You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विजयवाडामध्ये कोव्हिड सेंटर म्हणून वापरल्या जाणाऱ्या हॉटेलला आग; 11 जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशमधील विजयवाडा इथं कोव्हिड सेंटर म्हणून उपयोग होणाऱ्या हॉटेलला आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
सुवर्ण पॅलेस असं या हॉटेलचं नाव आहे. कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सकडून या हॉटेलचा वापर केला जात होता.
आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं आंध्र प्रदेशच्या गृह राज्यमंत्री मेकाथोटी सुचरिता यांनी सांगितलं.
आगीची घटना घडल्याची माहिती देण्यासाठी पहाटे फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कोव्हिड सेंटरमध्ये 43 लोक होते. त्यात रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
बीबीसी तेलुगूनं विजयवाडा जिल्हा अग्निशमन दलाचे अधिकारी एम श्रीनिवास रेड्डी यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की, "हॉस्पिटलमधील फायर सेफ्टी सिस्टम व्यवस्थित नव्हती."
"रिसेप्शनच्या इथे विजेमध्ये बिघाड झाल्यानं आग लागली. तळमजला आणि वर पाच मजले अशी या हॉटेलच्या इमारतीची रचना आहे. ही आग भडकत वर गेली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. यातील अनेकांचा धुरामुळे गुदमरून जीव गेला. 18 जणांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे," अशी माहिती एम श्रीनिवास रेड्डी यांनी दिली.
फायर सेफ्टीचे महासंचालक एहसान रझा यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं, "या हॉटेलमध्ये हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतलं गेलं नव्हतं. त्यांनी फायर सेफ्टी विभागाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता होती. आग लागल्यास हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता आणि तिथेच नेमकी आग लागली होती."
सुवर्ण पॅलेस हॉटेल आणि रमेश हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. विजयवाडा तहसीलदारांनी हा FIR दाखल केलाय. विद्युत व्यवस्थेच त्रुटी असल्याची जाणीव हॉस्पिटल आणि हॉटेलच्या व्यवस्थापनाला होती, असा आरोप या FIR मध्ये करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दुर्घटेबाबत शोक व्यक्त केला. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. एका खाजगी रुग्णालयाने हे हॉटेल भाडेतत्वावर घेतले होते अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दुर्घटेबाबत शोक व्यक्त केला. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. एका खाजगी रुग्णालयाने हे हॉटेल भाडेतत्वावर घेतले होते अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांवर सर्वोत्तम उपचार करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिले आहेत. तसंच याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या तपासाचा अहवाल थेट मला सादर करावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
या अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना दूरध्वनी करून चर्चा केली.
दरम्यान, आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासात 10 हजार 8 रुग्ण सापडले, तर रुग्णांची एकूण संख्या 2 लाखांवर पोहोचली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)