मुंबई पाऊस: शरद पवार म्हणतात आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयाचा परिसर तुंबलेला पाहिला #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयाचा परिसर तुंबलेला पाहिला- शरद पवार

मुंबईत पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन या सखल भागात पाणी साचते. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कधीही पाणी न साचणाऱ्या नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह, चर्नी रोड यासारख्या दक्षिण मुंबईतील परिसरातही पाणी साचले.

आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयाच्या या परिसरात पाणी तुंबल्याचं पाहत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. TV9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

पावसाची परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईकरांनो काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक बुधवारी (5 ऑगस्ट) पार पडली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होती. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

या बैठकीवरून परत जात असतानाच जागोजागी तुंबलेलं पाणी पाहून सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर व्हीडिओ पोस्ट केला.

2. लोकलमध्ये अडकलेल्या 290 प्रवाशांची सुटका

मस्जिद आणि भायखळ्या स्टेशनदरम्यान अडकलेल्या दोन लोकलमधून प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दल, पोलिस आणि NDRF च्या टीमच्या मदतीनं लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या दोन्ही लोकलमध्ये 290 प्रवासी अडकले होते.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

मुंबईत दोन दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई लोकलला या पावसाचा फटका बसला आहे. मस्जिद आणि भायखळ्यादरम्यान दोन रेल्वे लोकल अडकून पडल्या आहेत. सीएसएमटीहून कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमधील 251तर टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील 39 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना मुंबई महापालिकेकडून जवळच्या महापालिका शाळांमध्ये तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे.

3. अयोध्येबद्दल शिवसेनेची अवस्था 'धरलं तर चावतंय' - गिरीश महाजन

राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यासाठी जायचं की नाही, याबद्दल शिवसेनेची भूमिका पहिल्यापासूनच गोंधळाची होती. या सोहळ्याबद्दल शिवसेनेची अवस्था धरलं तर चावतंय... अशी झाली असल्याची टीका भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलीये. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

अयोध्येतील भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर प्रतिमापूजन करण्यात आलं.

त्यावेळी बोलताना महाजन यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येमधल्या सोहळ्याचं आमंत्रण नव्हतं. पण आमंत्रण असतं तरी ते आले असते की नाही याबद्दल त्यांची अवस्था द्विधा होती.

ठाकरे यांनी अयोध्येला जाऊ नये म्हणून सहकारी पक्षांनी विधानं केल्यानं त्यांचा गोंधळ उडाला असल्याचंही महाजन यांनी म्हटलं.

4. राम प्रेम आहे, ते द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही- राहुल गांधी

अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन बुधवारी (5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं.

या भूमिपूजन सोहळ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे "मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही."

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

5. राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्येही रामाचे चित्र- रवी शंकर प्रसादांची माहिती

अयोध्येमध्य़े पार पडलेल्या राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनीही एक खास फोटो ट्वीट केला आहे. प्रसाद यांनी ट्वीट केलेला फोटो हा राज्यघटनेच्या मूळ प्रतीमधील एका पानाचा असून त्यावर राम-सीता आणि लक्ष्मणाचे चित्र असल्याचं प्रसाद यांनी लक्षात आणून दिलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर मूलभूत अधिकारांसंदर्भातील कायद्यांबद्दलचा उल्लेख असणाऱ्या भागाच्या सुरुवातील एक चित्र आहे. यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भवगान श्री राम, सीता माता आणि भगवान राम यांचे बंधू लक्ष्मण दिसत आहेत. रावणावर विजय मिळवून अयोध्येमध्ये परत येतानाचे हे दृष्य आहे. आज संविधानाची ही मूळ भावना मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे," असं म्हणत रवी शंकर प्रसाद यांनी हा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)