लॉकडाऊन विमान प्रवास: देशभरातली विमानतळं आजपासून अशी बदललेली दिसतील

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजपासून म्हणजे 25 मेपासून देशभरात हवाई वाहतूक हळूहळू सुरू केली जातेय. कोरोनाशी लढण्यासाठी 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आणि त्यावेळी विमान वाहतूकही बंद झाली.

आज मुंबई विमानतळावरची परिस्थिती काही अशी आहे -

मात्र, आता विमानं पुन्हा भरारी घेणार असल्यानं विमानतळांवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कशी खबरदारीही घेण्यात येतेय, हे या फोटोंद्वारे पाहूया...

मुंबईतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक मानलं जातं. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही विमानं इथून उड्डाण करतात.

मात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हे विमानतळ शांत आहे. आता टप्प्याटप्प्याने इथल्या अवकाशात विमानांचा आवाज पुन्हा गुंजेल.

विमान धावपट्टीवर उतरलं की, सगळ्यांचेच कान उद्घोषणेकडे असतात. नेमक्या कुठल्या क्रमांकाच्या लगेज बेल्टवर आपल्या बॅग येणार आहेत, याकडे आपलं लक्ष असतं. विमानातून उतरल्यावर सगळ्यांचेच पाय या लगेज बेल्टच्या दिशेनं वळतात. मात्र, आता तिथेही गर्दी करता येणार नाहीय. सोशल डिस्टंन्सिंग पाळावं लागणार आहे.

विमान उड्डाणास अजून काही वेळ बाकी आहे, मग थोडं बसूया म्हणत आपण या खुर्च्यांवर गप्पा मारत बसतो. पण आता तिथंही अगदी एक खुर्ची सोडून बसावं लागेल. ज्या खुर्चीवर बसायचं नाहीय, तिथं तशी खूणच करून ठेवलेली असेल.

फ्लाईटला अजून बराच वेळ बाकी आहे ना? मग इथं बसा, पण अंतर ठेवून. किती अंतर ठेवायचं? चिंता करू नका, खुर्चीच सांगेल तुम्हाला तिच्यावर बसायचंय की नाही ते.

काही विमानतळांवर तर एक नव्हे दोन-दोन खुर्च्यांचं अंतर ठेवण्यात आलंय. अर्थात, हे आवश्यकच आहे. एवढं अंतर ठेवूनही गप्पांचा आवाज पोहोचतोच की.... मग हे अंतर पाळायला काय हरकत आहे. नाही का?

विमानात शिरण्याआधी तुमच्या प्रत्येक बॅगला असं निर्जंतुकीकरण केलं जातं. तुमच्या आणि सहप्रवाशांच्या आरोग्याची काळजी अशी घेतली जातेय.

बोर्डिंग पास घेताना किंवा इतर कुठेही जेव्हा तुमचं ओळखपत्र दाखवण्याची वेळ येते, त्यावेळी अशी व्यवस्था करण्यात आलीय. काचेच्या पलीकडूनच तुम्हाला ओळखपत्र दाखवावं लागेल.

विमानतळावर खबरदारी म्हणून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातंय. तशी तयारीच करण्यात आलीय. या फोटोत तुम्ही त्या तयारीची एक झलक पाहू शकता.

विमानतळ प्रशासनानं खबरदारी घेण्यात कुठलीही हयगय केलेली नाही. सोशल डिस्टंन्सिंग कसं पाळता येईल, त्यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्यात.

विमातळ म्हटल्यावर सुरक्षेचा प्रश्न आलाच. तर विमानतळावरील सुरक्षारक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गांभीर्यानं घेण्यात आलाय. विशिष्ट अंतर राखून ते पाहारा देत आहेत. आणि अशा स्वयंचलित काऊंटर्सद्वारे प्रत्येकाचं तापमान मोजमाप करण्याची सोय असेल.

विमानतळात प्रवेशद्वाराबाहेर अशाप्रकारे खुणा करण्यात आल्यात. लोकांनी रांग लावतानाही अंतर राखावं यासाठीची ही शक्कल.

दीड-दोन महिने विमानं अशी विराजमान झाली होती. विमानतळ शांत पडले होते. अवकाशात विमानाचा आवाज गुंजत नव्हता. आता विमानं पुन्हा भरारी घेणार आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)