काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जूनमध्ये होणार - के सी वेणुगोपाल

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

येत्या जून महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली.

कार्यकारिणीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. सरकार शेतकरी आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करावी, अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब हे तिन्ही कायदे रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

याशिवाय संयुक्त संसदीय समितीमार्फत अर्णव गोस्वामी प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही सरकारला करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

कोरोनाची लस बाजारात दोन हजार रुपयांमध्ये मिळत असल्याचं वृत्त आहे. यावरही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत सरकारचं नेमकं काय धोरण आहे, हे सार्वजनिकरित्या स्पष्ट करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.

कोरोना लसीसंबंधी सरकारी योजनेमध्ये स्पष्टपणा नसल्याचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसेल, यासाठी गेल्या एका वर्षापासून पक्षात वादविवाद सुरू आहे. 18 डिसेंबर 2020 रोजी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही भाष्य केलं होतं.

'राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं असं पक्षातील 99.9 टक्के लोकांना वाटतं'

रणदीप सुरजेवाला म्हणाले होते, "काँग्रेसमध्ये 99.9 टक्के लोकांना राहुल गांधी यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं."

सोनिया गांधींनी पक्षाच्या धोरणांशी संबंधित डिसेंबरमध्ये एक बैठकही बोलावली होती. या बैठकीत गुलाम नबी आझाद, शशी थरूर, भुपिंदर सिंह हुडा यांच्यासारखे नेते सहभागी होते.

या बैठकीशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना सुरजेवाला म्हणाले होते, "कोव्हिड प्रोटोकॉलमुळे सोनिया गांधी जास्त लोकांना भेटू शकल्या नाहीत. त्यामुळे शनिवारपासून पुढचे 14 दिवस त्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेतील. ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं लक्षात घेऊन काँग्रेसने लवकरच नव्या अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तयारी सुरू आहे."

काँग्रेसमध्ये दोन गट?

गुलाम नबी आझाद यांच्यासह 23 ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाची कमकुवत होत चाललेली विचारसरणी या मुद्द्यावर ऑगस्ट महिन्यात एक पत्र लिहिलं होतं. पक्षात सुधारणा करण्यासाठी पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व देण्यात यावं, अशी मागणी या नेत्यांनी केली होती.

तसंच काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निवडणुकांचाही मुद्दा मांडला होता. तर अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस नेत्यांचा एक गट नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या विरोधात आहे.

2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)