वीज बिल: ग्राहकांना दिलासा, विशिष्ट ग्राहकांना मिळणार #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वीजेच्या बीलामुळे हवालदिल झालेल्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडॉऊनमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात वीज ग्राहकांना अवाजवी बील येत असल्याची तक्रारी मोठ्या संख्येने समोर आल्या. यावर तोडगा म्हणून आता वीज कायद्यातील कलम 65 च्या आधारे राज्य सरकारच्या तिजोरीतून आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात पार पडलेल्या बैठकीत बुधवारी (29 जुलै) हा निर्णय घेण्यात आला. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वीज कायद्यानुसार वीजेचे दर वीज आयोग ठरवत असलं तरी विशिष्ट ग्राहकांसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून अनुदान देण्याची तरतूद कलम 65 मध्ये आहे.

101-300 युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वाढीव बोज्यातून 75 टक्के सवलत आणि 301-500 युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वाढीव बोज्यातून 50 टक्के सवलत असा प्राथमिक आराखडा ठरवण्यात आला आहे.

याबाबतचा अंतिम प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल.

2. उद्धव ठाकरेंचा अधिकाऱ्यांना नवीन आदेश, लॉकडॉऊनपेक्षा रुग्णांचा शोध घेण्याकडे भर द्या

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आता केवळ लॉकडॉऊन नाही तर अधिकाधिक रुग्णांचा शोध घेण्याकडे भर द्या असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सामना या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाबाबत आढावा घेत असताना त्यांनी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना नव्याने सूचना केल्या आहेत. कोरोनाबाबत कुणीही गाफील राहू नये. रुग्णांचा संपर्क, नवीन रुग्णांचा शोध घेणे, त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठवणे या प्रक्रियेवर भर देण्याचे आदेश त्यांनी दिलेत.

1 सप्टेंबरनंतर मास्क आणि पीपीई किटचा पुरवठा बंद करण्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. तेव्हा हा पुरवठा सुरू ठेवावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

3. गुगलकडून 19 अॅप्सवर बंदी, तुम्ही ही अॅप्स डाऊनलोड केली असतील तर डिलीट करा

कोट्यवधीच्या संख्येने ग्राहक प्ले स्टोअरमधून अनेक धोकादायक आणि मॅलिशस अॅप्स डाऊनलोड करत असतात. त्यामुळे गुगलने पुन्हा एकदा अनेक प्ले स्टोअर बंद केलेत. हे अॅप्स अॅडवेयर इन्स्टॉल करत होते. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिलीय.

इंटेलिजन्स टीमकडून 'चार्टरियूजब्लर' इन्वेस्टिगेशनमध्ये 19 असे अॅप्स आहेत. यामध्ये ब्लरचा समावेश करण्यात आला आहे. अधिकतर अॅप्स फोटो एडिटींग आणि ब्लर फिचर ऑफर करत होते.

ऑटो पिक्चर कट, कलर कॉल फ्लॅश, स्क्वेअर फोटो ब्लर, स्क्वेअर ब्लर फोटो, मॅजिक कॉल फ्लॅश, इजी ब्लर, इमेज ब्लर, ऑटो फोटो ब्लर, फोटो ब्लर मास्टर, सुपर कॉल स्क्रिन, स्क्वेअर ब्लर मास्टर, स्क्वेअर ब्लर, स्मार्ट ब्लर फोटो, स्मार्ट फोटो ब्लर, सुपर कॉल फ्लॅश, स्मार्ट कॉल फ्लॅश, ब्लर फोटो एडिटर, ब्लर इमेज या अॅप्सचा समावेश आहे.

4. 'रिया चक्रवर्ती 'त्रास' देत असल्याने सुशांत सिंह राजपूत 'दुःखी' होता'

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात बिहार पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवल्यानंतर आता बिहार पोलीसांचे एक पथक मुंबईत पोहचले आहे.

सुशांतला रिया चक्रवर्ती त्रास देत असून तो दुखी होता अशी माहिती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकीता लोखंडेने बिहार पोलीसांना दिल्याचे समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

अंकिता लोखंडे 'मणिकर्णिका' या सिनेमाचं शूटींग करत असताना सुशांतने अंकीताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला होता. तेव्हा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आपल्याला त्रास देत असल्याचं त्याने अंकीताला सांगितले होते. अशी माहिती अंकिताने पोलीसांना दिली असून तिचा जबाब अद्याप बिहार पोलीसांनी नोंदवलेला नाही.

5. एक ऑगस्टपासून 'या' नियमांमध्ये होणार बदल, तुम्हाला बसू शकतो आर्थिक फटका

ऑगस्ट महिन्यात बँकासह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. बँकांमध्ये कमीत कमी बॅलेन्सची मर्यादा बदलली जाण्याची शक्यता आहे. अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक 1 ऑगस्टपासून ट्रांजॅक्शनच्या नियमांमध्ये बदल करणार आहेत. याबाबतचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

यामध्ये रक्कम काढणे आणि जमा करण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच बँका कमीत कमी बॅलेंस वाढण्याच्याही तयारीत आहेत.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 1 ऑगस्टनंतर नवीन वाहन खरेदी करताना थर्ड पार्टी आणि own डॅमेज विम्याची आवश्यकता नसेल.

पंतप्रधान किसान योजनेचा दुसरा हफ्ता 1 ऑगस्टपासून जमा होणार आहे.

ई कॉमर्सचे नियमही आता बदलणार आहेत. विक्री करत असलेले सामान कुठे तयार होते याची माहिती आता ई कंपन्यांना द्यावी लागणार आहे. विक्री करण्यात येणाऱ्या साहित्याची एकूण किंमत आणि आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्काची माहिती त्यांना द्यावी लागणार आहे.

आर्थिक वर्षात मूळ आणि सुधारित आयकर रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलैला संपणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)