You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनमध्ये अमित शहा कुठे आहेत? उद्धव ठाकरे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांचं उत्तर
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार अस्थिर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहांना बाहेर फिरताना पाहिलंय का कोणी? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. बीबीसी मराठीसाठी प्रजक्ता पोळ यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे.
संजय राऊत यांच्या मुलाखतीचा संपादित अंश -
बुधवारी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तरं दिली. इतके दिवस ते आरोप करतायेत तेव्हा कोणीही त्याला उत्तरं द्यायला समोर आलं नाही. मग आता का देवेंद्र फडणवीस जे बोलतायेत ते लोकांना पटू लागलंय ही भीती सरकारला वाटतेय का?
अशी काही भीती वगैरे वाटत नाही. महाराष्ट्र एका संकटातून जात आहे. सरकार कोणाचही असो, महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांना समजलं पाहिजे. अशा संकटात सरकारच्या खांद्याला खांदा लावून विरोधी पक्षांनीही काम केलं पाहिजे. पण असं होत नाहीये. पण इथे होतय उलटंच..! केंद्र आणि राज्याचे काही आक्षेप असतील. तर विरोधी पक्षाने अशावेळी राज्याच्या बाजूने केंद्राकडे भूमिका मांडली पाहीजे. पहिल्यांदाच विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका मांडतोय हे दुर्दैव आहे. वित्तीय केंद्र हे गुजरातला नेलं तर ते गुजरातमध्ये नेणं कसं योग्य आहे हे समर्थन विरोधी पक्ष करतोय. या विरोधी पक्षाला महाराष्ट्रद्रोही म्हणणं हे मला व्यक्तिशः पटत नाही. पण लोकांच्या मनातला संताप समजून घेतला पाहिजे.
तुम्ही केंद्राच्या वादाचा मुद्दा मांडला यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतय?
उध्दव ठाकरे काही एकटे नाहीयेत आणि कोण पाडणार त्यांना एकटं? विरोधी पक्ष..? विरोधी पक्षच आता क्वारंटाईन झालेला आहे. तेच एकटे पडले आहेत. सातत्याने महाराष्ट्र विरोधी भूमिकेमुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. त्यांच्या आमदारांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. अशावेळी उध्दव ठाकरे एकटे पडलेले नाहीत. त्यांच्याबरोबर तीन प्रमुख पक्ष काम करतायेत.
पण हे प्रमुख पक्ष कुठे दिसत नाहीत. सरकारवर टीका झाली तर त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी फक्त संजय राऊतांची आहे का? बाकी दोन पक्ष का समोर येऊन बोलत नाहीत?
काल तीन पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली ना... त्याला उत्तरं दिली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नीट काम करता आलं पाहिजे त्यासाठी उध्दव ठाकरेंच्या भोवती तटबंदी उभी केली आहे. ते स्वतंत्रपणे काम करतायेत. निर्णय घेतायेत. आम्ही सर्व ते निर्णय अमलात आणतोय. हीच भूमिका सर्व पक्षांची आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
तुम्ही म्हणताय तटबंदी उभी केली पण काँग्रेस, राष्ट्रवादी समोर येऊन विरोधी पक्षाला उत्तरं देत नाहीत. काल त्यांना पत्रकार परिषद घ्यावीशी वाटली इतके दिवस ते कुठे होते? समन्वयाचा अभाव आहे सरकारमध्ये?
या सरकारला सहा महिने पूर्ण झाले. त्यातले पाच महिने कोरोनाच्या संकटात गेले. त्यामुळे राजकारण करायला वेळ नाही आम्हाला या संकटातातून राज्य कसं बाहेर पडेल याची चिंता आहे.
सर्वांत जास्त राजकारण तर महाराष्ट्रात तापताना दिसतय?
हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. या संकटात प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे. जर बिकट परिस्थितीत सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर विरोधी पक्षाला मिळालेल्या प्रतिष्ठेचं अधःपतन झाल्याशिवाय राहणार नाही.
या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेच दिसत नाहीयेत. अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे खरं आहे का? आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध कसे आहेत?
माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस झालेल्या बैठकांना उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यवस्थित संवाद सुरू आहे. जे अजितदादांना ओळखतात त्यांना माहितीये ते त्यांची कामं फार गाजावाजा न करता करत असतात. आताही ते त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडतायेत. अजित पवार आणि उध्दव ठाकरे यांचं नातं उत्तम आहे. अजित पवार हे या सरकारचं भांडवल आहेत.
