You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं वयाच्या 79 व्या वर्षी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
सोनी मराठीवरील 'काळूबाईच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान आशालता वाबगावकर यांच्यासह सेटवर काम करणाऱ्या 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
या घटनेनंतर 'काळूबाईच्या नावानं चांगभलं' मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.
मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता वाबगावकर यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली होती. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी विविध भाषांतील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
बासू चटर्जी यांच्या 'अपने पराये' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपटसृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
2) शेतकऱ्यांना कधीही दहशतवादी म्हटलेलं नाही - कंगना राणावत
अभिनेत्री कंगना राणावतने कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांचा उल्लेख करत केलेल्या ट्वीटसंदर्भात आता स्पष्टीकरण दिले आहे. माझ्याविरोधात अफवा पसरलवल्या जात असून मी शेतकऱ्यांना कधीही दहशतवादी म्हटलेलं नाही, असं कंगनाने ट्वीट करून सांगितलं आहे. टाइम्स नाऊनं ही बातमी दिली आहे.
20 सप्टेंबरला कंगना राणावतने कृषी विधेयकावरुन केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर निशाणा साधला होता. कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करणारे काही लोक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच दहशतवादी आहेत, असं स्पष्टीकरण आता कंगनाने दिले आहे.
ती पुढे म्हणते, "अफवांच्या बळावर पप्पूची चंपूसेना काम करत आहे. हीच अफवा पसरवते आहे. मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले हे कुणी सिद्ध करून दाखवले तर मी माफी मागून ट्विटर सोडेन."
3) मुंबई महापालिकेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच
मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदावर भाजपकडून करण्यात आलेला दावा मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. पक्षाने विचार बदलला म्हणून आता विरोधी पक्षनेते पद देता येणार नाही असंही कोर्टानं म्हटलं. लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली.
2017 मध्ये पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पालिकेतले विरोध पक्षनेते पद भाजपकडे आले. पण त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने मुंबई महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते पद हे भाजपने नाकारले आणि नियमानुसार हे पद काँग्रेसकडे गेले.
गेल्यावर्षी शिवसेना आणि भाजपची युती तुटली. राज्यातही शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. या पार्श्वभूमीवर भाजपने आता या विरोधी पक्षनेते पदावर दावा करत कोर्टात याचिका दाखल केली होती.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांचा मोठा पक्ष आहे. तेव्हा नियमानुसार काँग्रसचे नगरसेवक रवी राजा यांनी विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली होती. ती हायकोर्टाकडून कायम करण्यात आली आहे.
4) योगी सरकार दिल्लीत उभारणार सर्वात मोठी फिल्म सिटी?
भारतात सर्वात मोठी फिल्म सिटी उभारण्याचा प्रकल्प उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने हाती घेतली आहे. त्यासाठी दिल्लीत नोएडाजवळ 1000 एकर जागेची पाहणी करण्यात आली आहे.
यमुना एक्सप्रेसव्हे इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट ऑथोरिटीने (YEIDA) यासंदर्भातला प्रस्ताव योगी सरकारला पाठवला आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
फिल्मसिटीसाठी दिल्लीतील सेक्टर 21 येथील जागेची पाहणी करण्यात आली आहे. ही जागा दिल्ली-आग्रा एक्सप्रेस हायवे लगत आहे. प्रस्तावित जेवर विमानतळापासूनही जवळ आहे.
दिल्लीपासून 70 किमी तर आग्र्यापासून 150 किमी अंतरावर आहे. अशी माहिती YEIDA चे अधिकारी शैलेंद्र भाटिया यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 18 सप्टेंबरला फिल्म सिटी उभारणार असल्याची घोषणा केली होती.
5) पायल घोषच्या आरोपांवरुन अनुराग कश्यपला अटक करा, रामदास आठवलेंची मागणी
अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.
केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. पायलच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला अटक करायला हवी होती असंही मत त्यांनी मांडले आहे. झी चोवीस तासनं या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
रामदास आठवले यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "पायल घोष यांनी सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. मुंबई पोलीसांनी अनुराग कश्यप यांना अटक करायला हवी होती. तसेच या प्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय दिला पाहिजे. आरपीआयचा पायल घोषला पाठिंबा आहे."
पायल घोषने केलेल्या आरोपात तथ्य नाही असे स्पष्टीकरण अनुराग कश्यप यांनी यापूर्वीच दिले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)