You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताने दिला पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील 50 टक्के स्टाफ कमी करण्याचा आदेश
भारताने दिल्ली येथे असलेल्या पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांवर आणण्याचा आदेश पाकिस्तान सरकारला दिला आहे. भारतही इस्लामाबाद येथील आपल्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या तितकीच ठेवणार आहे.
दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्तातील अधिकारी हेरगिरी करत आहेत आणि त्यांचे कट्टरतावाद्यांशी संबंध आहेत असा आरोप भारताने केला आहे.
भारताकडून करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताच्या या आरोपाचा निषेध केला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी याबाबत अधिकृत माहिती दिली.
न्यूज एजंसी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी भारताने पाकिस्तान उच्च आयुक्त कार्यालयाच्या चार्ज ड अफेयर्सला बोलवून पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील हालचालींबाबत नाराजी व्यक्त केली.
पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी हेरगिरी आणि कट्टरवादी संघटनांसोबत काम करत असल्याचा आरोप भारताने केलाय.
भारताचा असा दावा आहे की 31 मे रोजी त्यांनी दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांची वागणूक व्हिएना करारानुसार अयोग्य असल्याचं मत भारताने नोंदवलं आहे. यावर कृती करण्यासाठी भारताने पाकिस्तानला सात दिवसांचा वेळ दिला आहे.
तसंच भारताने आणखी एक आरोप केलाय. पाकिस्तान इस्लामाबाद येथील भारताच्या उचायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोप भारताने केलाय.
तर पाकिस्तानने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केलेले आरोप फेटाळत या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
मंगळवारच्या रात्री पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली अधिकृत भूमिका मांडली. भारताने केलेले आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आहेत. तसंच पाकिस्तान उच्च आयुक्त कार्यालयातून 50 टक्के कर्मचारी कमी करण्याच्या मागणीलाही विरोध केला आहे.
पाकिस्तानने व्हिएना संधीचे उल्लंघन केल्याचा आरोपही फेटाळला आहे. पाकिस्तान कायम आंतरराष्ट्रीय कायदे आणि परराष्ट्र धोरणाचे पालन करत असल्याचा दावा केलाय.
इस्लामाबाद येथील भारतीय उच्च आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा भारताचा आरोपही पाकिस्तानने फेटाळला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय उच्च आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना पाकिस्तान पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
त्या अधिकाऱ्यांकडून नकली नोटा जप्त करण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे पाकिस्तान पोलिसांचे म्हणणे होते.
पण पाकिस्तान पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवत भारतीय अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आणि अनेक तास त्यांच्यासोबत अयोग्य व्यवहार केल्याचा दावा भारताने केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)