कॉंग्रेस या सरकारमध्ये मनापासून असल्याचं दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाण वारंवार बोलतात हे आमच नाही शिवसेनेचं सरकार आहे. राहुल गांधींनी काल जे वक्तव्य केलं?
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी पाच मिनिटांत खुलासा केला. ते उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगितलं. त्यामुळे याबाबत वाद का करावा मला कळत नाही.
तीन पक्षांमध्ये उत्तम संवाद आहे. मागच्या सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात अजिबात संवाद नव्हता. पण या तीन पक्षांमध्ये उत्तम संवाद आहे. आमचं उत्तम चाललय. सरकार पडेल, राष्ट्रपती राजवट लागेल या स्वप्नरंजनातून आता विरोधकांनी बाहेर पडावं.
या सरकारला आता सहा महिने पूर्ण झाले. हे सरकार अस्थिर आहे असं बोललं जात होतं पण जसे दिवस जातील तशी स्थिरता येण्याऐवजी अस्थिरतेची भीती गडत होतेय असं तुम्हाला नाही वाटत का?
हे सरकार अजिबात अस्थिर नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत असतील हे सरकार अस्थिर आहे तर तो त्यांचा भ्रम आहे. आमचं सरकार स्थिर आहे हे ज्यांनी सरकार बनवलं त्या प्रमुख नेत्यांना माहिती आहे. कोरोनाची अनेक लक्षणं आहेत पण त्यात आता पोटदुखी आहे का हे तपासलं पाहीजे कारण विरोधी पक्षाला सतत पोटदुखी होतेय.
संपूर्ण परिस्थितीत एकट्या उध्दव ठाकरेंवर टीका होतेय. राज्यात आणि केंद्रातून... त्यांना चक्रव्यूहात अडकवलं जातंय असं वाटतय?
चक्रव्यूह वगैरे काही नाही. टीका ही प्रमुख नेत्यांवर होते. ते मुख्यमंत्री आहेत म्हणून सरकारवर टीका करतायेत. ती काही व्यक्तिगत टीका नाही. त्यांनी टीका करावी आम्ही काम करत राहू.
उध्दव ठाकरे हे मातोश्रीवरून काम करतात. राज्याचा कारभार आता फेसबुकवर चालणार का असं सुध्दा बोललं जातंय. त्यांना आरोग्याच्या तक्रारी असल्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्याने घरातून काम करतायेत का?
उध्दव ठाकरे बाहेर पडतायेत. वर्षा, सह्याद्री, मातोश्री सगळीकडून ते काम करतायेत. देशाच्या पंतप्रधानांनी आदेश दिलाय लॉकडाऊनचा. हा जो आदेश आहे त्याचं पालन स्वतः पंतप्रधान करतायेत. त्यांना का कोणी प्रश्न विचारत नाही? देशाचे गृहमंत्री अमित शहांना बाहेर फिरताना पाहिलंय का कोणी? ते ही घरून काम करतायेत.
इथे चीन बरोबर सीमेवर तणाव सुरू आहे. देशाचे संरक्षण मंत्री सीमेवर गेले आहेत का? ते घरून काम करतायेत. घरून काम करण्याचा हा सरकारी निर्णय आहे. त्याचं उल्लंघन कोणी करू नये. जर उध्दव ठाकरे काम करत नसतील तर इतकी मोठी यंत्रणा उभी राहीलीये ती उध्दव ठाकरेंचा काम न केल्याचा परिणाम आहे का? ते व्यवस्थित काम करतायेत. विरोधी पक्षांनी त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा. डॉ. लहानेंकडून विरोधी पक्षाला स्पष्ट दिसेल असा चष्मा द्यावा.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाद आता विकोपाला गेलेला दिसतोय. हे चित्र देशभरात महाराष्ट्रातच दिसतंय?
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे उत्तम संबंध आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद आहे. गृहमंत्री अमित शाह आणि उध्दव ठाकरे हे जवळपास रोज संपर्कात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचाही रोज संपर्क आहे. त्यामुळे संवाद नाही आणि वाद आहेत असं नाही. काही छोटे मोठे वाद सोडले तर उत्तम संबंध आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)