You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अलिबाग: मांडव्याजवळ बोट बुडाली, पण मरीन पोलिसांनी वाचवले 88 जणांचे प्राण #5मोठ्या बातम्या
आजच्या विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवरील बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या.
1. मांडवा जेट्टीजवळ बोट उलटली; 88 प्रवासी बचावले
अलिबागमधील मांडवा जेट्टीपासून जवळच खडकावर आदळून प्रवासी बोट उलटली असून या बोटीतील सर्व 88 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. गेट वे ऑफ इंडियाहून अलिबागच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बोट मांडवा जेट्टीपासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर असतानाच, समुद्रातील एका खडकावर आदळून ती उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.
बोट उलटली तेव्हा सुदैवाने जवळच मरीन पोलिसांची गस्ती बोट जवळच होती. त्यामुळे लगेचच मदतकार्य सुरू झाले. काही वेळातच तटरक्षक दलाचे गस्ती पथकही तिथे दाखल झाले. मरीन पोलीस, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांनी युद्धपातळीवर बचावकार्य करत सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश मिळवले.
त्यामुळे बोटीतील सर्व 88 प्रवाशांना वाचवण्यात यश आले. 8 प्रवाशांना तटरक्षक दलाने तर उर्वरित प्रवाशांना मरीन पोलीस आणि स्थानिक मश्चिमारांनी वाचवले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी "सागरी सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेला दाद दिली."
2. येस बँक बुधवारपासून निर्बंधमुक्त
येस बँकेच्या पुनरुज्जीवनाला केंद्राने शुक्रवारी हिरवा कंदील दिल्यानंतर, आता या बँकेच्या कारभारावरील निर्बंधही येत्या बुधवारपासून (18 मार्च) उठविण्यात येतील, असं सरकारने शनिवारी स्पष्ट केलं.
सध्या बँकेचे प्रशासक म्हणून काम पाहत असलेले प्रशांत कुमार हेच पुनर्रचित बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, असंही स्पष्ट करण्यात आलं. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
रिझव्र्ह बँकेने 5 मार्चला आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेवर निर्बंध आणून, ठेवीदारांवर खात्यातून कमाल 50,000 रुपयेच काढण्याची मर्यादा घातली. ही मर्यादा 3 एप्रिलपर्यंत लागू असणार होती. मात्र 13 मार्च 2020 रोजी राजपत्रात 'येस बँक पुनर्बाधणी योजना 2020'ची अधिसूचना प्रसिद्ध केली गेली. त्या अधिसूचनेनुसार, बँकेवरील हे निर्बंध ही पुनर्बाधणी योजना कार्यान्वित झाल्याच्या तिसऱ्या कामकाज दिवसाच्या (म्हणजे 18 मार्च) सायंकाळी 6 वाजल्यापासून संपुष्टात येईल.'
अर्थात ठेवीदारांवरील खात्यातून रक्कम काढण्यास अथवा हस्तांतरित करण्याची मर्यादाही उठविली जाईल.
येस बँकेला तारण्यासाठी स्टेट बँकेच्या 7,250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबरोबरीनेच आघाडीच्या चार बँकांनी 3,100 कोटी रुपयांची गुंतवणूक शुक्रवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता बंधन बँक आणि फेडरल बँकेकडून प्रत्येकी 300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना शनिवारी जाहीर केली.
ICICI बँक आणि HDFC लिमिटेडकडून प्रत्येकी एक हजार कोटी रुपये, अॅक्सिस बँक (600 कोटी रुपये), कोटक महिंद्र बँक (500 कोटी रुपये) अशा 3,100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा यापूर्वीच झाली आहे. शिवाय अन्य व्यक्तिगत गुंतवणूकदारांचे येस बँकेत स्वारस्य असून, त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण लवकरच जाहीर केलं जाईल, असंही या बातमीत म्हटलंय.
3. मध्य प्रदेशात सोमवारी कमल नाथांची परीक्षा
ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेला भाजप प्रवेश आणि काँग्रेसच्या 22 आमदारांनी दिलेली राजीनामे, यामुळे बळ मिळालेला भाजप सोमवारी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सरकारला आव्हान देऊ शकतं. विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद नरोत्तम मिश्रा यांनी त्याबाबत सूतोवाच केलं. 'बीबीसी हिंदी'ने ही बातमी दिली आहे.
14 महिन्यांपूर्वी निसटता विजय मिळवत कमलनाथ सरकार सत्तेत आलं होतं.
दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही काँग्रेस सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा करत सूत्रे स्वीकारण्याची तयारी केली आहे. 228 सदस्यांच्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसकडे 114 सदस्यांचे बळ होते. त्यांना बसपच्या 2, सपाच्या एका सदस्याचा आणि 4 अपक्ष सदस्यांचा पाठिंबा होता.
काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामे स्वीकारले गेल्यास सदस्यसंख्या 206 होईल. बहुमतासाठी 104 सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे 92 आमदार असतील तर दुसरीकडे भाजपकडे 107 आमदारांचं पाठबळ असेल.
4. मोबाईल फोनवरील GST 12 वरून आता 18 टक्के
मोबाईलवरील GST 12वरून 18 टक्के होणार असून, यामुळे 1 एप्रिलपासून मोबाईल फोन्सच्या किमतीत वाढ होणार आहे.
GST काऊन्सिलच्या 39व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक राज्यांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर सीतारमण यांनी ही माहिती दिल्याची बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे.
आर्थिक वर्ष 2018-19 साठी GST रिटर्न फाईल करण्याची तारीख 30 जून 2020 केली आहे. तसंच, ज्यांचे टर्नओव्हर 2 कोटींपेक्षा कमी आहे, त्यांना लेट रिटर्न फाईल करण्यावर दंड बसणार नाही. मात्र GST भरण्यास विलंब केल्यास 1 जुलैपासून व्याज द्यावं लागणार आहे.
5. निलेश साबळेची माफी
झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असलेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एका स्किटवरून वाद निर्माण झाल्यानंतर निलेश साबळेने घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ टाकला आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
11 मार्च 2020 रोजी प्रसारित झालेल्या 'चला हवा येऊ द्या'मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता, असा आक्षेप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला होता.
या स्किटमध्ये शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाडांच्या यांच्या कथित प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचे फोटो एडिट करून टाकण्यात आले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
मात्र सादर करण्यात आलेला स्किटमधला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून… घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, असं निलेश साबळेने म्हटलंय.
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक मान्यवर व्यक्तींनी यावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजी राजे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून "लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो," अशी टीका करत झी मराठी आणि निलेश साबळेने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)