You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत- सीबीआय #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. सुशांत सिंहची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत- सीबीआय अधिकाऱ्याची माहिती
सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इंडिया टुडेशी बोलताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, आताही या प्रकरणाची चौकशी सुरूच असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास सीबीआयकडे सोपवला होता. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयनंदेखील या प्रकरणी सुशांतशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीतून अनेक माहितीही समोर आली. परंतु त्याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यात मात्र अद्यापही यश आलेलं नाही.
सध्या आत्महत्येच्या अँगलवरही आपण लक्ष देत असून सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का याचाही तपास सुरू असल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
2. खासगी रुग्णालयातील खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला 3 महिने मुदतवाढ
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारित अधिसूचना काढण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
"मेस्मा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरिटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असेल. कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील," असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले
खासगी रुग्णालयं कोरोना बाधित रुग्णांकडून मनमानीपणे बिल आकारत होते. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या अधिसूचनेत जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत, त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.
3. फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरतात- रवीशंकर प्रसादांचं मार्क झुकरबर्गला पत्र
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांना एक मोठं पत्र लिहिलं आहे.
फेसबुक कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांसाठी अपशब्द वापरतात. फेसबुक इंडिया टीममधील अनेक वरिष्ठ अधिकारी विशिष्ट राजकीय विचारसरणीचे समर्थक असल्याची माहिती मिळाल्याचं प्रसाद यांनी पत्रात लिहिलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
2019 च्या निवडणुकीपूर्वी फेसबुक इंडिया व्यवस्थापनाने उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचे फेसबुक पेज हटवले किंवा त्यांची पोहोच कमी केली. फेसबुकने संतुलित आणि निष्पक्ष असायला हवं, असे प्रसाद यांनी पत्रात म्हटलं आहे. कोणत्याही संस्थेत काम करणार्या व्यक्तींची आवड आणि निवड वेगळी असू शकते. पण याचा परिणाम एखाद्या संस्थेच्या सार्वजनिक धोरणावर होऊ नये, असं प्रसाद यांनी पत्रात लिहिलंय.
4. आता खरंच पकोडे तळायची वेळ आली आहे- कपिल सिब्बल
एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी हा उणे 23.9 टक्के झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देश गंभीर आर्थिक संकटात सापडल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वक्तव्यांची आठवण करून देत चिमटा काढला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.
कपिल सिब्बल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, जीडीपी उणे 23.9 टक्के. मोदींजी तुम्हाला आठवतयं का? 'अच्छे दिन', सब का साथ सबका विकास, तुम्ही काँग्रेला साठ वर्ष दिली मला फक्त 60 महिने द्या, आता पकोडे तळायची वेळ आली आहे, ते सुद्धा विकले जाणार नाहीत.
'फक्त भाषण आणि झिरो शासन' असा टोलाही कपिल सिब्बल यांनी लगावला आहे.
5. तरुणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे- प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, चीन सोबत सुरू असलेला सीमा वाद, या मुद्यांवरून केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आता पुन्हा एकदा बेरोजगारी व संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका करायला सुरूवात केलीये. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी, बराच कालावधीपासून थांबलेल्या एसएससी व रेल्वे परीक्षांच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'तरुणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे,' असं ट्वीट त्यांनी केलंय.
"एसएससी आणि रेल्वेने अनेक परीक्षांचे निकाल वर्षांपासून थांबवून ठेवले आहेत. कशाचे निकाल अडकलेले आहेत, तर कशाची परीक्षा. सरकार कधीपर्यंत तरुणांच्या धैर्याची परीक्षा घेणार आहे?" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)