You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लाऊडस्पीकरवर अजान लावल्याने लोकांना त्रास होतो - जावेद अख्तर : #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्सवर आज छापून आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1.लाऊडस्पीकरवर अजान लावल्याने लोकांना त्रास होतो- जावेद अख्तर
मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर अजान लावल्याने अनेकांना त्याचा त्रास होतो असं मत गीतकार जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"भारतात 50 वर्षांपर्यंत लाऊड स्पीकरवर अजान लावणं हराम होतं. मात्र कालांतरांनी ते हलाल झालं. इतकंच नाही तर अशाप्रकारे हलाल झालं की त्याची कोणताही सीमा राहिलेली नाही. अजान करणं चांगली गोष्ट आहे. मात्र लाऊड स्पीकरवर अजान लावल्याने इतर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मला आशा आहे की या परिस्थितीत नक्कीच बदल घडेल," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
जर एखाद्या गोष्टीवर बंदी आणायचीच असेल तर लाऊड स्पीकरवर संपूर्णपणे बंदी आणा. मग गणपती असो की अजान असं म्हणत काहींनी अख्तर यांना पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे रमझानच्या पवित्र महिन्यात अजानविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.
2.पेल्यात खळखळाट; सामनातून काँग्रेस,भाजपवर छुपी टीका
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पेल्यात थोडा खळखळाट झाला. मात्र काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे. त्यामुळे सामोपचाराच्या राजकारणावरील जनतेचा विश्वास दृढ होईल, असं सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आलं आहे.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी पडघम वाजणे कोरोना काळात योग्य ठरले नसते. राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती. कोरोनाचं संकट उद्भवल्याने मुख्यमंत्र्यांना राज्यपालनियुक्त सदस्य व्हावे तर राज्यपालांना वरचा आदेश नसल्याने हे प्रकरण भिजत घोंगडं पडलं.
भाजपचे 105 आमदार आहेत. त्यांचे तीन उमेदवार 29 मतांच्या गणितानुसार निवडून येतील पण त्यांनी चार उमेदवार रिंगणात उतरवले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदारांनी एका निवडणुकीसाठी मुंबईला येणे बरे दिसलं नसतं. जीवाचा धोका होताच पण लोकांना काय तोंड द्यायचं हा प्रश्नही होताच.
भाजपने आपले उमेदवार जाहीर करून प्रस्थापितांना धक्का दिला आहे. भाजपला मत देऊ नका असे जाहीर सभातून सांगणाऱ्या गोपीचंद पडळकरसारख्यांना उमेदवारी दिली आहे. पक्षांतर्गत धुसफूस समोर आली आहे. पण तो त्यांचा अंतर्गत मामला आहे आणि त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य होणार नाही, असं म्हटलं आहे.
3.मुंबईत घरांच्या किंमती १५ टक्क्यांनी कमी करण्याची विकासकांची तयारी
लॉकडाऊनमुळे बांधकाम उद्योग पुढील सहा महिने सावरण्याची शक्यता नसल्याने रिक्त घरं विकण्यास विकासक उत्सुक आहेत. घरांच्या किंमती 10 ते 15 टक्क्यांनी कमी करण्याची तयारी काही विकासकांनी दाखवली आहे. घरांच्या किंमती 15 टक्क्यांपर्यंत घसरणार असल्याचा अहवाल लायझेस फोरास या स्थावर संपदा क्षेत्रात संशोधन करणाऱ्या कंपनीने सादर केला आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
कोरोना संसर्गामुळे बांधकाम उद्योगाचं काम प्रत्यक्षात सुरू होणं कठीण आहे. केंद्र सरकारने रोकड सुलभता उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विकासकांनी केली आहे. मुंबई प्रादेशिक परिसरात तीन ते चार लाख घरं विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये विकासकांचे हजारो कोटी अडकून पडले आहेत. घरांच्या किमती करण्यास विकासक तयार आहेत मात्र ग्राहकांनी रक्कम एकत्रित द्यावी असं विकासकांचं म्हणणं आहे.
4. मुंबईत घरात येऊन पडलं हरीण
बिबट्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत असलेलं हरीण पळता पळता एका घराचे छत फोडून कोसळल्याची घटना पवई भागात घडली. पवईतील हनुमान टेकडी परिसरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना घरावरील सिमेंटचा पत्रा फोडून हरीण खाली पडलं. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
हरीण भांबावल्याने बराच वेळ कोपऱ्यात निश्चलपणे बसून होते. या हरिणाला ताब्यात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात सोडण्यात आल्याचं वनअधिकाऱ्यांनी सांगितलं.
छोट्याशा घरात कपाटासमोर हरीण बसल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
5. मनसेकडून मराठी तरुणांना कामांसाठी अर्ज भरण्याचं आवाहन
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार लाखोंच्या संख्येने गावी परतण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार गावी गेल्याने मराठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मराठी तरुणांचे विविध कामांसाठी अर्ज मागवण्यास मनसेच्या कामगार सेनेकडून आवाहन करण्यात आलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.
ड्रायव्हर, पेंटर, कार मेकॅनिक, प्लंबर, सुरक्षा कर्मचारी, हाऊसकीपिंग, कॉम्प्युटर सर्व्हिस, नर्सेस अशा कामांमध्ये परप्रांतियांची मक्तेदारी होती. इच्छुक मराठी तरुणांनी ही संधी न दवडता गुगल फॉर्ममध्ये त्यांची माहिती भर द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)