You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अक्षय बोऱ्हाडे कोण आहे? सोशल मीडियावर तापलेलं प्रकरण नेमकं काय आहे?
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अक्षय बोऱ्हाडेविषयीचं प्रकरण गाजत आहे. राज्यातल्या अनेक राजकारण्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण हे प्रकरण नेमकं का आहे?
प्रकरण काय?
अक्षय बोऱ्हाडे हा 23 वर्षांचा तरुण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रूक गावात राहतो.
त्याच्या फेसबुकच्या पेजनुसार, तो बेघर आणि बेवारस मनोरुग्ण व्यक्तींसाठी काम करत असल्याचं दिसतं. 'शिवऋण' संस्थेच्या माध्यमातून तो मनोरुग्णांच्या निवासाची सोय करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि उपचार करणे आदी कामं करतो.
त्याच्या फेसबुक टाईमलाईनवर नजर टाकल्यास कोरोनाच्या काळात त्यानं अनेकदा बेघर व्यक्तींसाठी जेवणाच्या पंगतीचं आयोजन केल्याचं, त्यांच्यावर उपचार केल्याचं दिसून येतं.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
अक्षयनं 27 मे रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गावातील काँग्रेस पक्षाचे नेते सत्यशील शेरकर यांच्यावर आरोप केले.
तो म्हणाला, "मला सत्यशील शेरकर यांनी बंगल्यावर बोलावलं, माझ्या मित्रांना हाकलून दिलं. तिथं नेऊन मला दांडक्यानं पाठीवर आणि पायावर मारहाण केली. पाया पडायला लावलं, माती चाटायला लावली. इथून पळाला तर गोळी घालीन, अशी धमकी दिली."
याच फेसबुक लाईव्हमध्ये तो पुढे म्हणाला, "आज 60 निराधार लोकांना सांभाळण्याचं काम मी करत आहे. पण, एखादं गरिबाचं पोरगं वर जायला लागलं की, हे श्रीमंत लोकं त्याला मारहाण करतात. सत्यशील शेरकरपेक्षा माझं नाव होत आहे, त्यामुळे फक्त मला ही मारहाण झाली आहे."
अक्षय बोऱ्हाडे यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सत्यशील शेरकर शिरोली बुद्रूकमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांना गावात चेअरमन म्हणून ओळखलं जातं.
सत्यशील शेरकर काय म्हटले?
सत्यशील शेरकर यांनी मात्र अक्षयनं केलेले आरोप फेटाळून लावत ते सिद्ध करावेत, असं म्हटलं आहे.
याप्रकरणी पत्रकार परिषद घेत त्यांनी म्हटलं, "अक्षय बोऱ्हाडे याने त्याच्या घराच्या बाजूला 40 ते 45 मनोरुग्ण आणले आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची चेकिंग केलेली नाही. रात्री-अपरात्री, दिवसा अशा कुठल्याही वेळेला ते बाहेर पडत आहेत. अक्षयकडे चार-पाच दिवसांपूर्वी मंचरहून आणलेला एक रुग्ण कोरोनासदृश असल्याचं आम्हाला कळालं. त्या रुग्णाबाबत मंचरच्या दवाखान्यातून फोन आला की त्याला इथं घेऊन या, त्यानंतर मग त्यानं तो पुण्याला नेऊन सोडला.
"या घटना पुन्हा घडू नये, म्हणून आम्ही अक्षयला घरी बोलावलं. लॉकडाऊनच्या काळात या रुग्णांचा सांभाळ व्यवस्थित कर, जेणेकरून परिसरात रुग्णांची संख्या वाढणार नाही, असं त्याला समजावून सांगितलं. पण, त्याला वाटलं की आम्ही त्याच्या सामाजिक कार्याला आक्षेप घेत आहे. म्हणून मग त्यानं अरेररावीची भाषा केली. शीवीगाळ करत तो तिथून निघून गेला आणि त्यानंतर फेसबुक लाईव्ह केलं."
अक्षयनं केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत किंवा पुरावे द्यावेत, असं त्यांनी पुढे म्हटलं.
राजकारण्यांची चौकशीची मागणी
अक्षयच्या आरोपानंतर सोशल मीडयावर अनेकांनी त्याच्या पाठीमागे उभे राहत #ISupportAkshayBorhade मोहीम सुरू केली. त्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच तापलं.
यानंतर यावर राज्यातल्या अनेक राजकारण्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
यामध्ये राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले, भाजपचे नेते उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे.
संभाजीराजेंनी याविषयी फेसबुक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं, "अक्षय तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी उभा आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला."
अक्षयच्या कार्याची दखल घेत पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांच्या जयंतीला खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते अक्षयचा सत्कार करण्यात आला होता.
ते पुढे म्हणाले, "पोलीस प्रशासनानं या संपूर्ण घटनेचा छडा लावावा आणि आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे."
उदयनराजे भोसले यांनीही फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटलं, "अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच पोलीस प्रशासनास आवाहन करतो की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लवकरात लवकर या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा."
प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, "गरीब व मनोरुग्ण यांना मदत करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी आज राज्याचे पोलीस महासंचालक संजय जयस्वाल यांना केली आहे."
अमोल कोल्हे यांनी व्हीडिओ ट्वीट करत म्हटलं, "सत्यशील शेरकर आणि मी चांगले मित्र आहोत. त्यांना जवळून ओळखतो. याप्रकरणात अन्याय झाला असेल, तर कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न येत आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची सूचना मी पोलिसांना केली आहे.
"पण, सोशल मीडियावरील हा व्हीडिओ नाण्याची एकच बाजू असू शकते. यामुळे एखाद्याची राजकीय कारकीर्दाला बट्टा लागू शकतो. सोशल मीडियावर सत्यशील यांची ट्रायल करण्यापेक्षा पोलिसांना त्यांचं काम करू द्या."
गुन्हा दाखल
दरम्यान, याप्रकरणी सत्यशील शेरकर यांच्याविरोधात जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती स्वत: अक्षय बोऱ्हाडे याने 28 मे रोजी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)