पुणे : शिरूरमध्ये छेडछाडीला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे फोडले, आरोपी फरार

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पुण्यातील शिरूर परिसरात छेडछाडीचा विरोध करणाऱ्या महिलेवर हल्ला करून, तिचे डोळे फोडण्याची गंभीर घटना समोर आली आहे.

काय घटना आहे?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावरील शिरूर परिसरात घडली आहे.

37 वर्षांची महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने या महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने छेडछाडीचा जोरदार विरोध केला तर, आरोपीने महिलेवर हल्ला केला. ज्यात तिच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली आहे.

याबाबत बीबीसीशी बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, "ही घटना बुधवारी रात्री घडली. ही महिला शौचालयासाठी घराबाहेर पडली असता एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे."

ही महिला अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. पोलीस या महिलेकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत या महिलेच्या डोळ्यांना इजा कशी झाली याची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीये का?

शिरूरच्या घटनेनंतर राज्यातील ठाकरे सरकार विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेनंतर सरकारने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? असा सवाल उपस्थित केलाय.

चित्रा वाघ म्हणाल्या, "ही घटना अत्यंत कृर आहे. या महिलेने बळजबरीचा विरोध केला म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा एक डोळा पूर्णत: निकामी झालाय. तर, दुसऱ्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. या महिलेची दृष्टी गेलीये. याची जबाबदारी कोण घेणार?"

फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून तुमची जबाबदारी संपते का? असा खडा सवाल ठाकरे सरकारला भाजपकडून विचारण्यात आला आहे.

"दोन दिवसांपूर्वी नगरला मुलीवर बलात्कार झाला. पिंपरीला पेट्रोल पंपवर सामूहिक बलात्कार झाला. पुण्यात महिलांचे पाठलाग केले जातायत. याच जबाबदारी कोणाची? या सरकारमधील खूप मोठे नेते पुण्यात रहात आहेत. पण, एकानेही याची दखल घेतली नाही," असं त्या पुढे म्हणाल्या.

महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या 2019 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात साल 2019 मध्ये बलात्कार आणि खूनाच्या 47 घटना समोर आल्या.

यातील सर्वांत जास्त लातूर जिल्ह्यात 13, नागपूर ग्रामीण भागात 10, अमरावती शहरात 8 तर रायगडमध्ये 7 घटना नोंदवण्यात आल्या.

2019 मध्ये महाराष्ट्रात बलात्काराचेया 2229 गुन्हे नोंदवण्यात आले. ज्यात मुंबई शहरात सर्वांत जास्त 394, पुणे शहरात 90, पालघरमध्ये 105, पुणे ग्रामीण भागात 109 आणि ठाणे शहरात 115 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार, 2019 मध्ये महाराष्ट्रात छेडछाडीच्या 10,472 घटनांची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक छेडछाडीच्या घटना (2019)

मुंबई शहर - 2069

पुणे ग्रामीण - 425

ठाणे शहर - 426

नाशिक ग्रामीण - 187

नागपूर ग्रामीण - 167

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)