You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडे : 'धनंजय मुंडे प्रादेशिक पक्षाचे नेते, त्यांना राष्ट्रीय पक्षाची भूमिका कशी समजणार?' - #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'धनंजय मुंडे प्रादेशिक पक्षाचे नेते, त्यांना राष्ट्रीय पक्षाची भूमिका कशी समजणार?'
मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात देखिल लवकरच ऑपरेशन लोटस होईल असा दावा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.
"ऑपरेशन हे सांगून होत नसतं, ते लवकरच होईल आणि नंतर सर्वांना कळणार आहेच. राज्यात मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता लवकरच ऑपरेशन लोटस होईल", असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
"भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि धनंजय मुंडे हे एका प्रादेशित पक्षाचे नेते आहेत. त्यांना अशा राष्ट्रीय पक्षाच्या भूमिका समजणं शक्य नाही आणि त्यांच्या पक्षात असे ऑपरेशन अगोदर झालेले आहे. त्यामुळे त्यांना चांगलेच माहिती आहे", असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. लोकमत न्यूज 18 नं हे वृत्त दिलं आहे.
2. मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही राजकीय भूकंप- रामदास आठवले
ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपत प्रवेश केला तसा राजकीय भूकंप महाराष्ट्रातही होईल असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मध्य प्रदेशात सत्तांतर निश्चित होईल आणि तिथं काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सकारर येईल, असंही आठवले म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल भाजपवर टीका होत आहे. मात्र भाजपने कोणतीही फोडाफोड केलेली नसल्याचा दावाही आठवले यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपबरोबर आले तर राज्यात एक मजबूत सरकार अस्तित्वात येईल. मात्र असं काही न घडल्यास लवकरच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये बंडखोरी होईल, असं भाकीत आठवले यांनी वर्तवलं आहे. हे वृत्त एबीपी माझानं प्रसिद्ध केलं आहे.
3. ताहिर हुसैन आणि पीएफआयविरोधात गुन्हा दंगल
दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीला पैसा पुरवल्याच्या आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबाजवणी संचालनालयाने आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन आणि पीएफआय संघटनेच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ताहीर हुसैन यांच्या आबीद, मोहम्मद शाहदाब आणि रशीद सैफी या तीन साथीदारांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. तर ताहिर यांचे भाऊ शाह आलम यांनाही सोमवारी अटक झाली. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
4. '...तर बाबरी मशीद पडलीच नसती'
"तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा सल्ला पंतप्रधान नरसिंह राव यांनी विचारात घेतला असता तर बाबरी मशीद पडलीच नसती त्यानंतर देशभरात जो दंगलींचा आगडोंब उसळला तसं झालंच नसतं", असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
"उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त करावं असं मत शंकरराव चव्हाण यांनी मांडलं होतं. मात्र नरसिंह राव आणि इतर मंत्र्यांनी चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेतली. शंकरराव चव्हाण यांनी मात्र कल्याण सिंह सरकार बरखास्त केलं नाही तर बाबरी मशीद राहाणार नाही अशी भूमिका मांडली. त्यांचं मत राव यांनी गांभिर्याने घेतलं नाही आणि पुढे बाबरी मशिदीचं काय झालं हे सर्वांना ठाऊक आहे", असं शरद पवार म्हणाले. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
5. स्टेट बँकेचा ठेवीदारांना दिलासा
स्टेट बँकेने खातेदारांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता बचत खात्यांसाठी दरमहा किमान शिल्लक रकमेची अट रद्द केली आहे. त्यामुळे बँकेच्या 44 कोटींहून अधिक ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
बँकेने बचत खात्यात दरमहा किमान शिल्लक रक्कम नसल्यास वसूल केला जाणारा दंड रद्द केला आहे. त्यामुळे 44 कोटी 51 लाख बचत खातेदारांना त्याचा लाभ होणार आहे. स्टेट बँकेने बचत खात्याचा व्याज दर 0.25 टक्क्याने कमी करून तो 3 टक्क्यांवर आणला आहे.
1 लाख किंवा त्याहून कमी रक्कम असलेल्या ग्राहकांना आता 3 टक्के व्याज मिळेल. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)