You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फारुकाबादमध्ये 23 मुलींना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीच्या पत्नीला गावकऱ्यांनी ठेचून मारलं
मुलीच्या वाढदिवसाला शेजारच्या मुलींनी घरात बोलवून त्यांना तब्बल 9 तासांसाठी ओलीस ठेवणाऱ्या सुभाष बाथमचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला.
या घटनेनंतर सुभाष बाथम यांच्या पत्नीचा गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.
आरोपीच्या पत्नीचं नाव कळू शकलेलं नाही. पण पोलिसांनी आरोपीला ठार केल्यानंतर ती घटनास्थळाहून पळ काढत असताना लोकांनी तिच्यावर दगडफेक केली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
रक्तबंबाळ अवस्थेत तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिचा मृत्यू झाला. अपहरणनाट्यात तिचा सहभाग होता की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
सुभाष बाथिम हा चार्जशीटेड गुन्हेगार होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे होते त्यापैकी एक हत्येचाही गुन्हा होता. कानपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की सुभाषने 'मुलींना स्वतःच्याच घरात ओलीस ठेवलं आणि प्रत्येक मुलीसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली.'
सुभाषवर हत्येचा एक गुन्हा दाखल होता. तो मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील त्याने केली होती.
'तेव्हा कळलं मुलीला ओलीस ठेवलं'
मुलींची सुटका करण्यासाठी एटीएसचे कमांडो बोलवण्यात आले होते. तसेच त्यावेळी कानपूर पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते.
फारुकाबाद जिल्ह्यातील करसिया गावात सुभाष बाथमचं घर आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार तो एक अट्टल गुन्हेगार होता आणि त्याच्यावर अनेक खटले चालू होते.
पोलिसांना तो धमकी देत होता की माझ्याकडे 30 किलो दारुगोळा आहे. वाटाघाटी करण्यासाठी आमदार आणि खासदारांना बोलवा अशी मागणीही तो करत होता.
कशी झाली सुटका?
स्थानिक लोकांनी सांगितलं की सुभाषने आपल्या मुलीचा वाढदिवस असल्याचा बहाणा करून आजूबाजूच्या परिसरातील मुलींना जेवणाचं निमंत्रण दिलं. सर्व मुली दुपारी अडीचच्या सुमारास सुभाषच्या घरी आल्या. सुभाषने त्यांना बंदी बनवलं.
एका मुलीची आई साडेचार वाजता तिला घेण्यासाठी आली असता तिला समजलं की सुभाषने मुलींना कोंडून घेतलं आहे. त्या महिलेनी पोलिसांना सांगितलं. फारुकाबादचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार मिश्र यांनी सांगितलं की मुलींना कुठलाही त्रास होऊ नये अशी पूर्ण खबरदारी आम्ही या ऑपरेशन दरम्यान घेतली होती. या कारवाईत दोन पोलीस जखमी झाले आहेत.
पोलीस घटनास्थळी आल्यानंतर सुभाषने फायरिंग ओपन केलं. तसेच काही देशी बाँबगोळेही त्याने फोडले. पोलीसांनी त्याच्याशी बोलण्याची तयारी दाखवली आणि त्याचं म्हणणं ऐकण्यासाठी ते पुढे गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यात दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या पतो सुरुवातीला हे कळलंच नव्हतं की मुलींना त्याने ओलीस का ठेवला पण नंतर स्थिती स्पष्ट झाली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)