

याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाशी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता.

याबद्दल माध्यमांशी शनिवारी (6 मार्च) बोलताना वाझे यांनी म्हटलं की, मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट येणार आहे. हिरेन यांच्या मृतदेहावर कोणत्यापी प्रकारच्या जखमा नाहीत, असं सांगण्यात आलं होतं. पण नेमकं काय ते पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. मीसुद्धा मृतदेह मिळाल्यानंतर चार-साडेचार तासांनीच गेलो होतो. याशिवाय इतर कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. इतर कुणी काय बोललं याबद्दलही मला माहिती नाही.

मनसुख हिरेन कोण आहेत?

मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचे व्यक्ती होते. अंबानींच्या घरासमोर सापडलेली स्कॉर्पिओ गाडीच्या चोरीची तक्रार हिरेन यांनी दिली होती.

पण ही गाडी हिरेन यांची आहे किंवा नाही याबाबत पोलिसांच्या माहितीत विसंगती होती.

पोलिसांच्या तक्रारीत ही गाडी आपण विकत घेतली आहे, असं हिरेन यांनी म्हटलं पण ही गाडी हिरेन यांची नसून दुसऱ्या एका व्यक्तीकडून त्यांनी ती ताब्यात घेतली होती, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीतून पोलिसांनी ताब्यात घेतला. हा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी 8 वाजल्याच्या आसपास मनसुख हिरेन दुकानातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. पण ते घरी परतले नाहीत. शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिसांमध्ये मनसुख हिरेन यांच्या गायब होण्याबाबत तक्रार केली.

माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत - विमला हिरेन

या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात होता. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केली, अशी चर्चा काहीजणांकडून केली जात होती. पण मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

"माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं. आमचं पूर्ण कुटुंब भरडलं जात आहे," असं विमला हिरेन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

"पोलिसांच्या सूचनेनुसार ते वेळोवेळी चौकशीला जात होते. दिवसभर त्यांना तिथं बसवलं जायचं. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कालही (4 मार्च) त्यांना बोलावलं, ते गेले पण परत आलेच नाहीत. रात्री दहा वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला."

कांदिवलीहून क्राईम ब्रॅंचच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता, त्यांनी घोडबंदरला भेटायला बोलावलं होतं, असाही दावा विमला यांनी केलाय.

मनसुख हिरेन हे कोणत्याही दबावात नव्हते, असंही त्या म्हणाल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)