You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'उद्धव ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी'
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली.
सध्या राज्यात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे. या सरकारविरोधी बोललं, तर त्यांना केसेसमध्ये अडकवू असं दाखवून दिलं जातंय, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे-
- आताचं अधिवेशन केवळ 6 ते 7 तासांचं अधिवेशन होतंय. आमची मागणी होती की, अधिवेशन नागपूरला झालं पाहिजे. पण राज्य सरकारनं ते घेतलं नाही. मार्चचं अधिवेशन तरी नागपूरला घ्यावं अशी घोषणा सरकारने करावी, अशी आम्ही मागणी केली. ती सुद्धा मान्य केली नाही.
- शेतकऱ्यांना कवडीचीही मदत या सरकारकडून मिळाली नाही. शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारात गेली.
- हे सरकार विविध घटकांमधील लोकांचे प्रश्न सोडवत नाही. त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अशा सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला आहे.
- देशातले सर्वाधिक कोरोनाचे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. आताही सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. या कोरोनाच्या काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात महापालिकांमध्ये, सरकारमध्ये भ्रष्टाचार मन सुन्न करणारा आहे.
- मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम या सरकारने केलं आहे. तामिळनाडूमध्ये आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. ही दुर्दैवी बाब आहे.
- ओबीसी आरक्षणाबाबत या सरकारमधले मंत्री मोर्चे काढायची भाषा करतायेत. मंत्र्यांना मोर्चा काढायचा अधिकार नसतो. त्यांनी कॅबिनेटमध्ये याची चर्चा केली पाहिजे.
- मुंबईचा विकास विशेषतः मेट्रोचं कारशेडचं कांजूरमार्गला नेण्याबाबत सरकारच्या समितीने अहवाल दिलाय. कांजूरमार्गला जर कारशेड नेलं त्याचा भुर्दंड मुंबईकरांवर पडणार आहे. तरीही राजकीय हेतूने मुंबईकरांची मेट्रो 4 वर्षं पुढे नेली आहे.
- या राज्यात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे. या सरकारविरोधी बोललं तर त्यांना केसेसमध्ये अडकवू असं दाखवून दिलं जातय. कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा राज्य सरकारला चपराक देणारे आहेत. आम्ही त्यांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत नाही. पण हे सरकार अहंकारापोटी त्यांच्या विरोधी बोलणार्या लोकांवर केसेस टाकतायत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)