कोरोना मुंबई: राज्य सरकार नव्हे, RSS सारख्या संघटनांमुळे धारावीत कोरोना नियंत्रण- नितेश राणे #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी प्रसिद्ध झालेली विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवरील पाच महत्त्वाच्या बातम्यांचा घेतलेला आढावा :

1.राज्य सरकार नव्हे, RSS सारख्या संघटनांमुळे धारावीत कोरोना नियंत्रण- नितेश राणे

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंसेवी संघटनांच्या कामामुळे धारावी कोरोनामुक्त झाली आहे. त्यांनी दिवसरात्र काम केलं आहे. त्यामुळे धारावी कोरोनामुक्त होण्याचं सगळं श्रेय राज्य सरकारला देण्यात येऊ नये," असं भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिलीये.

कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंसेवी संस्थांनी काम केलं. जागतिक आरोग्य संघटनेने याकडेही लक्ष द्यावं, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र शिस्तबद्ध योजना आणि अंमलबजावणीमुळे धारावीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत गेला. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनीही धारावी मॉडेलचं कौतुक केलं होतं.

2. कोरोना 100 वर्षातलं सर्वांत वाईट आरोग्य आर्थिक संकट- शक्तिकांता दास

कोरोना हे गेल्या 100 वर्षातलं सगळ्यात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट असल्याचं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी व्यक्त केलं.

कोरोनामुळे उत्पादन आणि नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. जगभरात व्यवस्था, श्रम आणि कॅपिटल कोलमडलं आहे. अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला रिझर्व्ह बँकेचं प्राधान्य आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत, असं दास यांनी सांगितलं. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

एसबीआय बँकिंग अँड एक्सलन्स कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. कोरोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. पंजाब आणि महाराष्ट्रात सहकारी बँकांचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा झाली असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

3. अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये-गिरीश बापट

"पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यावेळी अजित पवार यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही. 'हम करे सो कायदा' हे बरोबर नाही," अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. सकाळने यासंदर्भात बातमी दिली आहे.

"केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के जनतेला वेठीस धरणं योग्य नाही. हा एकतर्फी निर्णय आहे, असेच निर्णय पुढे घेण्यात आले तर काय करायचं ते आम्ही ठरवू," असा इशाराही खासदार गिरीश बापट यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. लॉकडाऊनमुळे उपासमाराची भीती आहे. लॉकडाऊन लागू करताना खासदार-आमदारांच्या सूचनांचा विचार करण्यात आला नाही, असं त्यांनी सांगितलं.

4. दिल्लीमधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द

महाराष्ट्रात विद्यापीठ परीक्षांवरून गोंधळ सुरू असताना दिल्लीत मात्र विद्यापीठ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरमध्ये पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांना तसं प्रमाणपत्र देण्यात येईल, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं.

कोरोनामुळे परीक्षा न घेणं आणि प्रमाणपत्र न देणं हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. NDTVने ही बातमी दिली आहे.

5. गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर, भाविकांना मंडपात प्रवेश नाही

कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसाठी काटेकोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भक्तांना मंडपात जाऊन गणपतीचे दर्शन घेता येणार नाही. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन या कार्यक्रमांसाठी केवळ 10 कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येईल.

गणपती उत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य सरकारने ही नियमावली जाहीर केली आहे.

मुंबईत साधारण साडेबाराहजार गणेश मंडळं आहेत. मंडपाचे दिवसातून किमान तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे अशी सूचनाही देण्यात आली आहे. टीव्ही9ने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)