You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साहित्य संमेलन: कोरोनामुळे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगिती देण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबादेत जाहीर केला. यंदा नाशिकमध्ये 26, 27 आणि 28 मार्च असे तीन दिवस साहित्य संमलेन नियोजित होतं.
कौतिकराव ठाले पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला."
जिथे संमेलनाचं आयोजन केलं जाणार होतं, त्या नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशीही याबाबत चर्चा झाल्याची ठाले पाटलांनी सांगितलं.
यंदाच्या साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झालीय. त्यांनाही संमेलनाच्या स्थगितीचा निर्णय कळवण्यात आला आहे, असं ठाले पाटलांनी सांगितले.
"साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनाही त्यांच्या पत्नीच्या मार्फत कळवण्यात आलं आहे. त्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांचं वय लक्षात घेता, हा निर्णय त्यांना आवडला आहे," असं कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.
मात्र, संमेलनाध्यक्षांच्या सत्कार आणि गौरवात कुठेच कमी पडू देणार नाही, असंही ते म्हणाले.
तसंच, पुढील तारखा कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहून, नाशिक साहित्य परिषदेकडून कळवल्या जातील. त्यावर विचार करून मग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अंतिम निर्णय घेईल.
संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरलं आहे.
डॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे.
महाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना 2010 साली 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले.
भारत सरकारने डॉ. जयंत नारळीकर यांना 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' या नागरी पुरस्काराने गौरवलं आहे. तसंच, स्मिथ्स प्राईज, अॅडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानेही डॉ. नारळीकरांचा गौरव झाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)