You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : देशातल्या काही जिल्ह्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याची आरोग्यमंत्र्यांची कबुली
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षववर्धन यांनी देशातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोव्हिड-19 चं देशात कम्युनिटी ट्रान्समिशन (सामूहिक संसर्ग) झालं असल्याचं मान्य केलं आहे.
देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरल्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकारने सामूहिक संसर्ग झाल्याचं मान्य केलं आहे.
कोरोना व्हायरसबाबत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आरोग्यमंत्री दर रविवारी 'संडे संवाद' हा कार्यक्रम करतात. या कार्यक्रमात देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं का? या प्रश्नाचं उत्तर देताना देशातील काही जिल्हात कोव्हिड-19 चं कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचं आरोग्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे.
देशातील शहरात कोव्हिड-19 चं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं का याबाबत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन म्हणाले, "देशातील विविध राज्यातील पश्चिमबं गालमध्येही काही भागात कोव्हिड-19 चा सामूहिक संसर्ग होणं अपेक्षित आहे. खासकरून, ज्या परिसरात मोठ्या संख्येने लोकं राहतात. पण, सामूहिक संसर्ग संपूर्ण देशात झालेला नाही."
"कम्युनिटी ट्रान्समिशन काही जिल्ह्यांपुरतंच मर्यादित आहे. आणि देशातील काही मोजक्याच राज्यांमध्ये याचा प्रभाव झालेला पाहायला मिळतोय," असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षववर्धन पुढे म्हणाले.
सद्यस्थितीत देशात 7,83,311 अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत. तर 6 लाख 59 हजार पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 88 टक्के रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
केरळमध्ये निष्काळजीपणा भोवला
केरळ राज्यात गेल्या काही दिवसात अचानक कोव्हिड-19 च्या प्रकरणात वाढ झाली. 30 जानेवारी ते 3 मे दरम्यान केरळमध्ये फक्त 499 कोरोनाग्रस्त रुग्ण आणि 2 मृत्यू झाले होते.
केरळबाबत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, "केरळाला 'ओणम' दरम्यान झालेला निष्काळजीपणा भोवला. राज्य अनलॉक होत असताना राज्यांतर्गत आणि राज्यात प्रवास सुरू झाला. पर्यटन आणि कामानिमित्त लोकांनी प्रवास केला. त्यामुळे राज्यात कोव्हिड-19 च्या केसेसमध्ये अचानक वाढ झाली."
"केरळमध्ये ओणम उत्सवादरम्यान कोरोनाचा कर्व्ह अचानक बदलला. राज्यात नवीन केसेस दुप्पट झाल्या आहेत," असं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.
केरळचं उदाहरण इतर राज्यांसाठी महत्त्वाचा धडा असल्याचं मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.
'महाराष्ट्रातही आहे सामूहिक संसर्ग'
सामूहिक संसर्गाबाबत काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचे सामुहिक संसर्ग तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलं होतं, "राज्यात सामूहिक संसर्ग निश्चित आहे. हे मान्य करून आपल्याला कंटेनमेन्ट झोन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल."
"मुंबई, पुणे, ठाणे या भागांमध्ये ज्या प्रकारचा संसर्ग पहायला मिळतोय, यात प्रत्येक रुग्णाची लिंक शोधणं अत्यंत कठीण होऊन जातं. याचं कारण तुमच्याकडे वेळ नसतो. कोणत्याही लिंकशिवाय बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिसून येते. तेव्हा या भागामध्ये कम्युनिटी स्प्रेड आहे असं म्हणणं चुकीची गोष्ट नाही," असं डॉ. आवटे यांनी म्हटलं.
डॉ. आवटेंच्या माहितीनुसार, हा प्रत्येक आजाराचा कोर्स आहे. त्यामुळे याचा विनाकारण गोंधळण्याचं कारण नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)